आजपासून सुरू होणारे ८९वे मराठी साहित्य संमेलन आता चांगल्या वातावरणात, चांगल्या चर्चेने आणि चांगल्या कार्यक्रमांनी पार पडेल, अशी अपेक्षा करू या. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी १५ दिवस अकारण घोळ घातला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात त्यांनी जो ‘अरे-तुरे’चा उल्लेख केला तो कुणालाही मान्य होणार नव्हता. मोदी यांच्याशी अनेकांचे मतभेद असले तरी शेवटी ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे त्यांचा उल्लेख हा सन्माननीय शब्दांतच व्हायला हवा. विद्वान असलेल्या सबनीसांना व्यवहारातील साधी सभ्य गोष्ट कळली नाही आणि ‘अरे-तुरे’ झाल्यामुळे सगळेच बिघडले.
‘मी निवडून आलेला अध्यक्ष आहे. माझ्या स्वातंत्र्यावर गदा का आणता?’ असा विचित्र मुद्दा ते मांडत होते. त्यांनी ‘अरे-तुरे’ ज्यांच्याबद्दल उल्लेख केला ते पंतप्रधान निवडूनच आलेले आहेत, हे सबनीस विसरले. बुद्धिमान, साहित्यिक माणसे कशी घसरतात त्याचा नमुना १५ दिवस पाहता आला. सबनीस यांचे शनिवारी संमेलनात होणारे भाषण ‘अध्यक्षीय भाषण’ स्वरूपात तयार झाले आहे. त्या भाषणात सबनीसांनी ‘आधी संवाद, नंतर संघर्ष’ असे एक सूत्र मांडलेले आहे; पण जे भाषणात सूत्र मांडले ते त्यांना व्यवहारात पाळता आलेले नव्हते. त्यामुळे एका भव्य दिव्य साहित्य संमेलनाचा विचका होण्याची वेळ आली होती. शेवटी स्वागताध्यक्षांना स्वत:हूनच पुढाकार घेऊन अंतिम हत्यार उपसावे लागले. सबनीस ऐकायला तयार नसतील, दिलगिरी व्यक्त करत नसतील, माफी मागत नसतील, तर संमेलनच रद्द करू या, या भूमिकेवर स्वागताध्यक्ष आल्यानंतर एकदम वैचारिक उंचीवरचे सबनीस जमिनीवर आले आणि मग वादळ शमले; पण या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. साहित्यिकांच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी आली तर साहित्यिकांना ती खटकतात, चालत नाहीत. १९७५चे कराडचे साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण स्वागताध्यक्ष असताना त्यांना याच साहित्यिक मंडळींनी व्यासपीठावर येऊ दिले नव्हते आणि १९७६च्या इचलकरंजीच्या नाटय़ संमेलनात यशवंतरावांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही. साहित्यिकांचा राजकारण्यांबद्दलचा दृष्टिकोन निकोप नाही; परंतु साहित्यिक मंडळी राजकीय नेत्यांबद्दल उलट-सुलट बोलू शकतात, त्याचा प्रतिवाद कोणी करत नाही. कारण बुद्धिवंतांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. या बुद्धिवंतांचा किंवा तथाकथित विद्वानांचा समाजाला नेमका उपयोग किती? हा प्रश्न वेगळा; परंतु सबनीसांनी कारण नसताना देशाच्या पंतप्रधानांचा वाद निर्माण केला. त्यांच्या या मताशी कोणीही सहमत नव्हते. महाराष्ट्रातील एकाही साहित्यिकाने, विद्वानाने सबनीस यांचे समर्थन केले नाही आणि सबनीस यांना धमक्या आल्यानंतर त्यांच्या मागे उभे राहण्यासाठी एकही साहित्यिक पुढे आला नाही. उलट धमक्यांचा प्रतिवाद करायला राजकारणी नेतेच पुढे आले.
या सगळ्या प्रकरणात गेली १५ दिवस संमेलनाचा मुख्य विषय बाजूला पडून भलत्या विषयाच्या मागे शक्ती, वेळ आणि अनेक माणसांची डोकी खराब झाली, त्याचा काही हिशेब नाही. सबनीसांची एक गंमत अशी वाटते की, ते सातत्याने सांगत होते की, माझ्या बाजूला सत्य आहे आणि सत्य हे सर्वश्रेष्ठ असते आणि दुस-या बाजूने त्यांच्या अध्यक्षीय लिखित भाषणात (जे उद्या होणार आहे.) त्यांनी भगवान येशू ख्रिस्तांचीही साक्ष काढलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वैचारिक भूमिका घेताना सबनीसांचा नुसताच गोंधळ झाला नाही तर आपलीच विधाने परस्पर विरोधी कशी आहेत, हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी माघार घेतली नसती तर हे आजपासून सुरू?होणारे एक आगळेवेगळे संमेलन खरोखरच होऊ शकले नसते आणि ही संतापाची भावना निव्वळ भाजपामध्येच होती, असे नव्हे तर सर्वसामान्य रसिकांना, वाचकांना असेच वाटते की, देशाच्या पंतप्रधानांना एकेरी बोलू नये. एवढेच नव्हे तर त्याच्यापुढेही जाऊन त्यांनी एक विचित्र वाक्य बोलले होते. त्याचा उल्लेख न केलेला बरा. शेवटी त्यांना चूक कळली म्हणा, प्रसंग बाका आहे हे जाणवले म्हणा. भाषण देण्याकरिता व्यासपीठावर पोहोचणे अवघड आहे, याची खात्री पडली म्हणा.. काहीही म्हणा; पण त्यांनी माफीनामा दिला आणि त्यांनी एकटय़ाने पत्रकार परिषद घेतली. ना तिथे स्वागताध्यक्ष होते ना तिथे साहित्य परिषदेचा कोणी सदस्य होता. त्यामुळेच झाला निर्णय चांगला झाला. समाजात वाद होत असतात; पण ते किती ताणायचे, कुठपर्यंत ताणायचे, कुठे थांबायचे, हे खेडय़ापाडय़ांतील फार न शिकलेल्या साध्या माणसांना कळते. विद्वानांना का कळत नाही, असा प्रश्न निश्चितपणे विचारता येईल; परंतु सबनीस म्हणाले त्याप्रमाणे आता झाले गेले विसरून जा आणि हे संमेलन एक आगळेवेगळे संमेलन व्हायला आणि पाहायला सगळेच उत्सुक आहेत. या निमित्ताने संमेलनातील बहुसंख्य माजी अध्यक्ष व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यातील यू. म. पठाण, गंगाधर पानतावणे सर, ही साहित्य क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्रातील फार मोठी माणसे आहेत. पानतावणे सरांच्या ‘अस्मितादर्श’ मासिकाने पुरोगामी विचारांच्या अनेक पिढय़ा घडवल्या. यू. म. पठाण सरांनी संत वाड्.मयाचा सारा रसास्वाद महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवला. त्यांचा धर्म कधी कुणी पाहिला नाही. धर्माच्या पलीकडचे जागतिक मानवतेचे एक फार मोठे तत्त्वज्ञान असते. जे संतांनी सांगितले होते. तेच पठाण सरांच्या सा-या पुस्तकांतून वाचायला मिळते. ते पठाण सर, पानतावणे सर माजी अध्यक्ष म्हणून संमेलनात एकमेकांना भेटतील. मारुती चितमपल्ली, द. भि. कुलकर्णी, फ. मुं. शिंदे, अरुण साधू, उत्तम कांबळे अशी त्या मानाने पुढची पिढी या साहित्य संमेलनात असेल. घुमानच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे आजचे विद्यमान अध्यक्ष तुकारामांचेच वंशज डॉ. सदानंद मोरे. अशी एक विलक्षण मांदियाळी आजपासून महाराष्ट्राला भेटेल. आठ ज्ञानपीठ विजेते भेटणार आहेत. त्यांच्या मुलाखती आहेत. रघुनाथराव माशेलकरांची मुलाखत पर्वणी ठरणार आहे. विजयराव भटकळ आहेत. आशा भोसले यांचे संगीत आहे. ज्ञान- विज्ञान, साहित्य-कला आणि संस्कृतीचा एक दीपोत्सव या निमित्ताने आजपासून सुरू होत आहे. वादाच्या पलीकडे जाऊन या सगळय़ा विचार मंथनातून महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचे नवनीत मराठी वाचकांच्या हातात देता येईल, इतके हे साहित्य संमेलन यशस्वी व्हावे, अशीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे.