विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना राज्यातून हजारो मराठा बांधवांनी बुधवारी मोर्चाने येऊन नागपूर विधानसभेला धडक देत शक्तीप्रदर्शन केले.
नागपूर- विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना राज्यातून हजारो मराठा बांधवांनी बुधवारी मोर्चाने येऊन नागपूर विधानसभेला धडक देत शक्तीप्रदर्शन केले. ‘समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या. अन्यथा बॅलट पेपरने उत्तर देऊ’ असा इशारा मोर्चेक-यांनी सरकारला दिला. सर्वपक्षीय सुमारे १५० आमदारांनी सहभागी होऊन या मोर्चाची राजकीय ताकद भक्कम केली. मोर्चेक-यांतर्फे तरूणींचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मराठ्यांच्या स्वारीने हादरलेल्या मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या. आता चर्चेची नव्हे तर कृतीची वेळ आली आहे असे शिष्टमंडळातील मुलींनी मुख्यमंत्र्यांना ऐकवले. आम्हाला दुस-यांमधला वाटा नको. वेगळे आरक्षण हवे आहे, असे त्यांनी सांगितले. अॅट्रोसिटी कायद्याचा दुरूपयोग टाळावा अशी आमची मागणी असल्याचे या तरूणी म्हणाल्या. शेतक-यांचे प्रश्नही मांडण्यात आले. त्याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून भक्कम भूमिका कोर्टात मांडली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोपर्डी घटनेचा खटला २० डिसेंबरपासून सुरू होत असून दररोज सुनावणी चालेल. अॅड. उज्ज्वल निकम सरकारच्या बाजूने लढतील. चंद्रकांतदादांनी सांगितले की, मान्यवरांच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांना भेटावे असे ठरले आहे. या गटात कोण असावे हे मोर्चेक-यांनीच ठरवायचे आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी ‘मराठा-कुणबी क्रांती मूक महामोर्चा’ या नावाने या राज्यस्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात कुठेही गडबड, गोंधळ नव्हता. शांततापूर्ण , शिस्तबध्द मोर्चा होता. मोर्चा मोठा असल्यामुळे पोलिसांनी मोठा तगडा बंदोबस्त ठेवला होता. पण त्याची गरज पडली नाही.
सुमारे १५० सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली हे या मोर्चाचे विशेष होय. अनेक आमदार तर सुरूवातीपासून मोर्चात होते. नारायण राणे, विखे पाटील, नितेश राणे, विनोद तावडे, दिपक सावंत, आशिष देशमुख, भाई जगताप यासह दत्ता मेघे, अनिल देशमुख हे विदर्भातील दिग्गजही मोर्चात होते.
नोटाबंदीचा फटका
यापेक्षा अधिक लोक मोर्चाला येतील अशी आयोजकांची अपेक्षा होती. काही आयोजकांनी तर २५ लाखाचा आकडा दिला होता. नोटाबंदीचा फटका मोर्चाला बसला, असे एका आयोजकाने सांगितले.
शिस्तबध्द मोर्चा
सकाळपासूनच राज्यभरातून मोर्चेक-यांचे येणे सुरू झाले होते. दुपारी सव्वा बारा वाजता यशवंत स्टेडियम येथे जिजाऊंना वंदना करून मोर्चा निघाला. पाच-पाचच्या रांगेत लोक चालत होते. मुली अग्रभागी होत्या. त्यांच्यामागे महिला, ज्येष्ठ नागरिक, वकील, डॉक्टर, पुरूष आणि शेवटी पुढारी अशा क्रमाने हा मूक मोर्चा पुढे सरकत गेला. हातात भगवे झेंडे, भगवे दुपट्टे, ‘मी मराठा’ नावाच्या भगव्या टोप्या, यामुळे वातावरण भगवे झाले होते. मोर्चेक-यांची अनेक वाहने शहरापासून दूर पोलिसांनी अडवली होती. नंतर ते लोकही पुढे मोर्चात सामील झाले. मोर्चा सुरू असताना सभोवतालची दुकाने सुरू होती हे विशेष. हा मोर्चा दुपारी मॉरिस कॉलेज टी पॉइंट येथे अडवण्यात आला. वाटेत मोर्चेक-यांना पिण्याच्या पाण्याची पाकिटे दिली जात होती. रस्त्यावर होणारा कचरा स्वयंसेवक लगेच उचलत होते.
प्रचंड बंदोबस्त
पोलिस आयुक्त व्यंकटेशन जातीने मोर्चाच्या बंदोबस्ताची पाहणी करीत होते. २ हजार पोलिस, ३०० वाहतूक पोलिस आणि सोबतीला हेल्मेट कॅमेरे व ड्रोनची नजर असा बंदोबस्त होता. मोर्चाच्या शिस्तीमुळे पोलिसांवर ताण दिसत नव्हता. वाहतूक वळवल्याने नागपुरकरांना मोठा वळसा घालून जावे लागले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.