ठाणे, नवी मुंबईला वगळले, शांततेत होणार आंदोलन
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यभरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी मराठा आरक्षणासाठी सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली असून, यातून ठाणे आणि नवी मुंबईला वगळण्यात आले आहे. हा बंद शांतता, अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात २ वर्षापूर्वी ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी झाली होती. मराठा समाजाने त्यानंतर ५८ मोर्चे शांततेत काढले, तरीही सरकार दखल घेत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, दोन दिवसांपासून बंदविषयी संभ्रम निर्माण केला होता. यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादेतील विंडसर कॅसेल हॉटेलमध्ये गुरुवारी राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत ३२ जिल्ह्यातील समन्वयकांनी तीव्र भावना मांडल्या.
मुंबई, ठाणे पसिरातील समन्वयकांशीही भ्रमणध्वनीवर संवाद साधला. यानंतर नियोजित ‘महाराष्ट्र बंद’चा निर्णय कायम ठेवण्यात आला. या बंदमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाणार नाही. अहिंसेच्या मार्गाने बंद पुकारण्यात येत आहे. वैद्यकीय, वाहतूक, अॅम्ब्यूलन्स, शाळेची बस अशा अत्यावश्यक सेवा बंद करण्यात येणार नाहीत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल, अशा पद्धतीचे वर्तन मराठा क्रांती मोर्चाकडून होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी आमच्या न्याय मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी समन्वयकांनी केले.
धार्मिक कार्यक्रमांना रोखू नका
महाराष्ट्र बंद दरम्यान कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला जाणा-यांना रोखण्यात येऊ नये. मुस्लीम बांधव हज यात्रेला जात आहेत. त्यांचा रस्ता अडवू नये, उलट रस्ता मोकळा करून द्यावा, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असलेल्या एसटी महामंडळाच्या गाडय़ा अडवू नयेत, शाळेच्या बस, अॅम्ब्यूलन्सला रस्ता अडवू नये, तोडफोड, जाळपोळ करू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
१५ ऑगस्टला चूल बंद आंदोलन
मराठा आरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तसेच ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद, १० ऑगस्टनंतर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाज आंदोलनात जाळपोळ, हिंसा करतो असा आरोप राज्यकर्त्यांनी लावला असल्यामुळे, स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला स्वत:लाच आत्मक्लेश करून घेण्यासाठी चूल बंद आंदोलन केले जाणार असल्याचेही समन्वयकांनी स्पष्ट केले.
समाजात फूट पडलेली नाही
मराठा समाजात फूट पडली नसून, प्रत्येक जण आपल्या स्तरावर आंदोलन करत आहे. गुरुवारी होणारे आंदोलन हे शांततेत पार पडणार असून, कार्यकर्त्यांनाही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन सकल मराठाचे समन्वयक अमोल जाधवराव यांनी केले. दादर येथील शिवाजी मंदिरमधील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईसह राज्यात प्रत्येकजण आपल्या स्तरावर आंदोलन करणार आहे. मुख्यमंत्री जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असेही जाधवराव म्हणाले. दरम्यान, शाळा, कॉलेज, दूध, मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असेही जाधवराव यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी शिक्षकाची आत्महत्या
लातूर – मुलाला शिक्षण देऊनही त्यास नोकरी मिळत नाही, मुलगी एमएस्सीला विद्यापीठात दुसरी आली, तिलाही कुठे संधी मिळत नाही. त्यामुळे निराश झालेल्या लातूर जिल्ह्यातील माटेफळ येथील एका शिक्षकाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रमेश पाटील असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. लातूर तालुक्यातील माटेफळ येथील शिक्षक रमेश ज्ञानोबा पाटील हे निवळी येथील एका संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. एक मुलगी एमएस्सी, तर दुस-या मुलीने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मुलगाही पदवीधर असून, तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यांची दहा एकर शेती असून, त्यावर राष्ट्रीयीकृत बँक आणि सहकारी बँकेचे ३ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज आहे. कर्जाची परतफेड होत नाही. आरक्षण नसल्याने मुलांनाही नोकरी मिळत नसल्याचे कारण मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाटील यांनी नमूद केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, याबाबत मुरूड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.