मराठा आरक्षण आंदोलन सोमवारी अधिकच भडकले असून सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, आळंदी परिसरात हिंसक घटना घडल्या.
मुंबई- मराठा आरक्षण आंदोलन सोमवारी अधिकच भडकले असून सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, आळंदी परिसरात हिंसक घटना घडल्या. गाड्यांची जाळपोळ, दगडफेक, तोडफोड यामुळे पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे.
सोलापुरात पोलीस उपायुक्तांच्या गाडीवरच दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला, तर आळंदी आणि चाकणमध्ये मोठा हिंसाचार झाला. आंदोलकांनी जवळपास १०० गाड्या पेटवून दिल्या, तर सुमारे १५० गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलीस ठाण्यावरच हल्ला केला.
भीमाशंकरला जाणा-या बसवर केलेल्या हल्ल्यात एक गरोदर महिला जखमी झाली आहे. चाकण येथील हिंसाचार थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी येथे जमावबंदीचे १४४ कलम लागू केले आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या केल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. राज्याच्या इतर भागातही कमी-अधिक प्रमाणात हिंसक घटना घडल्या.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सोमवारी सोलापुरात हिंसक वळण लागले. सोलापुरात कडकडीत बंद सुरू असताना जमावाने पोलीस उपायुक्तांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर या जमावाने पोलिसांवरही दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी या जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक आणखीनच आक्रमक झाल्याने या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली.
धुमसते चाकण (फोटोगॅलरी)
बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. शहरातील बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून परिवहन सेवेच्या बसेसही बंद ठेवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात शंभर टक्के बंद सुरू असताना सकाळी मराठा क्रांती मोर्चाने मोठा मोर्चा काढला. शेकडो मराठा तरुण पांजरपोळ चौकात आणि शिवाजी चौकात एकत्र जमा झाले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले, तर पार्क चौकात काही आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर आणि अग्निशमन दलाच्या गाडय़ावर दगडफेक केली. यावेळी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीलाही जमावांनी टार्गेट केले. जमावाने केलेल्या दगडफेकीत चौगुले यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव तर पांगवलाच शिवाय कोम्बिंग ऑपरेशन करून अनेकांना ताब्यात घेतले.
मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी दिलीप कोल्हे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, सिद्धाप्पा कलशेट्टी, दास शेळके, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, चेतन नरोटे, श्रीकांत घाडगे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, विजय पुकाळे, सचिन महामुनी, बाळासाहेब गायकवाड, मतीन बागवान आदी शिवाजी चौकात एकत्र आले. त्यांनी फेरी काढून बंदचे आवाहन केले. मात्र जमावबंदीचे कारण पुढे करत पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले.
आत्महत्या केलेल्या तरुणाच्या नातेवाईकांना १० लाखाची मदत जाहीर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबादमध्ये प्रमोद पाटील या तरुणाने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली. त्यानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन केले. अखेर प्रमोद पाटील याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत आणि पात्रतेनुसार कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल असे लेखी आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिले आहे. या भागातील वातावरण तणावपूर्ण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
औरंगाबाद येथे राहणारा प्रमोद पाटील हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र आरक्षण नसल्याने तयारी करून देखील संधी मिळत नसल्यामुळे तो निराश होता. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुक पोस्टमधून जाहीर केले होते. मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय.. पण काही तरी करा. मराठा आरक्षणासाठी करा.. जय जिजाऊ.. आपला प्रमोद पाटील’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. दुसरी पोस्ट ४.५० वाजता ‘मराठा आरक्षण जीव जाणार’ असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. त्यानंतर त्याच्या मित्र-मैत्रिणींनी फेसबुकवर त्याची पोस्ट पाहिली आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता रात्री त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात रेल्वेखाली उडी मारून जीव दिल्याचे उघड झाले.
१० लाखांची मदत जाहीर
मराठा आरक्षणासाठी प्रमोद पाटील याने आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर जमाव संतप्त झाला. तब्बल तीन तास रास्ता रास्ता रोको करण्यात आला. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडून मागण्यांबाबत लेखी घेण्यात आले. मात्र, त्यात मदतीचा ठोस उल्लेख नसल्याने संतप्त आंदोलकांनी मदतीची घोषणा करा, असे म्हणत पोलीस ठाण्यातच त्यांना रोखले. त्यानंतर जिल्हाधिका-यांनी १० लाख रुपये व कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत प्राधान्य असे लिहून दिले. दोन वषार्पासून आंदोलने सुरु आहेत. तरीही सरकारने का तोडगा काढलेला नाही, असे म्हणत आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
पिंपरी-चिंचवड, आळंदीत उद्रेक
पुण्यातही मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरूच आहेत. मराठा आंदोलकांनी मार्केट यार्ड परिसरात बंद पुकारला होता. त्यामुळे व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला, तर चाकणमध्ये मराठा आंदोलकांनी अनेक ठिकाणी तोडफोड करत सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी एसटी आणि पीएमपीच्या बसेसना लक्ष्य केले होते. चाकणमध्ये काही ठिकाणी आंदोलकांनी वाहने पेटवून दिल्याने तणाव वाढला आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्येही आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केल्याने या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पिंपरी-चिंचवड परिसरात आंदोलकांनी जवळपास ३० वाहने पेटवल्याने पोलिसांना त्यांच्यावर अश्रुधाराचा मारा करावा लागला.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगावफाटा येथे आंदोलकांनी रास्ता रोको केला. नाशिकमध्ये शिवसेनेचे देवळालीचे आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले.
औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी येथे आंदोलकांनी रास्ता रोको केला, तर जालन्यात आंदोलकांनी मोठा मोर्चा काढला. तर कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलकांनी प्रतिकात्मक फाशी घेतली.
यवतमाळमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक मोहन भोयर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.
नारायण राणे आमच्यासाठी आदरणीय!
मराठा आंदोलकांच्या समन्वय समितीची बैठक औरंगाबाद येथे झाली. या बैठकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्याबद्दल आदराने उद्गार काढले गेले. विशेषत: नारायण राणे यांनी मागचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे परिश्रम घेतले, त्याचा खास उल्लेख करण्यात आला. ‘मराठा आरक्षणासाठी नारायण राणे यांनी परिश्रम घेतले आहेत. समिती स्थापन केली आहे. मराठा समाजाचे ते वरिष्ठ व आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांना नाव ठेवण्याऐवढे आम्ही मोठे नाहीत. समाजाच्या भल्यासाठीच ते निर्णय घेतील.’ अशा प्रकारची भावना विशेष बैठकीत क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
![](http://prahaar.in/wp-content/uploads/2018/07/nitesh-rane-2.jpg)
चाकण पेटले, औरंगाबादमध्ये आत्महत्या
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या बंद आंदोलनाला राज्यात हिंसक वळण लागले आहे. औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी परिसरात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद पाटील या तरुणाने आत्महत्या केली. तर मराठा आंदोलकांनी सोमवारी सकाळी ११ वाजता चाकणमध्ये पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला आणि २५ ते ३० बसेसवर दगडफेक करत बसेसची जाळपोळ केल्याने पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला.
चाकण येथे दोन बस पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली. चाकण येथे पुणे नाशिक महामार्ग रोखून धरल्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. तर राजगुरू नगर येथेही आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी फेसबुकवर पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुकुंदवाडी परिसरात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद पाटील या तरुणाने आत्महत्या केली. मुकुंदवाडी रेल्वे गेट क्रमांक ५१ येथे रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हा प्रकार कळताच मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी बंदची हाक दिली. या तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याची माहिती फेसबुकवर जाहीर केली होती.
प्रमोद पाटील हा तरुण मराठा समाजातून येत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षण नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुकवर फोटो पोस्टमधून जाहीर केले होते.
मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी (२९ जुलै) दुपारी ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी करा… मराठा आरक्षणासाठी करा, जय जिजाऊ… आपला प्रमोद पाटील…’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर दुसरी पोस्ट सायंकाळी पोस्ट करत त्यात मराठा आरक्षण.. जीव जाणार… असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. त्यानंतर मध्यरात्री त्या तरुणाने मुकुंदवाडी भागात धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
या तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मुकुंदवाडीतील बाजारपेठ बंद करण्यात आली असून रास्ता रोको करण्यात आले. त्यामुळे औरंगाबाद- जालना मार्ग बंद झाला.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (३८) याने रविवारी (२९ जुलै) दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या निषेधार्थ भोकरफाटा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
पुण्यात बंदला हिंसक वळण
मराठा आंदोलकांनी सोमवारी मार्केट यार्ड परिसरात बंद पुकारला होता. त्यामुळे व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला. काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी तोडफोड करत सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी एसटी आणि पीएमपीची वाहने पेटवून दिल्याने तणाव वाढला आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्येही आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केल्याने या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. तर पिंपरीतही आंदोलकांनी वाहने पेटवल्याने पोलिसांना त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
सोलापूर बंदला हिंसक वळण
सोलापुरात कडकडीत बंद सुरू असताना जमावाने पोलीस उपायुक्तांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर या जमावाने पोलिसांवरही दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी या जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक आणखीनच आक्रमक झाल्याने या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने सोलापूरमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
शेकडो मराठा तरुण पांजरपोळ चौकात आणि शिवाजी चौकात एकत्र जमा झाले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. तर पार्क चौकात काही आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांवर दगडफेक केली. यावेळी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीलाही जमावांनी टार्गेट केले. जमावाने केलेल्या दगडफेकीत चौगुले यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव तर पांगवलाच शिवाय कोम्बिंग ऑपरेशन करून अनेकांना ताब्यात घेतले. दुपारच्या सुमारास झालेल्या दगडफेकीचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले. काही ठिकाणी टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी मराठा संघटनांच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून इतरांचीही धरपकड केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी सुरू केलेल्या या धरपकडीमुळे सोलापुरात तणाव निर्माण झाला असून चौकाचौकात जमून कार्यकर्ते पोलिसांचा निषेध व्यक्त करत आहेत.