औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ तर परभणी जिल्ह्यातील २१९ गावांचा समावेश
औरंगाबाद – मागील काही वर्षापासून विविध संकटांचा सामना करणा-या मराठवाड्यातील शेतक-यांवर यंदाही अपेक्षीत पावसाअभावी दुष्काळी छाया ओढावत आहे. यंदा विभागातील तब्बल ३१२ गावांची खरीपाची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ तर परभणी जिल्ह्यातील २१९ गावांचा यात समावेश असून ही गावे दुष्काळाच्या छायेत असतील, असे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल मदत व पुनर्वसन विभागास सादर करण्यात आला आहे.
यंदा वेळेत व चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने वारंवार जाहीर केले होते. त्यामुळे शेतक-यांनी वेळीच मशागत करून ठेवली होती. जूनच्या प्रारंभीच दमदार पाऊस होताच मराठवाडय़ातील शेतक-यांनी पेरणी केली. मात्र, नंतर पावसाने दडी मारल्याने पिके वाया गेली. शिवाय, दुबार, तिबार पेरणी करावी लागली. असे करूनही हलक्या जमिनीवरील मुग, उडीद, सोयाबीन अक्षरश: करपले. यामुळे कोरडवाहू शेतक-यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तब्बल ५८ दिवसानंतर पाऊसाने हजेरी लावली. यामुळे खरीपाची चांगल्या जमिनीवरील तग धरून राहीलेली पिकेच टिकली आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाने ८५२५ गावांच्या जाहीर केलेल्या खरीप पिकांच्या हंगामी पैसेवारीत ३१२ गावांची पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आहे.
यात परभणी व औरंगाबाद जिल्हातील गावांचाच समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात येथील ग्रामस्थांना दुष्काळच्या झळा सोसाव्या लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १३५३ गावांपैकी ९३ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आली आहे. तर परभणी जिल्ह्यातील ८४९ गावांपैकी २१९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे.