काही वर्षापासून महाराष्ट्राच्या पाठीमागे दुष्काळाचा ससेमिरा लागलेला आहे. शेतक-यांच्या आत्महत्यांसारखा भीषण सामाजिक प्रश्नही त्यातून उभा राहू शकतो. सध्या राज्यातील १९ हजार गावांमध्ये दुष्काळ पडला असून मुख्यमंत्री फडणवीस फक्त आश्वासनांच्या फैरी झाडत आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या मदतनिधीवर अवलंबून न राहता राज्य सरकारने पाणीसाठे कसे वाढतील, याकडे लक्ष द्यायला हवे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर १९७२च्या दुष्काळापेक्षाही मराठवाड्याची परिस्थिती गंभीर होईल.
मराठवाडय़ाच्या जमिनीतील पाण्याचा साठा ३० ते ४० फुटावर गेल्या दोन वर्षापूर्वी असायचा. पण झपाटय़ाने परिस्थिती बदलली आणि ही पाणी पातळी किमान ५०० फूट खाली गेल्याशिवाय लागत नाही. त्यामुळे पाण्याचा उपसा करणे कठीण झाले. बोअरवेलचा खर्च वाढला. तो परवडणारा नाही. या स्थितीत संपूर्ण मराठवाडा अक्षरश: भाजून निघाला आहे. ज्वारी, बाजरी आणि सोयाबीनचे उत्पादन जवळपास निकालात निघाले आहे. जमिनीत गवतसुद्धा उगवले नाही. त्यामुळे जनावरांच्या चा-याचा प्रश्नही अतिशय गंभीर झालेला आहे. एकीकडे वर्षभराचा प्रपंच चालवायचा आणि दुसरीकडे जनावरे सांभाळायची, अशा कचाटय़ात मराठवाडय़ातला शेतकरी सापडला आहे. अनेक ठिकाणी पशूधन बाजारात विक्रीकरिता न्यायला बाजारात रांगा लागलेल्या आहेत आणि हे पशूधन अखेर कसाईखान्यात पोहोचणार आहे.
एकीकडे अन्नाच्या दुष्काळाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी याची प्रचंड टंचाई आतापासूनच भासू लागली आहे. अजून किमान सात ते आठ महिने पावसाची वाट पाहावी लागेल. त्यानंतरही पाऊस येईल, याची खात्री काहीच नाही. जेवढे म्हणून धरणात पाण्याचे साठे आहेत, त्याची पातळी झपाटय़ाने खालावत चालली आहे. त्यामुळे सरकारने आहे ते पाणी पिण्याकरिता पहिल्याप्रथम आरक्षित करून ठेवण्याची गरज आहे. रोजगार हमीची कामे अजून कुठेही निघालेली नाहीत. राज्यात जिथे बरी परिस्थिती आहे, तिथून जनावरांसाठी चारा आणण्याची गरज आहे. जर चारा आणून जनावरे जगवली नाहीत, तर हे पशूधन कसाईखान्यात गेल्याशिवाय राहणार नाही. जनावरांच्या तातडीने छावण्या काढण्याची गरज आहे.
किमान एक कोटी रुपयांचा चारा जनावरांकरिता रोज लागण्याची शक्यता आहे; परंतु, औरंगाबाद महसूल विभागीय पातळीवर किंवा जिल्हा अधिकारी यांच्याकडून अजून तरी मराठवाडय़ाच्या दुष्काळावर मात करण्याकरिता गांभीर्याने हालचाल सुरू झाली आहे, असे दिसत नाही.
राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादला येऊन गेले. त्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना मराठवाडय़ातील दुष्काळाची भीषण परिस्थिती सांगितली. टंचाईचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे, असे ठरावीक साच्यातील उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आणि ते निघून गेले. परंतु केंद्र सरकारकडून फार मोठी भरीव रक्कम मराठवाडय़ाकरिता येईल, अशा काहीही हालचाली अजून तरी दिसत नाहीत. राज्य सरकारची तिजोरी रिकामीच आहे. या दुष्काळात दोन-पाच हजार कोटी रुपयांची मदत मिळाल्याशिवाय कामे मार्गी लागणार नाहीत. मराठवाडय़ातील खरीप हंगामाची पिके निकालात निघाली आणि १७ लाख हेक्टर जमिनीत घेतली जाणारी रब्बीची पिकेही पुरेशा पावसाअभावी करपली. मुळातच चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणीच झाली नाही. जमिनीत ओलावा शिल्लक नाही. ओल नाही. त्यामुळे गहू, हरभरा, कर्डी, ज्वारी, सूर्यफूल ही सर्व पिके धोक्यात आलेली आहेत. रब्बी पिकाचे ७० टक्के उत्पादन घटणार आहे आणि पुढच्या काही महिन्यांत महागाईचा आगडोंब उसळलेला दिसेल.
गेल्या काही दिवसांत मराठवाडय़ातील २०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही मराठवाडय़ातील परिस्थिती गंभीर आहे, असे ना महसूल विभागाला वाटत, ना सरकारला वाटत. रोजगार हमी खात्याला वेगळा मंत्रीच नाही. मुख्यमंत्री किती खात्याचे कारभार सांभाळणार? त्यामुळे मराठवाडय़ाच्या हालाला सीमा नाही.
शेतक-यांची अशी मागणी आहे की,
१) तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करा.
२) रोजगार हमीची मजुरी किमान १०० रुपये करा.
३) पुरुष आणि स्त्रीला सारखी मजुरी द्या.
४) रोजगार हमीवर अर्धी मजुरी ज्वारीच्या रूपाने द्या.
५) खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके गेली, अशा शेतक-यांना हेक्टरी किमान १५ हजार रुपये मदत द्या.
६) पश्चिम महाराष्ट्रातून चारा आणून जनावरांच्या छावण्या सुरू करा.
या भूमिका तातडीने घेऊन अंमलबजावणी केली नाही तर १९७२च्या दुष्काळापेक्षाही मराठवाडय़ाची परिस्थिती अतिशय गंभीर होईल.
[EPSB]
देश की आँधी इंदिरा गांधी..
काँग्रेस पक्षाचे, देशाचे नेतृत्व करणे पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुष्कळ सोपे गेले; मात्र इंदिरा गांधी यांच्यासमोरची आव्हाने कमालीची कठीण होती. तीन वष्रे सत्तेत नसताना देशाच्या त्या नेत्या होत्याच. बेलचिलात हरिजनांचे डोळे काढले गेले, तेव्हा दुथडी भरून वाहणा-या नदीत हत्ती घालून हत्तीवर बसून इंदिराजी तिथे गेल्या होत्या. देशाला पंतप्रधान असणे वेगळे आणि नेता असणे वेगळे.
[/EPSB]