अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाडा सातत्याने दृष्काळाच्या छायेत आहे. या मराठवाडय़ातील १२९ सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत.
मुंबई – अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाडा सातत्याने दृष्काळाच्या छायेत आहे. या मराठवाडय़ातील १२९ सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. परंतु हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यास सरकार सकारात्मक प्रयत्न करत आहे. त्यामुळे ज्या प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशा १५ प्रकल्पांना निधी उपलब्ध करून वर्षभरात ते पूर्ण करण्यात येतील.
उर्वरित प्रकल्पांची कामे त्यानंतर हाती घेण्यात येतील, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली. मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने मराठवाडय़ातील आमदार अत्यंत आक्रमक झाले होते. मराठवाडय़ातील जनतेकडे सरकार नेहमीच दुर्लक्ष करत आलेले आहे. त्यामुळे, या प्रकरणी सभागृहात सविस्तर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी आमदारांनी केली आहे.
मराठवाडय़ातील १२९ सिंचन प्रकल्पांचे काम निधी उपलब्ध न झाल्याने रखडले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामासाठी लागणारा १२ हजार कोटी रुपयांचा निधी शासन किती दिवसात मराठवाडय़ाला देणार, असा प्रश्न आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील आठ मोठे, सात मध्यम व ४९ लघु प्रकल्प आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातील एक मोठे, एक मध्यम आणि पाच लघु प्रकल्प असे एकूण ७१ प्रकल्प मराठवाडय़ात बांधकामाधीन आहेत.
दरम्यान, मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थिती आणि सिंचन सुविधांचा अभाव लक्षात घेता ज्या प्रकल्पांची कामे ७० ते ८० टक्के पूर्ण झालेली आहेत, अशा अंतिम टप्प्यावर असलेल्या प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करण्यात येतील. मराठवाडय़ात असे विविध १५ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांच्या कामासाठी ९०० कोटी रुपये लागणार आहेत.
याशिवाय उर्वरित प्रकल्पांची कामे त्यानंतर हाती घेण्यात येतील. अशा प्रकारे राज्यातील शेतक-यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे मत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत व्यक्त केले.