महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त विविध पाश्चिमात्यसंगीतशैलीची भारतीय संगीताच्या संदर्भात दृकश्राव्य माध्यमातून ओळख करून देणा-या ‘लयपश्चिमा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पाश्चिमात्य संगीताचा सुरेल परिचय ‘लयपश्चिमा’
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त विविध पाश्चिमात्यसंगीतशैलीची भारतीय संगीताच्या संदर्भात दृकश्राव्य माध्यमातून ओळख करून देणा-या ‘लयपश्चिमा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संगीत रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला. संगीतशैलीचे लेखक, अभ्यासक आणि संग्राहक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी हा कार्यक्रम सादर केला.
भारतीय संगीताला शेकडो वर्षाची परंपरा आहे. या संगीताने पाश्चिमात्यसंगीताला आपलेसे केले आहे आणि अलीकडे पाश्चिमात्यसंगीतानेही भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेला सामावून घेतले आहे. या दोन संगीताचा हा मिलाफ श्रोत्यांसाठी अधिक सुगम व्हावा म्हणून रॉक, पॉप, जॅझ, हिपहॉप अशा विविध लोकप्रिय पाश्चिमात्यसंगीत प्रकारांची दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने डॉ. आशुतोष जावडेकर यांनी ओळख करून दिली. या कार्यक्रमामध्ये पाश्चिमात्यसंगीताच्या रंगांची उधळण होत असतानाच भारतीय संगीताचे संदर्भ त्याला जोडले गेले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हावडा ब्रिज या चित्रपटातील मेरा नाम चिन चिन चू या गाण्याची एक झलक दाखविण्यात आली आणि ज्या पाश्चिमात्यसंगीताला आपल्याकडे तुलनेने नाके मुरडली जातात त्याच पाश्चिमात्यसंगीताच्या भारतीय संगीतातल्या वापराची ओळख करून देण्यात आली. जॅझ या संगीत प्रकारचा विशेषत्वाने ऊहापोह करण्यात आला. यावेळी डॉ. आशुतोष जावडेकर यांनी जॅझ या संगीत प्रकाराचे डेव्हिस पूर्व, डेव्हिस पर्व आणि डेव्हिस नंतर हे तीन टप्पे समजावून सांगितले.
माईल्स डेव्हिस या गायकाने जॅझ संगीताच्या प्रसारात आणि त्यातल्या वैविध्येत महत्त्वाची भर घातली. त्या माईल्स डेव्हिसचा इतिहास डॉ. जावडेकर यांनी उलगडला. त्यानंतर कंट्री म्युझिकच्या आठवणी मळ्याच्या मळ्यामंदी या गाण्याच्या माध्यमातून स्मृतिपटलावर आणण्याचा प्रयत्न डॉ. जावडेकर यांनी केला.
कंट्री म्युझिक हा प्रकार भारतात फारसा परिचित नाही. पण ग्रामीण भागातील संवेदना कंट्री म्युझिकमधून प्रतिबिंबित होतात असे डॉ. जावडेकर यांनी आवर्जून सांगितले. यावेळी शायना ट्वेन या गायिकेच्या काही कंट्री म्युझिक या प्रकारातल्या गाण्याची आठवण करून देण्यात आली. तिच्या एनी मॅन ऑफ माईन या गाण्याच्या माध्यमातून मांडलेली स्त्री-पुरुष भेदभावाची परिस्थिती उलगडली. तर गायिका मायली सायरसच्या बटरफ्लाय फ्लाय अवे या गाण्यातून बाप-मुलीच्या नात्याचे भावस्पर्शी दर्शन घडविण्यात आले.
रॉक म्युझिक म्हणजे विद्रोह आणि असंतोष याला व्यक्त करणारा सळसळता संगीताचा आविष्कार अशी ओळख डॉ. जावडेकर यांनी करून दिली. यावेळी बीटल्स या बॅन्डचे ल्युसी इन द स्काय विथ डायमंड्स या गाण्यातून अशांततेतील उद्विग्नता व्यक्त करण्यात आली. तर भारतीय रॉक संगीताचा दाखलाही डॉ. जावडेकर यांनी दिला. ए. आर.
रहमान यांनी रॉक संगीताचा भारतीय संगीतात सातत्याने प्रभावी वापर केला आणि एकप्रकारे भारतीय रॉक संगीताचा पाया रोवला असे त्यांनी सांगितले. यावेळी याचे एक उदाहरण म्हणून ओ नादान पिरदे हे रॉकस्टार चित्रपटातील गाणे सादर करण्यात आले. पॉप संगीताचा इतिहास समजावून सांगताना रिकी मार्टनि या गायकाचे लिव्हिन ला व्हिडम लोका हे स्पॅनिश गाणे उदाहरण म्हणून दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप करत असताना पॉप या संगीत प्रकाराचे विस्तृत संगीत तुकडय़ांसह परिचय करून देण्यात आला. त्यातले वेगळेपण,रसग्रहण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची वैशिष्टय़ं विस्ताराने मांडण्यात आली. पॉप संगीताचा बादशहा म्हणून ओळख असलेल्या मायकल जॅक्सनचा मूनवॉक प्रेक्षकांची समरसून दाद मिळवत हा कार्यक्रम संपन्न झाला.
आशाताई भोसले यांनी गायली ‘गुरुकुल’ची लावणी
आगामी मराठी चित्रपट ‘गुरुकुल’मध्ये आशाताईंच्या आवाजात एक झकास लावणी ऐकायला मिळणार आहे. फार कालावधीनंतर आशाताईंच्या आवाजात एक अप्रतिम ठसकेबाज लावणी ऐकायला मिळणार आहे. चिरतरुण गायक असलेल्या आशाताई यांच्या आवाजात फार दिवासांनी मराठी प्रेक्षकांना मोठी पर्वणी मिळणार असल्याची भावना लेखक-दिग्दर्शक रोमिल रॉड्रिग्स यांनी व्यक्त केली.
एवढेच नव्हे तर ‘गुरुकुल’साठी इतर गाणीसुद्धा दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत सचिन पिळगावकर तसेच डॉक्टर नेहा राजपाल यांनी गायली आहेत. गाणी प्रशांत इंगोले यांनी लिहिली असून संजय राज गौरीनंदन यांनी संगीत दिले आहे.
नागेश भोसले यांना एका आगळ्यावेगळ्या लूकमध्ये पाहण्याची संधी ‘गुरुकुल’ निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार असून विद्याधर जोशी असल्याने दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल.
तसेच सोबत प्रशांत मोहिते, प्रदीप कुंवर, स्वप्नील जोशी, सोनाली शेवाळे, नेहा खान, रिना, आसित रेडीज , उमेश बोळके, अनिल सुतार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. प्रीती सदाफुले हिने लावणीवर आपली अदाकारी पेश केली आहे. अनिल काबरा सदर चित्रपट वितरीत करीत असून ‘अ नट्स एन बोल्ट्स प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘गुरुकुल’ हा चित्रपट येत्या ७ ऑगस्ट रोजी सर्व महाराष्ट्रात प्रदíशत होत आहे.
‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटात अॅप
प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार नेहमीच चित्रपटाचं स्वरूप बदलत असतं. त्याला अनुसरून चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकही निरनिराळ्या क्लृप्त्या लढवत असतात. अशीच एक भन्नाट कल्पना दिग्दर्शक राहुल जाधव यांनी ‘मर्डर मेस्त्री’ या आपल्या चित्रपटातील ‘जीवाला लागला घोर’ या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आणली आहे.
सध्याचा जमाना सेल्फीचा आहे, मराठी चित्रपटसृष्टी त्यात मागे कशी राहील. ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एल्फी सेल्फी’ या अॅपद्वारे बनवण्यात आलेले ‘जीवाला लागला घोर’ हे गाणं दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, ऋषीकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, क्रांती रेडकर आणि मानसी नाईक यांवर चित्रित नाही तर एडिट करण्यात आले आहे.
‘एल्फी सेल्फी’ या अॅपमध्ये असलेल्या व्हीडिओजवर चित्रपटातील कलाकारांच्या सेल्फी लावण्याची शक्कल सृती सुकुमारन हिने लढवली असून हे धम्माल गाणं म्हणजे प्रेक्षकांसाठी व्हिज्युअल ट्रिट आहे.
संगीतकार पंकज पडघन यांनी पहिल्यांदाच कल्ट फोल्क साँग पॅटर्न हा ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाद्वारे मराठीत आणला आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स या गाण्याने होत असल्याने त्यातले रहस्य जपत हे गाणं प्रेक्षकांना ऐकता यावं, पाहता यावं याकरिता ही ग्राफिक ट्रीटमेंट ‘जीवाला लागला घोर’ गाण्याला दिली गेली असल्याचे दिग्दर्शक राहुल जाधव यांनी सांगितलं.
गुरू ठाकूर यांचे गमतीशीर शब्द आणि आदर्श िशदे यांचा मस्तीभरा आवाज लाभलेल्या या गाण्यात दिलीप प्रभावळकर आणि वंदना गुप्ते साल्सा करताना दिसतील तर इतरही कलाकारांचा मजेशीर अवतार तुम्ही या गाण्यात पाहू शकाल.
अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित ‘मर्डर मेस्त्री’ हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा नेहा कामत यांची आहे तर पटकथा व संवाद प्रशांत लोके यांनी लिहिलेत. नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १० जुलैपासून चित्रपटगृहात दाखल होतोय.
स्टार प्रवाह वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेच्या सूचीमध्ये अव्वल स्थानावर असणारी ‘पुढचं पाऊल’ मालिकेने १३०० भाग पूर्ण केले असून या मालिकेने या वहिनीवरची सर्वाधिक काळ प्रसारित होणा-या पहिल्या मालिकेचा बहुमानही मिळवला आहे. या निमित्ताने नुकत्याच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्टार प्रवाह वाहिनीचे अधिकारी व निर्मिती संस्थेतल्या दिग्गजांबरोरच या मालिकेतले सर्वच कलाकार उपस्थित होते.
मे २०११मध्ये सुरू झालेली ही मालिका सर्वार्थाने वेगळी आहे. नेहमीच्या कट-कारस्थान करणा-या सासू-सून यांना फाटा देत, आपल्या सुनेला पाठिंबा देणारी, तिच्या आणि घरातील सगळ्यांच्याच हितासाठी झटणारी सासू ही कथा कल्पनाच खूप वेगळी होती. बघता बघता राजलक्ष्मी सरदेशमुख म्हणजेच आक्कासाहेब तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या ‘रोलमॉडेल’ बनल्या, तर ‘पुढंच पाऊल’ या मालिकेने एका चळवळीचे रूप धारण केले.
पुरोगामी महाराष्ट्रातील अनेक सासू-सुनांनी लाखो पत्रे, ई-मेल्स, सोशल मीडिया आणि विविध कार्यक्रमातून प्रत्यक्षपणे आक्कासाहेब, कल्याणी,देवकी या व्यक्तिरेखांनी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणल्याचे कबूल केले आहे.
या प्रसंगी बोलताना स्टार प्रवाहचे प्रवक्तेम्हणाले की, ‘पुढचं पाऊल’ ही मालिका सुरू झाल्यानंतर मराठी आणि िहदी जीईसीमध्ये अनेक नवीन मालिका सुरू झाल्या, परंतु ‘पुढचं पाऊल’ मालिकेची उंची कोणतीच मालिका गाठू शकली नाही. या मालिकेची लोकप्रियता नेहमीच अबाधित राहिली आहे. आमच्यासाठी ही केवळ मालिका नाही तर आमच्या वाहिनीचे व्यक्तिमत्त्व आहे.’
‘पुढचं पाऊल’ची ही घोडदौड म्हणजे कलाकार ते स्पॉटबॉय आणि दिग्दर्शक, लेखक ते स्टार प्रवाह वाहिनी वरील प्रत्येकाने घेतलेल्या अविश्रांत कष्टाचे फळ आहे. चार वष्रे, दर दिवसागणिक आजच्या काळाशी सुसंगत आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडेल असे मनोरंजन देणे नक्कीच आव्हानात्मक होते. पण हे शिवधनुष्य स्टार प्रवाहने लीलया पेलले आहे. या मालिकेने प्रेक्षकांना केवळ मनोरंजन देतानाच एक सामाजिक बांधिलकीही जपल्याचे वाहिनीचे मत आहे.
‘मुं बईची ‘धाव’ आणि पुण्याची ‘चाल’ यांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेस ‘हायवे’. मुंबई-पुण्याहून वेगवेगळ्या वाहनातून वेगवेगळी माणसे निघतात आणि हायवेवरील वाहने पळू लागतात.. ’या एवढय़ाशा ‘वनलाईन’ला घेऊन सध्याची ‘स्टार’ लेखक-दिग्दर्शक जोडगोळी गिरीश-उमेश कुलकर्णी यांनी एक विचार करायला लावणारी, तरीही मनोरंजन करणारी चित्रकथा रंगवली आहे.
उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विनय गानू यांच्या ‘आरभाट कलाकृती’ आणि ‘खरपूस फिल्म्स’ कृत ‘हायवे’ हा नवा मराठी चित्रपट येत्या २४ जुलैला महाराष्ट्रात प्रदíशत होत आहे.
‘हायवे’चा फर्स्ट लूक, ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा एका अनोख्या पद्धतीने संपन्न झाला. या सोहळ्याला जणू अख्खं तारांगणचं लोटलं होतं. चित्रपटात असलेली भलीमोठ्ठी स्टारकास्ट तर उपस्थित होतीच; पण पाहुण्या कलावंतांचीही विशेष हजेरी लाभल्याने हा सोहळा विशेष ठरला.
चित्रपटाचा फर्स्ट लूक ज्येष्ठ नाटककार अभिनेते पद्मश्री सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. हायवेच्या निमित्ताने बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताचे प्रकाशन सुपरस्टार संगीतकार अजय-अतुल यांच्या हस्ते करण्यात आले, तर ट्रेलर लॉन्चसाठी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, एव्हरेस्टचे संजय छाब्रिया, झी मराठीचे दीपक राजाध्यक्ष यांना आमंत्रित केले होते.
‘माणूस प्रवासाने घडतो आणि माणूस प्रवासातच कळतो.. मग तो प्रवास जीवनाचा असो किंवा ‘हायवे’वरचा. या भन्नाट कल्पनेभोवती गिरीश-उमेश कुलकर्णी यांनी ही चित्रकथा रंगवली आहे. ‘चेहरे’ टिपण्यात माहीर असलेल्या या लेखक-दिग्दर्शक जोडगोळीने माणसांचा ‘हायवे’वरचा प्रवास मांडताना रसिकांना एक वेगळा, नवा आणि तजेलदार अनुभव दिला आहे.
वेगवेगळ्या सामाजिक, आíथक स्तरामधली माणसं आपापल्या भावभावनांचं, प्रश्नांचं, वेदनांचं, बॅगेज घेऊन प्रवासाला निघतात आणि मग.. हा त्यांच्या प्रवासातील ‘पॉझ’ त्या प्रत्येक प्रवाशाचा ‘चेहरा’ उघड करतो. एकूणच हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाचा, नव्या जमान्याचा ‘एक सेल्फी आरपार’ असेच म्हणता येईल.
सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार विजेत्या ‘देऊळ’नंतर गिरीश-उमेश कुलकर्णी या दोघांचा हा आणखी एक नवा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा भन्नाट चित्रपट आहे. आतापर्यंत सलग चार चित्रपटांसाठी या दोघांनी लेखक-दिग्दर्शक म्हणून काम केले असून त्यांच्या ‘आरभाट कलाकृती’ची ही सहावी निर्मिती आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपट चालतो अशा कलाकारांमध्ये लेखक-दिग्दर्शक म्हणून गिरीश-उमेश यांचे नाव आघाडीवर असून दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट निर्माण करून ते रसिकांपर्यंत पोहोचविण्यात ही जोडी विशेष प्रवीण आहे.
चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे. तर पोस्टकार्ड आणि अनुमती या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांचे निर्माते विनय गानू यांची ‘हायवे’च्या निर्मितीसाठी विशेष साथ लाभली आहे.
‘हायवे’मध्ये प्रमुख भूमिकेत गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे, सुनील बर्वे, मुक्ता बर्वे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, सतीश आळेकर, किशोर कदम, छाया कदम, नागराज मंजुळे, नंदकिशोर चौघुले, विद्याधर जोशी, मयूर खांडगे, श्रीकांत यादव, उमेश जगताप, शुभम, शकुंतला नगरकर, पूर्णानंद वांदेकर, निपुण धर्माधिकारी, देवेंद्र गायकवाड, सविता प्रभुणे, मकरंद सप्तर्षी, धीरेश जोशी, ओम भूतकर, पूर्वा पवार, शिवकांता औरंगाबादकर, शशांक शेंडे, शिल्पा अनासपुरे, जयंत गाडेकर, आदित्य कुलकर्णी, ऊर्मिला निंबाळकर, भूषण मंजुळे, शंकर डोंगरे, सहर्ष शुक्ला यांच्या सोबतच प्रथम पदार्पण करणारे समीर भाटे आणि वृषाली कुलकर्णी हे आपली वेगळी छाप सोडून जातात.
उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विनय गानू यांच्या आरभाट कलाकृती आणि खरपूस फिल्म्स कृत ‘हायवे’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुधाकर रेड्डी यांनी केले आहे. वैभव जोशी यांच्या गीताला संगीतकार अमित त्रिवेदी यांचे संगीत आहे. पार्श्वसंगीताचा भार मंगेश धाकडे यांनी उचलला असून ध्वनी संयोजन साऊंड डिझायनर अंथोनी रुबेन यांचे आहे.
‘हायवे’चे संकलन परेश कामदार यांनी केले असून कॉस्च्युम डिझायनर म्हणून सीमा आरोळकर यांनी काम पाहिले आहे. कला दिग्दर्शन प्रशांत बिडकर यांचे असून वेशभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे, तर कार्यकारी निर्माते नितीन प्रकाश वैद्य आहेत. येत्या २४ जुलैला हा चित्रपट प्रदíशत होत आहे.
‘पाथरवट’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
निर्माते अजय गजधाने आणि लेखक-दिग्दर्शक स्वराज यांच्या सी-लिंक प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माण होणा-या ‘पाथरवट’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम, ‘फॅण्ड्री’ चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरात, अभिनेता अक्षय जाधव, मनमित पेम, निर्माते अजय गजधाने, लेखक-दिग्दर्शक स्वराज यांच्यासहित चित्रपटक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटाची कथा आहे महाराष्ट्रातील (पाथर) वडारी समाजाची. या समाजाने वर्षानुवष्रे दगड कोरून दगडाचे महाल, राजवाडे, मंदिरे, विहिरी, पूल, धरणे बनवली. इतकेच नव्हे तर शिवाजींच्या किल्ल्यांपासून ते मुंबईचे सीएसटी स्टेशन, गेट वे ऑफ इंडियापर्यंत सर्व काही बनवले. इतकी सुंदर कलाकृती करूनही त्यांचे जीवन आजही उपेक्षित आहे.
दगड कोरताना या समाजातल्या कित्येक लोकांनी आपले डोळे गमावले,बोटं गमावली, हात गमावले इतकेच नव्हे तर किल्ले बांधताना दरीत पडून आपला जीवही गमावला. अशा समाजाला आजही मंदिरात प्रवेश मिळत नाही किंवा विहिरीवर त्यांना पाणी पिऊ दिले जात नाही. त्यांनी मोठ-मोठे वाडे बांधले; पण स्वत: झोपडय़ात राहिले.
जाती बनवली पण दळायला धान्य नाही. गुरासारखी मेहनत करूनही या लोकांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यांची होणारी फसवणूक,त्यांची होणारी हेळसांड, त्यांच्यावर होणारा अन्याय हे सर्व वास्तव समाजासमोर आणण्याचा या चित्रपट निर्मितीमागे हेतू आहे, असं निर्माते अजय गजधाने यांनी सांगितले.
लेखक-दिग्दर्शक स्वराज यांनी सांगितले की, हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी एक आव्हानच असून या वेगळ्या विषयावरील चित्रपट दिग्दíशत करताना मला खूप अभ्यास आणि मेहनत करावी लागणार आहे. हा चित्रपट पाथर (वडार) समाजावर प्रकाश टाकणारा असला तरी या चित्रपटात आम्ही एक प्रेमकथाही गुंफली आहे.
जेणेकरून आजच्या युवा पिढीसाठी हा चित्रपट एक आकर्षण ठरेल. तसेच उत्तम संगीत आणि नव-नवी चित्रीकरण स्थळंही या चित्रपटाची जमेची बाजू असणार आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात बाजी मारील, असा निर्माते-दिग्दर्शकांना विश्वास आहे. यात अभिनेता किशोर कदम, ‘फॅण्ड्री’ फेम राजेश्वरी खरात, मनमित पेम, नवोदित अक्षय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इतर तंत्रज्ञाची व कलाकारांची निवड होताच या चित्रपटाचे नियमित चित्रीकरण सुरू होणार आहे.