‘प्रहार-मित्र’ भेट या उपक्रमात श्री. अशोक हांडे यांनी ‘प्रहार’ कार्यालयात येऊन संपादकीय विभाग आणि इतर सदस्यांशी दिलखुलास संवाद साधला.
मुंबई- ‘कोणत्याही मनोरंजनाचा मुख्य उद्देश प्रबोधन हाच असला पाहिजे, ही माझी कलेकडे पाहण्याची भूमिका आहे. भारतीय संस्कृती आणि संस्कार समाजापर्यंत पोहोचवणे, रुजवणे आणि वाढवणे, हे साहित्यिक व कलावंतांचे जसे काम आहे, तसेच ते पत्रकारांचेही काम आहे. दैनिक ‘प्रहार’ने या कामात पुढाकार घ्यावा,’ अशा शब्दांत प्रख्यात कलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि ‘मराठी बाणा’चे निर्माते श्री. अशोक हांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
‘प्रहार-मित्र’ भेट या उपक्रमात श्री. अशोक हांडे यांनी ‘प्रहार’ कार्यालयात येऊन संपादकीय विभाग आणि इतर सदस्यांशी दिलखुलास संवाद साधला.
यावेळी त्यांनी आपल्या यशाचे रहस्यही उलगडून दाखवले. रंगारी बदक चाळीपासून अमेरिकेपर्यंत जे यश त्यांना मिळाले, त्या यशामागे अनेकांचा आशीर्वाद, पाठिंबा आणि प्रोत्साहन आहे. माझ्या ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या पहिल्या शोची सुरुवात, श्री. नारायण राणे यांनी चेंबूर येथे खुल्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमातून झाली. त्या वेळी राणेसाहेब नगरसेवक होते. तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या सर्वानी मला सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले.
अगदी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक दिग्ग्जांचे प्रोत्साहन मिळाल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख श्री. हांडे यांनी या प्रसंगी केला. ‘प्रहार’ परिवारातर्फे श्री. हांडे यांचे स्वागत संपादकीय विभागाचे सदस्य श्री. समीर करंबे यांनी केले.
(श्री. अशोक हांडे यांची दिलखुलास सविस्तर मुलाखत रविवार, ४ जानेवारी २०१५च्या दैनिक ‘प्रहार’मध्ये प्रसिद्ध होईल.)