महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंचायत समितीचे सदस्य असलेल्या खेमा मधे या आपल्या समर्थकाचे अपहरण केले आहे, असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी केला.
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंचायत समितीचे सदस्य असलेल्या खेमा मधे या आपल्या समर्थकाचे अपहरण केले आहे, असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी केला. मनसेपासून आपल्याला धोका असल्यामुळे संरक्षण पुरवावे, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. मनसेच्या दादागिरीला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
मधे यांचा शोध घेतला असता ते कुठेच मिळाले नाही. उपसभापतींना विचारले असता, राज ठाकरे यांनी बोलावल्यामुळे त्यांना मुंबईला नेल्याचे सांगण्यात आले, असे जाधव यांनी सांगितले. पंचायत समितीच्या उपसभापतीवर अविश्वास ठराव आणण्यात येणार आहे. त्यामुळे मनसेने सूडभावनेतून आपल्या समर्थकांना पळवून नेण्याचे सत्र सुरू केले आहे. परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी यात लक्ष घालावे, असे आवाहन जाधव यांनी केले.
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मनसेवर टीका केली. ‘सहाय्यक आयुक्त वसंत ढोबळे यांच्यावरून राजकारण केले जात आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, फेरीवाल्यांचे आंदोलन झाले तर रस्त्यावर उतरण्याची भाषा मनसेने केली आहे. त्यातून मनसे काय साध्य करणार आहे, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. मनसेने तसे केल्यास सरकार कडक कारवाई करेल, असे मलिक यांनी सांगितले. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात मुंबई महापालिका अपयशी ठरल्याचा आरोपही मलिक यांनी केला.