कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत स्मार्ट सिटी आणि विकास निधीवरून राजकीय वातावरण तापले होते.
कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत स्मार्ट सिटी आणि विकास निधीवरून राजकीय वातावरण तापले होते. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या विकास परिषदेत कल्याण-डोंबिवली महापालिकेचा विकास आराखडा मांडत त्यासाठी ६ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहिर केले होते. मात्र निवडणुका झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात त्यांनी घुमजाव केल्याचा आरोप करत मनसेने शनिवारी डोंबिवलीत गाजर वाटप केले. मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीकरांना गाजर दाखवल्याचे सांगत यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांचा निषेध करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी निवडणूक काळात जाहिर केलेल्या या पॅकेजबद्दल काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी अधिवेशनात प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपण असे कुठलेही पॅकेज जाहीर केले नसून केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केलेल्या तरतूदीची माहिती दिली होती, असे सांगितले. त्यामुळे ही जनतेची फसवणूक असून मुख्यमंत्र्यांनी जनतेला गाजर दाखवले असल्याचा आरोप मनसेने केला. तसेच याचा निषेध करण्यासाठी नागरिकांना गाजर वाटप करण्यात आले. या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक, सागर जेधे, निलेश भोसले यांच्यासह अने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.