मनसेच्या आंदोलनात बेस्ट बसचे नुकसान होणार नाही, अशी हमी बेस्ट समिती सदस्य व मनसे नगरसेवक केदार उंबाळकर यांनी दिली होती.
मुंबई – मनसेच्या आंदोलनात बेस्ट बसचे नुकसान होणार नाही, अशी हमी बेस्ट समिती सदस्य व मनसे नगरसेवक केदार उंबाळकर यांनी दिली होती. मात्र आंदोलनात बेस्टच्या केवळ १९ बसचे झालेले नुकसान किरकोळ आहे. जर १९०० बसचे नुकसान झाले असते तर ते मनसेचे आंदोलन ठरले असते, असे उद्दाम उद्गार उंबाळकर यांनी मनसेची मुजोरी कायम असल्याचे दाखवून दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईसह महाराष्ट्रात काय होते हे सर्वानी पाहिले आहे. १२ फेब्रुवारीचे आंदोलन शांततेत करावे, असे आदेश ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे १९ बसचे झालेले नुकसान अत्यंत किरकोळ आहे. १९०० बसचे नुकसान झाले असते, तर मनसेच्या आंदोलनाचा उद्रेक लक्षात आला असता, असे उंबाळकर यांनी सांगितले.
मनसेने टोल विरोधात १२ फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा दिला होता. हे आंदोलन शांततेत करावे, असे आवाहन ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. मात्र या आंदोलनात भेंडीबाजार, दहिसर, कांदिवली, मालाड, पी. एल. लोखंडे मार्ग, बोरीवली आदी ठिकाणी १९ बसचे नुकसान झाले. १९ बसचे नुकसान होणे हे कार्यकर्त्यांना न पटणारे आहे. राज यांच्या आदेशानंतर मुंबईसह राज्यात काय होते, हे कोणाच्याही लक्षात येऊ शकते.
त्यामुळे बसचे नुकसान करण्यामागे मनसेचा कुठलाही हेतू नव्हता. या मोडतोडीमागे काही असामाजिकतत्वांचा हात असून मनसेला बदनाम करण्याचा कट होता, असा आरोप उंबाळकर यांनी केला.
अधिक नुकसान झाल्यास मनसेचा मान वाढतो, असा समज मनसेच्या पदाधिका-यांना झाला आहे. परंतु सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान हे करदात्यांचे आहे, याचा विसर मनसेला पडलेला आहे. १९०० बसचे नुकसान करून मुंबईकरांना काय दाखवायचे होते हे मनसेच सांगू शकेल. मात्र सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात मनसे आग्रही असते.
– प्रमोद माद्रेकर, सदस्य, बेस्ट समितीमनसेच्या आंदोलनात १९ बसचे नुकसान झाले. यात ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून जिल्हाधिका-यांकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिका-यां मार्फत संबंधित पक्षावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
– ए. एस. तांबोळी, प्रवक्ता, बेस्ट