दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने सलग तिस-या दिवशी टिटवाळा-कसारा मार्गावरील रेल्वेचा गोंधळ सुरूच आहे.
मुंबई- दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने सलग तिस-या दिवशी टिटवाळा-कसारा मार्गावरील रेल्वेचा गोंधळ सुरूच आहे. तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर आता एक ट्रॅक सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले असले तरी उपनगरीय लोकल गाडय़ांची वाहतूक टिटवाळय़ापर्यंतच सुरू ठेवण्यात आली आहे. तर एका ट्रॅकवरून लांबपल्ल्यांच्या गाडय़ा सोडण्यात येत असून त्यातून उपनगरीय प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी ‘प्रहार’शी बोलताना दिली.
मुंबईमध्ये पावसाने हंगामा सुरू करण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी नागपूर दुरांतोचे डबे वाशिंद ते आसनगाव दरम्यान रुळावरून घसरले होते. त्यामुळे कसारा- टिटवाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यापाठोपाठ मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपल्याने मध्य रेल्वे खोळंबली. बुधवारीदेखील मध्य रेल्वेची वाहतूक संथगतीने टिटवाळय़ापर्यंत सुरू होती. टिटवाळा-कसारा मार्गावर रेल्वेच्या पथकाला अपघातग्रस्त दुरांतो एक्स्प्रेसचे डबे ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हटवण्यात यश आले होते. डबे हटवण्यात आले असले तरी रेल्वे मार्गावरील मातीचा ढीग हाटविण्यात खूप अडचणी येत आहेत. सलग तिस-या दिवशी वाहतूक ठप्प असल्याने कसारा, आसनगाव येथे राहणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशासह उत्तरेकडे जाण्यासाठी एक ट्रॅक सुरू करण्यात आला आहे. त्यावरूनच लांब पल्ल्यांच्या गाडय़ा सोडण्यात येत आहेत.
दोन दिवसांत होणार वाहतूक सुरळीत
पावसाळी दिवस त्यात ज्या ठिकाणी डबे घसरले होते तो भुसभुसीत काळय़ा मातीचा भाग आहेत. तेथे काम करणे रेल्वे कर्मचा-यांना खूप त्रासाचे होत आहे. रेल्वे कर्मचा-यांनी अथक प्रयत्न करून आता एक रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला आहे. त्यावरून लांब पल्ल्यांच्या गाडय़ा सोडण्यात येत आहे. त्यातून उपनगरीय प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. उपनगरीय रेल्वे गाडय़ा टिटवाळय़ांपर्यंत चालविण्यात येत असून टिटवाळा ते आसनगाव दरम्यान एसटीच्या जादा बस सोडण्यात आल्या आहेत. – सुनील उदासी, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.