मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २३० जागांवर तब्बल ७१ टक्के, तर मिझोरममध्ये ८० टक्के मतदान झाले आहे.
भोपाळ/ऐजॉल- मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २३० जागांवर तब्बल ७१ टक्के, तर मिझोरममध्ये ४० जागांसाठी ८० टक्के मतदान झाले आहे.
मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागा आणि मिझोराममध्ये ४० जागांसाठी सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र रस्ते खराब असल्याच्या कारणावरुन चंबळ खो-यात सात जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. १२ ठिकाणी गोळीबार झाला. तर दोन ठिकाणी मतदान यंत्र पळवण्याचे प्रकार घडले.
होसंगाबाद, रतलाम, ग्वालियर, रायसेन (४), मोरेना, उमेरी, बेतूल आणि इटारसी येथे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जयदीप गोविंद यांनी सांगितले. भिंड आणि मोरेना येथे दोन जमावामध्ये हाणामारी झाली. यात २४ जण जखमी झाल्याचे गोविंद यांनी सांगितले. सर्वजण २० ते ३० वयोगटातील आहेत.
जिजू का पुरा भागात झालेल्या गोळीबारात राम बरोसी कुशवाह जबर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी ग्वालियर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तर मोरेना विधानसभा क्षेत्रातील नाका का पुरा येथे झालेल्या गोळीबारात बालकृष्णा पटेल (५४), सुरेश सिंग (४६) आणि हैदल सिंग(२३) जखमी झाले. तर मतदान यंत्र पळवणा-या चार संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अतेर विधानसभा क्षेत्रातील सियावली मतदान केंद्राजवळ झालेल्या गोळीबारात सुरेंद्र सिंग (३२) हा बीएसपीचा कार्यकर्ता जखमी झाला. खूर्द येथही गोळीबार झाल्याचे समजते.
दरम्यान, कटनी जिल्ह्यात एका मतदान अधिका-याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी मतदान होत आहे. यात राज्यातील ५१ जिल्ह्यांत ५३ हजार ९४६ मतदान केंद्रांवर चार कोटी ६६ लाखाहून अधिक मतदार एकूण दोन हजार ५८३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रांमध्ये बंद करणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी ही निवडणूक अग्निपरिक्षा ठरणार आहे. शिवराज सिंह चौहान हे बुधनी आणि विदिशा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मतदानापूर्वी त्यांनी सपत्नीक मंदिरात जाऊन पूजा केली. भाजपचे शिवराजसिंह चौहान हॅटट्रिक करणार की काँग्रेस १० वर्षानंतर पुन्हा सत्ता काबीज करणार याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे.
मिझोराम विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान होत आहे. येथे १४२ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री लालथनहावला यांच्यासह ११ विद्यमान मंत्री आपले नशीब पुन्हा अजमावत आहेत.