तृतीयपंथीयांना तृतीयपंथी म्हणून मतदान करण्याची पहिल्यांदा संधी आगामी लोकसभा निवडणुकीत मिळणार आहे.
मुंबई – तृतीयपंथीयांना तृतीयपंथी म्हणून मतदान करण्याची पहिल्यांदा संधी आगामी लोकसभा निवडणुकीत मिळणार आहे. या निवडणुकांसाठी तयार केलेल्या मतदार यादीत त्यांची तृतीयपंथी म्हणून नोंद केली आहे.
नुकतीच मुंबई शहराची अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी शैला ए. यांनी प्रसिद्ध केली. या यादीत ३३ जणांनी तृतीयपंथी मतदार अशी नोंदणी केली. यापुर्वी तृतीयपंथीयांना तृतीयपंथी म्हणून मतदान करता येत नव्हते. दरम्यान तृतीयपंथी म्हणून मिळालेला मतदानाचा अधिकारी स्वागतहार्य असल्याची प्रतिक्रीया तृतीयपंथी समाजातून उमटत आहे.
समाजातील प्रत्येक घटकास मतदानाचा अधिकार आहे. त्यादृष्टीने स्त्री आणि पुरुष मतदान करतात. मात्र मतदानापासून तृतीयपंथी वंचित होते. मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी त्यांनी कित्येक वर्षापासून लढा देत आहेत.
मतदार यादीत तृतीयपंथीयांची नोंद स्त्री किंवा पुरुष करावी हा पेच निर्माण होत होता. त्यामुळे त्यांची नावे मतदार यादीत नोंदवली जात नव्हती. या विरोधात संघर्ष केल्यानंतर तृतीयपंथीयांना मतदानाचा तृतीयपंथी म्हणून अधिकार देण्याचा निर्णय सरकारने घेतला. जिल्हाधिका-यांनी मतदारांची जी यादी जाहीर केली आहे त्यात ३३ तृतीयपंथीयांनी मतदार म्हणून नोंदणी केली. याबाबत आगामी काळात आणखीन जागृती केली जाणार आहे.
सरकारने तृतीयपंथीयांनाही समाजातील एक घटक म्हणून मान्यता दिली आहे. मतदानाचा अधिकार देऊन आमचा सन्मान केला आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या समाजाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. आता जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी. शिवाय मतदानाचा अधिकारही बजवावा. त्यासाठी तृतीयपंथीयांच्या वेगवेगळ्या संघटना पुढाकार घेतील.
– सलमा खान, अध्यक्ष, महाराष्ट्र तृतीयपंथी समाज संघटना