मतदार याद्यांमध्ये झालेल्या या घोळप्रकरणी निवडणूक आयोगाचे आयुक्त एच.एस.ब्रम्हा यांनी याबाबत शुक्रवारी माफी मागितली.
नवी दिल्ली– राज्यात गुरुवारी झालेल्या मतदानापेक्षाही मतदार याद्यांच्या घोळाचे प्रमाण अधिक दिसून आले. ‘ना नाव ना फोटो कधी सपशेल चुकीचेच नाव’ अशा मतदार यादीतील घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे. मतदार याद्यांमध्ये झालेल्या या घोळप्रकरणी निवडणूक आयोगाचे आयुक्त एच.एस.ब्रम्हा यांनी शुक्रवारी माफी मागितली.
‘प्रत्येक भारतीय व्यक्तीला मतदान करता यावे ही आमची जबाबदारी आहे. सगळ्याची नावे यादीत येतील, त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल ही आमची जबाबदारी होती. मात्र समन्वयाच्या अभावामुळे हे घडले असल्याचीकबुली त्यांनी यावेळी दिली. परंतु विधानसभा निव़डणुकीपूर्वी आम्ही या चुका सुधारु असं ब्रम्हा यांनी म्हटलं आहे. तर या प्रक्रियेत राहिलेल्या चुकांचा शोध घेऊन त्यावर योग्य ती कारवाई होणे जरुरीच असल्याचं निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
याचबरोबर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मतदार यादीतील घोळामुळे मतदान न करता आलेल्या व्यक्तींबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री स्वत:ही निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी दाद मागणार आहेत. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितले.
मुंबईसह महाराष्ट्रात गुरुवारी तिस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी सामान्य मुंबईकरांसोबतच अनेक सेलिब्रेटी व्यक्तींनाही मतदानापासून वंचित रहावे लागले. सकाळच्या सत्रातच नावे गहाळ झाल्याच्या तक्रारींना सुरुवात झाली होती. राज्यातील आधीच्या दोन टप्प्यातही अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ दिसून आला होता. दरम्यान याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.