मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून आज रविवारी ९ मार्च रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून आज रविवारी ९ मार्च रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.
ज्यांनी मतदार म्हणून आपले नाव नोंदवलेले नाही किंवा ज्यांचे नाव मतदार यादीतून गायब आहे अशा मतदारांना निवडणूक आयोगाने रविवारी जवळच्या मतदान केंद्रात जाऊन नाव नोंदवण्याची संधी दिली आहे. या विशेष मोहिमेतंर्गत मतदारांना मतदान केंद्रात मतदारांची यादी दाखवण्यात येईल. या यादीत नाव नसेल तर, अर्ज भरुन मतदार म्हणून नाव नोंदवण्याची ही अखेरची संधी आहे. मतदार म्हणून नोंदणी करताना, रहिवास आणि जन्म पुरावा आवश्यक आहे.
या निवडणूकीत नुसते मतदार ओळखपत्र असून भागणार नाही तर, तुमचे नाव मतदार यादीत असले पाहिज तरच तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल. संपूर्ण देशात सात एप्रिल ते बारा मे अशी नऊ टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यंदा ८१ कोटी ४० लाख लोक मतदान करतील यात दहा कोटी नव मतदारांचा समावेश आहे.