मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांचा प्रश्न आक्रमकपणे हातात घेऊन तो सोडविण्यासाठी धाडसी भूमिका घेणारे आमदार नितेश राणे यांच्याकडे सर्व मच्छीमार मोठय़ा अपेक्षेने पहात आहेत. येत्या २५ जुलै रोजी विधान भवनावर धडकणा-या मच्छीमारांच्या मोर्चामध्ये आमच्या सोबत सहभागी होऊन आमच्या मागण्या तडीस नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या पदाधिका-यांनी आज केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्याची संपूर्ण राज्यात चर्चा झाली. सर्वच मच्छीमारांना नितेश राणे यांची भूमिका पटली. म्हणून महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने २५ जुलै रोजी निघणा-या मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण समितीच्या पदाधिका-यांनी दिले. मच्छीमारांच्या घरांच्या व वापरातील जमिनी मच्छीमारांच्या नावे करा, मुंबईतील मच्छी विक्रेत्या महिलांच्या नावावर मार्केटमधील गाळे करून द्या, मुंबई विकास आराखडय़ातून कोळीवाडे वाचवा, सीआयझेड कायद्याची कडक अंमलबजावणी करा यासह अनेक हक्काच्या मागण्यांसाठी २५ जुलै रोजी विधान भवनावर मोर्चा निघणार आहे.
त्याचे निमंत्रण देण्यासाठी वेलेरीन पांडरीक, शॉन कोलासो, गिल्बट गर्या, कँस्लीन डुंगा या पदाधिका-यांनी नितेश राणे यांची भेट घेतली. आपण हा प्रश्न विधान सभेतही लावून धरावा, अशी विनंती त्यांनी राणे यांना केली. नितेश राणे यांनी त्यांचे सर्व प्रश्न समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.