लाल दिव्याच्या हव्यासापोटी संदेश पारकर यांनी कणकवलीकरांचा अपमान करू नये. आपल्याला जो पक्ष लाल दिवा देईल; त्या पक्षात प्रवेश करणार, असे सांगून काँग्रेसकडून मोकळीक घेणा-या पारकर यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
कणकवली- लाल दिव्याच्या हव्यासापोटी संदेश पारकर यांनी कणकवलीकरांचा अपमान करू नये. आपल्याला जो पक्ष लाल दिवा देईल; त्या पक्षात प्रवेश करणार, असे सांगून काँग्रेसकडून मोकळीक घेणा-या पारकर यांना आमच्या शुभेच्छा आहेत, मात्र ज्या पक्षाच्या पदाधिका-यांसोबत मांडीला मांडी लावून बसता त्या पक्षात दीपक केसरकर आहेत, हे विसरू नका.
काँग्रेस पक्षाला आणि नेते नारायण राणे यांना तुम्हाला लाल दिवा देणे शक्य होते तेव्हा तो त्यांनी दिलेला आहे. आम्ही आमचा शब्द पाळलेला आहे, मात्र याच लाल दिव्याच्या हव्यासापोटी पारकर यांचा संयम संपला असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली. जे लोक टेंडर आणि बांधकामांसाठी एकत्र येतात ते लोक कणकवली शहराच्या विकासासाठी एकत्र आले असते तर कणकवलीकरांचा असा अपमान झाला नसता, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.
शिवसेनेने काँग्रेसच्या नगरसेवकांची मिरवणूक काढण्यापेक्षा हिंमत असेल तर राजीनामे देऊन शिवसेनेच्या चिन्हावर नगरसेवकांना निवडून आणावे आणि खुशाल मिरवणूक काढावी, असे आव्हान शिवसेनेला दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाची पातळी किती खालावली आहे, हे यानिमित्ताने पाहायला मिळाले. राणेसाहेब किंवा राणे कुटुंबाची काय चूक की या गल्लीतल्या भांडणात काँग्रेस नेते नारायण राणे यांचे नाव घुसडले गेले, हेच मला कळले नाही. ते पाहून मनस्वी दु:ख झाले. हे कणकवली गावातले भांडण नलावडे गट विरुद्ध पारकर गटातील आहे.
दोन जुने मित्र, जुने सहकारी या दोन गटांत असलेला अहंकार आणि स्पर्धा यामुळेच या नाटय़मय घटना घडल्या. निवडणुकीपूर्वी जेव्हा संदेश पारकर आणि अॅड. प्रज्ञा खोत भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की, आमचे भांडण नलावडे गटाशी आहे. आम्ही आजही तुम्हाला मानतो. राणेसाहेबांना मानतो. भविष्यातही मानणार. राणेसाहेब किंवा नितेश राणे यांच्याशी कोणतेही वैर नाही.
माजी मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या आणि ५० वष्रे राजकारणात राज्याचे नेतृत्व करणा-या नेत्याचे नाव या गल्लीतल्या भांडणात जोडणे चुकीचे आहे. हे भांडण दोन्ही गटही स्वीकारतात. त्यात राणे कुटुंबीय कुठून आले तेच कळत नसल्याची खंत आमदार नितेश राणे यांनी व्यक्तकेली.