भीषण दुष्काळानंतर सरकारने जाहीर केलेली मदत अनेक खेटे घालूनही न मिळाल्याने निराश झालेल्या माधव कदम या शेतक-याने ऐन होळीच्या दिवशी मंत्रालयाच्या दारातच विष प्राशन केले होते
मुंबई – भीषण दुष्काळानंतर सरकारने जाहीर केलेली मदत अनेक खेटे घालूनही न मिळाल्याने निराश झालेल्या माधव कदम या शेतक-याने ऐन होळीच्या दिवशी मंत्रालयाच्या दारातच विष प्राशन केले होते. कदम यांना वेळीच उपचार न मिळाल्याने शनिवारी त्यांचे जी. टी. रुग्णालयात निधन झाले.
नैराश्याने ग्रासलेल्या कदम याने २३ मार्च रोजी मंत्रालयाच्या दारात विष प्राशन केले होते. त्यानंतर कदम याला वेळेत रुग्णालयात दाखल केले नाही. ते तडफडू लागल्यानंतर त्याला जी. टी. रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांच्या अंगात विष भिनल्याने डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडले अन् शनिवारी त्यांचे निधन झाले.
नांदेड जिल्ह्यातील जिनापुरी येथील कदम यांच्याकडे ९ गुंठे कोरडवाहू जमीन आहे. पेरणी वाया गेली. सरकारी मदत कदम यांच्यापर्यंत पोहचलीच नाही. त्याने तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करूनही कोणताही फायदा झाला नाही. अखेर त्यांनी मंत्रालयात येऊन मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. तरीही ती मिळाली नाही. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नांदेडकडे पाठवले आहे.