लखलखणा-या एलईडी दिव्यांनी मंत्रालय लवकरच उजळून निघणार आहे. मंत्रालयात एलईडी दिवे बसवण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
मुंबई – लखलखणा-या एलईडी दिव्यांनी मंत्रालय लवकरच उजळून निघणार आहे. मंत्रालयात एलईडी दिवे बसवण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. हे दिवे ऊर्जा विभागामार्फत लावले जाणार असून त्याची चाचपणी सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील सरकारी कार्यालयांतही केवळ ‘एलईडी’चाच वापर केला जाईल, असेही ते म्हणाले.
वीज बचतीसाठी एलईडी दिव्यांचा वापर करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्याची सुरुवात सरकारी कार्यालयांतून करण्यात येणार आहे. सर्वप्रथम मंत्रालयातच एलईडी दिव्यांचाच वापर सुरू होईल. तशा सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के विजेची बचत होते, असा युक्तिवाद ऊर्जामंत्र्यांनी केला आहे. तसेच जिल्हा-तालुका स्तरावरील प्रत्येक सरकारी कार्यालयातही एलईडी दिव्यांचा वापर केला जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजनातून ४ ते ५ टक्के निधी राखीव ठेवला जाणार आहे. सरकारी कार्यालयांत ‘एलईडी’चा वापर होत असताना तो घरा घरातही होण्यासाठी ऊर्जा विभाग प्रयत्न करेल. त्यासाठी ऊर्जा विभागाकडून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. वीज बिलाच्या मागे तशी जाहिरात करून एलईडी दिवे वापरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. राज्यात सध्या विजेची स्थिती पाहता त्याला जनतेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
पथदिवेही एलईडीचे
मरिन ड्राईव्हवर सध्या एलईडी दिव्यांचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. त्यासाठी केंद्राची ईएसएल ही कंपनी सहकार्य करत आहे. त्याच धर्तीवर राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात एलईडीचे पथदिवे वापरले जातील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्याचा सर्व देखभाल खर्च ईएसएल कंपनीच्या माध्यमातून होईल. सात वर्षासाठी हा करार असेल.