नांदेडमधील शेतकरी माधव कदम याने मंत्रालयाच्या दारात केलेली आत्महत्या महाराष्ट्रासाठी काळिमा फासणारी घटना आहे, असे सांगत विरोधकांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.
मुंबई – नांदेडमधील शेतकरी माधव कदम याने मंत्रालयाच्या दारात केलेली आत्महत्या महाराष्ट्रासाठी काळिमा फासणारी घटना आहे, असे सांगत विरोधकांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.
विरोधी पक्षाने माधवला विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्याची केलेली मागणी सरकारने फेटाळून लावल्याने हे सरकार संवेदनाहीन असल्याचा आरोप करत विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने विधानसभा अध्यक्षांनी कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चौथ्या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मागील काही दिवसांत घडलेल्या सामाजिक प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. शेतकरी कर्जमाफीसाठी शेतक-यांना मंत्रालयासमोर येऊन आत्महत्या करण्याची वेळ आल्याची घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी असल्याचे ते म्हणाले.
आत्महत्या केलेल्या शेतक-याला श्रद्धांजलीही नाही
मुंबई – विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना एखाद्या गुन्हेगाराचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला तरी सभागृहातील इतर कामकाज तहकूब करून त्यावर चर्चा केली जाते. मात्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सरकारने घोषित केलेली मदत मिळाली नाही म्हणून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी माधव कदम याने आत्महत्या केली असताना त्यावर चर्चा घेण्याऐवजी सरकारने चर्चेपासून पळ काढल्याबद्दल सभागृहातील सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
मंत्रालयाच्या दारात आत्महत्या केलेले शेतकरी माधव कदम यांना श्रद्धांजली तरी वाहण्यात यावी, अशी विनंती करून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी सर्व सदस्यांना दोन मिनिटे शांत उभे राहण्याची विनंती केली. मात्र शिवसेना-भाजपाचे सदस्य यावेळी उभे राहिले नाहीत. याबद्दल विरोधी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली.