गणेशोत्सव उत्सव मंडळांकडून रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही, याचे लेखी प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे.
मुंबई- गणेशोत्सव उत्सव मंडळांकडून रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही, याचे लेखी प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. सर्वच उत्सव मंडळांनी विविध परवानग्यांसह हमीपत्र सादर करावे, असा फतवा पालिकेने विभागीय कार्यालयांना पाठवून त्याच्या त्वरित अंमलबजावणीचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी दिले.
उत्सव काळात मंडळांकडून बांधल्या जाणा-या मंडपांमुळे नागरिकांना त्रास झाल्यास त्यांना आता तक्रार नोंदवता येणार आहे. या नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत एक तक्रार अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
गणेशोत्सवासाठी रस्त्यांवर उभारण्यात येणा-या मंडपांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याचे सांगत न्यायालयाने महापालिकेला ठोस धोरण बनवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने गणेशोत्सवासाठी नवे मार्गदर्शक धोरण बनवले असून नऊ पानांचा मसुदाच सर्व विभाग कार्यालयांना पाठवून त्याप्रमाणे अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकलेल्या धोरणात प्रत्येक गणेशोत्सव मंडळाकडून वाहतूक कोंडी होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या मार्गावर मंडप असेल व वाहतूक कोंडी होणार असेल तर पर्यायी वाहतुकीची व्यवस्था केली जावी. या मंडपाचा परिसराचा वाहतुकीचा नकाशासह वाहतूक व पोलिसांच्या परवानगीची कागदपत्रेही मंडळांकडून घेतली जावीत, असे म्हटले आहे.
महापालिकेचे उपायुक्त (उत्सव) आनंद वाघ्राळकर यांच्याशी संपर्क साधता,‘नवे धोरण केवळ गणेशोत्सवासाठी बनवलेले नसून सर्वच उत्सवांसाठी ते तयार केल्याचे सांगितले. त्यामुळे उत्सव मंडळांना आता मंडपाची लांबी, रुंदी, उंचीसह सर्वच माहिती महापालिकेला सादर केल्याशिवाय परवानगी मिळणार नाही. तसे परिपत्रक सर्वच विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना पाठवून त्यानुसार अंमलबजावणीचे निर्देश आयुक्तांनी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
खड्डे खणल्यासही दंड
गणेशोत्सव मंडळांकडून रस्त्यांवर खड्डे खणल्यास त्यांना दंड आकारला जातो. परंतु ठोस धोरण नसल्याने तसेच अवघ्या ५१ रुपयांत ही परवानगी दिली जात असल्याने खड्डे पाडल्यास त्याचा खर्च वसूल करताना पालिकेपुढे अडचणी यायच्या.
परंतु नवीन धोरणात खड्डे मारण्यास बंदी घालण्यात आली असून खड्डे मारल्यास दंड आकारण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या दंडाची रक्कमही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उत्सव मंडळांकडून नव्या धोरणानुसार दंडवसुली केली जाणार असून मंडळांना परवानगीपूर्वी अतिरिक्त रक्कम जमा करावी लागणार आहे.