लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही भ्रष्टाचाराविरोधात तरुण तक्रारदारांचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई – देशातील तरुण पिढी दिवसेंदिवस अधिक सजग आणि स्मार्ट होत चालली आहे. देशातील भ्रष्टाचाराच्या नावाने एकीकडे ओरड सुरु असताना आजची पिढी मात्र हा भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याच्या दिशेने पावले उचलताना दिसत आहे. देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणा-या भ्रष्टाचाराविरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवताना दिसत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या वर्षी आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींपैकी अर्ध्याहून अधिक तक्रारी या ३५ वर्षाहून कमी वयोगटातील तरुणांनी केल्याचे माहितीतून समोर आले आले आहे. दिवसेंदिवस तरुण तक्रारदारांचे प्रमाणही वाढत आहे.
५१ टक्के (३३७ तक्रारी)तक्रारदार हे ३५ हून कमी वयोगटातील आहेत तर २४ टक्के(१६३ तक्रारी) तक्रारदार ३६ ते ४५ वयोगटातील, ४६ ते ६० वयोगटातील २० टक्के म्हणजेच १३१ तक्रारदार आहेत आणि ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ३२ तक्रारदारांनी एसीबीकडे भ्रष्टाचारविरोधात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे तक्रार करणा-या तक्रारदारांची वयोमर्यादा पाहिली, तर ५१ टक्के तक्रारदारांचे वय ३५ वर्षापेक्षा कमी आहे.
एसीबीकडे दाखल झालेल्या सर्वाधिक तक्रारी या पोलीस कर्मचा-यांविरोधात (१८५) आल्या असून त्या खालोखाल अभियंता(३२), शिक्षक(२६), डॉक्टर(११), वकील(५), सरपंच(६), नगरसेवक(२), तलाठी(८६) आणि ६७६ तक्रारी इतर सरकारी कर्मचा-यांविरोधात आल्या आहेत.
देशाची राजधानी मुंबईतून एसीबीकडे दाखल झालेल्या तक्रारींचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कमी असल्याचे एसीबीच्या माहितीतून उघड झाले आहे. मुंबईत भ्रष्टाचाराच्या ३५ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तर शेजारील ठाणे जिल्ह्यात ८०, पुणे(१२५), नाशिक(९७), नागपूर(९२), अमरावती(६८), औरंगाबाद(९७) आणि नांदेडमध्ये ६५ भ्रष्टाचाराच्या तक्रारींची नोद आहे.
या वर्षापासून महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोबाईल अॅप्लिकेशन सुरु केले आहे. संपूर्ण राज्यभरातून या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातूनही या अॅपद्वारे भ्रष्टाराच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येत आहेत.
एकीकडे भ्रष्टाचाराविरोधात तरुणाई सजग होताना दिसत असली तरी तितक्याच संख्येने सरकारी नोकरीतील तरुण नोकरदार वर्ग भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकत आहे. हे चिंताजनक असल्याचे एसीबीच्या अधिका-यांनी यावेळी सांगितले.
तक्रारदारांची संख्या
वरिष्ठ नागरिक – २१
अपंग व्यक्ती- दोन
महिला तक्रारदार- २१
अनुसूचित जातीमधील नागरिक- ३१
अनुसूचित जमातीतील नागरिक- १७
इतर- ५६७
भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवे अॅप सुरु केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही अवघ्या मिनिटात तुमची तक्रार दाखल करु शकता. Acbmaharashtra.net वर हे अॅप आहे.
तसेच acbmaharashtra.gov.on वर तुम्ही लॉग इनही करु शकता
ईमेल पाठवा – acbwebmail@mahapolice.gov.in
कॉल करा – १०६४ अथवा ०२२- २४९२१२१२
फॅक्स पाठवा – ०२२- २४९२२६१८
अथवा पत्र लिहूनही तुम्ही तुमची तक्रार दाखल करु शकता यासाठी – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ९१, सर पोचखानावाला रोड, वरळी पोलीस कॅम्प, वरळी मुंबई – ४०००३०