सत्ता ही भ्रष्ट माणसाला अधिक भ्रष्ट करत असते, असे म्हणतात ते काही खोटे नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता तथा अम्मा यांच्या संपत्तीचे एकाहून एक वरचढ किस्से ऐकून इतर अनेक सत्ताधा-यांप्रमाणेच भ्रष्ट आहेत, अशी सर्वसाधारण माणसाची भावना होती. पण…
सत्ता ही भ्रष्ट माणसाला अधिक भ्रष्ट करत असते, असे म्हणतात ते काही खोटे नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता तथा अम्मा यांच्या संपत्तीचे एकाहून एक वरचढ किस्से ऐकून इतर अनेक सत्ताधा-यांप्रमाणेच भ्रष्ट आहेत, अशी सर्वसाधारण माणसाची भावना होती. पण त्यांचा भ्रष्टाचार पाहता त्या सर्व भ्रष्टाचा-यांच्या मुकुटमणीच ठरल्या आहेत, असे म्हणावे लागेल. या भ्रष्टाचारी सत्ताधा-यांना, मोक्याच्या पदावरील सरकारी अधिका-यांना आणि कर्मचा-यांना असे वाटत असते की, आपला भ्रष्टाचार, लाचखोरी आणि गरप्रकार असेच सुरू राहणार आहेत, आपले कोण वाईट करणार, आपल्याला कोण हात लावणार, माणूस जेवढा उच्च पदस्थ तेवढी त्याची ही भावना प्रबळ असते. जयललिता तर तामिळनाडूसारख्या एका मोठय़ा व महत्त्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्री. तशातच त्या तीन वेळा मुख्यमंत्री झाल्या. चित्रपट अभिनेत्री, प्रभावी व्यक्तिमत्त्व, आक्रमक आणि आत्मकेंद्री स्वभाव व त्यात हाती अमर्याद व निरंकुश सत्ता यामुळे जयललिता यांचा भ्रष्टाचाराचा वारू चौखूर उधळला. मुख्यमंत्री असल्यामुळे आपले कोण, काय वाईट करू शकणार, या भ्रमात जयललिता वावरत होत्या; पण या देशात राजेशाही नसून लोकशाही आहे, घटना आहे व सर्वाना समान लागू असणारे कायदे आहेत, न्याय आहे, न्यायालये आहेत हेच जणू काय जयललिता विसरून गेल्या होत्या; पण सुमारे ६६ कोटींच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी विशेष न्यायालयाने त्यांना चार वष्रे कारावासाची शिक्षा व तब्बल १०० कोटींचा दंड ठोठावल्यानंतर त्या भानावर आल्या असतील व लोकशाहीच्या या सर्व घटकांची त्यांना आठवण झाली असेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण कायद्यातील पळवाटा आपल्याला वाचवतील, याची संपूर्ण जाणीव जयललिता यांना बेहिशोबी मालमत्ता गोळा करताना असेलच. या आधी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांना चारा घोटाळ्याप्रकरणी अनुक्रमे ५ व ४ वर्षाची शिक्षा झाली होती. मात्र, लालू आता जामिनावर बाहेर आहेत, हे या पळवाटेचे ढळढळीत उदाहरण आहे. जयललितांसह त्यांच्या तीन सहका-यांना न्या. जॉन डिकुन्हा यांनी कठोर शिक्षा ठोठावली. ए. शशिकला, जे. इलावरसी आणि व्ही. एन. सुधाकरन यांना चार वष्रे तुरुंगवासाची व प्रत्येकी १० कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास सर्वाना आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. या खटल्याची अनेक वैशिष्टये आहेत. हा खटला १८ वर्षापूर्वी सुरू झाला. खटला नि:पक्षपातीपणे चालावा, यासाठी तो बंगळुरू येथे हलवण्यात आला. या खटल्याचा पाठपुरावा द्रमुकचे नेते करुणानिधी व भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केला. न्यायालयाने हा निकाल देऊन जयललिता यांनी गेल्या दोन दशकात उभारलेल्या साम्राज्याला दणका दिला आहे. या निकालामुळे जयललिता यांनी मुख्यमंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही गमावली आहे. या निर्णयामुळे जयललिता दहा वष्रे राजकारणातून हद्दपार होणार आहेत. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीचे पद रद्द केले जावे, असे एका निकालाद्वारे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांना शिक्षेची ४ वर्षे आणि त्यापुढे ६ वष्रे अशी १० वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. जयललिता यांचे आजचे वय लक्षात घेता त्या राजकारणातून पूर्णपणे अस्तंगत होण्याचीच शक्यता अधिक आहे. या आधीही जयललिता या दोन खटल्यांत दोषी आढळल्या होत्या; पण त्यावेळी त्या मुख्यमंत्री नव्हत्या. त्या खटल्यातून त्या सुटल्या होत्या. जयललिता यांच्या मालमत्तेचे जे किस्से सांगितले जातात ते पाहता या प्रकरणांची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्याला शिक्षा आणि दंड ठोठावून न्यायालयाने सगळय़ाच व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत, हेच दाखवून दिले आहे. देशात अनेक पक्षांचे राजकारणी आणि सत्तेवर असलेले उच्चपदस्थ तसेच वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्टाचार करतात, कोटय़वधींची माया करतात. त्यांना या निर्णयामुळे काही प्रमाणात तरी जरब बसेल, अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही. राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराच्या व त्यांनी मिळवलेल्या संपत्तीच्या कहाण्या प्रसिद्ध होत असतात; पण जयललिता यांच्या कहाण्या अरबी भाषेतील कहाण्यांप्रमाणे सुरस आणि सरस आहेत. या कहाण्यांवर प्रथम कुणाचा विश्वासही बसणार नाही. इतक्या त्या अद्भूत आहेत. कित्येकदा वास्तव हे कादंबरीपेक्षा अद्भूत असते, हे जयललिता यांचे किस्से ऐकले किंवा वाचले की पटते. जयललितांकडे २८ किलो सोने आहे, त्यांच्याकडे १२ हजार किमती साडय़ा आहेत. त्यांच्या ३२ कंपन्या आहेत तसेच शंभराहून अधिक खाती आहेत. त्यांच्याकडे शेकडो पादत्राणे असल्याचे सांगण्यात येते. आता त्यांच्याकडे १२ हजार साडया असतील तर या साडयांना साजेशा पादत्राणांच्या जोडया असल्या तर नवल काय? जयललितांकडे १२ हजार साडया असतील तर त्या ठेवण्यासाठी जागा व अलमारी किती लागतील, याची कल्पना करावी. त्यांच्याकडे २८ किलो सोने आणि ३२ कंपन्या असतील तर १०० बँक खाती असणारच. जयललिता यांची गेल्या काही दशकांची कारकीर्द जरी राजकीय असली तरी दक्षिणेतील अनेक राजकारण्यांप्रमाणे त्यांची वाटचाल चित्रपटांपासून सुरू झाली. तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते जी. रामचंद्रन हे लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते व जनमानसावर त्यांची मोठी पकड होती. त्यानंतर ते राजकारणात येऊन तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. जयललिता याही त्या काळी रामचंद्रन यांच्याबरोबर अभिनेत्री होत्या व त्यांच्या अगदी जवळच्या मैत्रिणही होत्या. रामचंद्रन यांची मैत्रिण आणि अभिनेत्री यामुळे रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर जयललिता यांचा जनमानसावरचा प्रभाव वाढला व दक्षिणेतील कलाकारांच्या परंपरेनुसार त्या राजकारणातही आल्या व नंतर मुख्यमंत्रीही झाल्या. मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्या अनेकदा वादग्रस्त ठरल्या तरी त्यांची अण्णाद्रमुक पक्ष आणि लोकांवरील पकड कायम होती. त्यामुळेच त्यांनी द्रमुककडून सत्ता खेचून घेतली. त्यांनी राज्यात एकहाती सत्ता राबवली. पक्षात आणि प्रशासनात कुणाला वरचढ होऊ दिले नाही. आता त्यांच्या अनुपस्थितीत तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती वेगळी वळणे घेण्याची शक्यता आहे. द्रमुक पक्ष नजीकच्या काळात जोर करण्याचा प्रयत्न करील; पण केंद्रात सत्तेवर आलेला भाजप तामिळनाडूतील नव्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करील. अण्णा द्रमुक पक्षातही रस्सीखेच सुरू होईल. एकंदरीत जयललिता यांना झालेल्या शिक्षेमुळे तामिळनाडूमध्ये राजकीय परिस्थिती कोणती वळणे घेतात, हे पहावे लागेल.
[EPSB]
वातावरण काँग्रेसलाच अनुकूल
विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या सत्तेची चावी लोक आपल्याकडेच देणार आहेत, त्यासाठी मी झुकते माप का घेऊ. निवडून तर मीच येणार, आमचाच मुख्यमंत्री होणार आहे, अशा दिवास्वप्नात रमणा-या भाजप आणि शिवसेना यांची राजकीय युती अखेर गुरुवारी संपुष्टात आली.
[/EPSB]