भ्रष्टाचाराबद्दल भारतात जेवढा आरडाओरडा होतो तेवढा इतर देशांमध्ये होत नाही. तिथे खळबळ उडते आणि कारवाई तर त्याहूनही खळबळजनकरित्या होते. भारतात चर्चा होते आणि कारवाईचे नाटक होते. सरकारी, निमसरकारी कार्यालये, रिक्षा-टॅक्सीवाले सगळयांना जास्तीचा पैसा हवा असतो. लाच घेणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो देणे हासुद्धा गुन्हा आहे. आपले काम लवकर करण्यासाठी आणि कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी लोक लाच देणेही पसंत करतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीने लाच देण्याचा प्रयत्न केला आणि केजरीवाल यांनी ही गोष्ट भर सभेत सांगितल्याने केजरीवालांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण कारवाई होईल याची शाश्वती नाही. कारण भ्रष्टाचाराचे योग्य नियोजन करायला शिकलेला हा देश आहे.
भारतात अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणात लोकांना भ्रष्टाचारापोटी किती रक्कम वर्षाला द्यावी लागते, याची माहिती प्रसिद्ध झाली होती. अंदाज नाही तर सरासरी आकडेवारी सापडली आहे. देशातील लोक त्यांच्या एकूण कमाईच्या सरासरी १३ टक्के पैसे लाच देण्यासाठी खर्च करतात. लाच घेणा-यांची जशी संख्या मोठी आहे तसेच लाच देणा-यांचीही संख्या मोठी आहे. लाचबद्दल आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलताना लाच देऊन भ्रष्टाचार करणा-यांबद्दल आपण काहीच बोलत नाही.
पारंपरिक राजकारणाला छेद देत दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता आणणारे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एका भाषणात त्यांच्या मुलीचा किस्सा सांगितला. दिल्लीत ‘आरटीओ’कडून ‘शिकाऊ परवाना’ घेताना तिच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे तिने लाच देऊ केली. पण पोलीस अधिका-याने ती घेतली नाही. या प्रकरणात शेवटी लाच न देता आणि घेताच तिला परवाना मिळाला, असे केजरीवाल यांनी म्हटले होते. मग तो परवाना कसा मिळाला, या मागचे गुपित त्यांनी सांगितले नाही. केजरीवाल यांनी ही गोष्ट सार्वजनिक सभेत सांगितली. त्या भाषणाची ध्वनिचित्रफीतही आता मागवली जाणार आहे.
केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. आपल्या मुलीने लाच देण्याचा गुन्हा केला आहे, हे त्यांना माहीत आहे. मग त्यांनी तिच्यावर कारवाई का केली नाही? केजरीवाल यांनीच दिल्लीत आणि देशात भ्रष्टाचाराविरोधात रान उठवून दिल्लीची सत्ता काबीज केली आणि आता स्वत:च स्वत:च्या मुलीच्या लाच प्रकरणाचा किस्सा भर सभेत त्यांनी सांगितला. त्या मागील नेमके कारण काय? या प्रकरणात केजरीवाल ज्या पोलिसाने त्यांच्या मुलीकडून लाच घेण्याचे नाकारले त्याच्या कार्यालयात किंवा घरात जाऊन त्याचे अभिनंदन करतील का? किंवा त्याची शिफारस ते कोणत्या पुरस्कारासाठी करतील का? दिल्लीची सत्ता हाती येण्याआधी अशा प्रकारच्या क्लृप्त्या त्यांनी केल्या होत्या.
दिल्लीत लोकसभेच्या प्रचारसभेत त्यांच्या कानाखाली मारणा-याची त्यांनी तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. आपण किती मानवतावादी आहोत, वगैरे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न त्यावेळी त्यांनी केला. त्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर केला. कारण त्यांच्याकडे सत्ता नव्हती. मात्र, आता ते असे काहीतरी करतील असे वाटत नाही. राजकीय नेतेच भर सभेत भ्रष्टाचाराचे गुणगाण करत असतील तर अशाने भ्रष्टाचार कसा संपेल? मुख्यमंत्र्यांची मुलगी लाच देण्याचा प्रयत्न करते आणि मुख्यमंत्री ही गोष्ट सार्वजनिक सभेत लोकांसमोर सांगतात. मुख्यमंत्री केजरीवाल यांना याचे काहीही वाटत नाही.
ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्या मते देशातील कोणतीही यंत्रणा ते आपल्या पैशाने विकत घेऊ शकतात. म्हणूनच आरटीओ असो की, अन्य सरकारी काम आपला वेळ वाचवण्यासाठी श्रीमंत व्यक्ती पैशाचा वापर करतात. थोडे पैसे दिल्याने त्यांच्याकडे पैसे कमी होणार नसतात.
महिन्याच्या शेवटी काय होणार म्हणून खर्च करताना सतत पाकीट तपासणा-यांपैकी ते नसतात. रात्री जेवल्यावर अडीचशे-तीनशे रुपयांचे आइसक्रीम सहज खाल्ले जाते त्याच्यापेक्षा थोडे जास्त पैसे ते लाच म्हणून देतात. पण हीच गोष्ट सर्वसामान्यांच्या अंगलट येते. महिन्याचे काटकसरीचे बजेट करून खर्च करणा-यांना रिक्षा-टॅक्सी परवडत नाही. त्यांच्यासाठी ‘बेस्ट’, लोकल आणि पायपीट असते. तरीही स्वत:च्या उत्पन्नातील १३ टक्के रक्कम त्यांना लाच म्हणून द्यावी लागते. त्यासाठी भारतीय भ्रष्टाचाराचे नीट नियोजन करतात.
मुलांचे शाळा प्रवेश असो, नवीन घरे घेण्यासाठी कॅश पेमेंट असो की, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसाच्या हातात दुमडून सरकवलेली ‘हरी पत्ती’ असो, लोकही आता भ्रष्टाचाराचे नीट नियोजन करायला शिकले आहेत. भ्रष्टाचाराचे नीट नियोजन करणे सगळयांच्या इतके अंगवळणी पडलेले असते की, कुठे एखाद्या भ्रष्ट अधिकारी किंवा नेता सापडला तर त्याला ‘मॅनेज’ करायला जमले नाही, असे म्हणायलाही ते कमी करत नाहीत.
जिकडे तिकडे भ्रष्टाचाराचे समर्थक हात जोडून स्वागत करायला उभेच असतात. त्यामुळे भारतीय माणूसही कोणाला किती द्यायचे याचे नीट नियोजन करू लागला आहे. जी गोष्ट नष्ट करता येत नाही, त्याचे नियोजन करायला शिकवणारी ही नीती आहे. पण ही नीती सर्वसामान्यांना खड्डयात घालणारी आहे.
सर्वसामान्यांना या भ्रष्ट यंत्रणेचा जाच होतो तर ज्यांच्याकडे पैसे आहेत ते या यंत्रणेला ‘मॅनेज’ करायला शिकतात. पण त्यामुळे भ्रष्टाचार मॅनेज होत नाही तर अधिकाधिक बळावतो. मग ही भ्रष्ट यंत्रणा प्रत्येकाकडूनच पैशाची अपेक्षा करते आणि ज्यांच्याकडे तो नसतो त्यांचा या व्यवस्थेविरोधात आवाज उठतो. या आवाज उठवणा-यांकडे पैसा आला की, ते या व्यवस्थेविरोधात आवाज उठवणे सोडून त्यांना मॅनेज करायला लागतात आणि भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र सुरू राहते.
वाईट गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत, असे प्रत्येकाचे म्हणणे असते. पण त्याच काही वाईट गोष्टींमुळे फायदा होत असेल तर त्या नष्ट व्हाव्यात, असे कोणालाही मनापासून वाटत नाही. त्यापैकी भ्रष्टाचार हा एक आहे. पैसे आल्यावर जीवन जगण्याचा वेग वाढतो आणि या वाढलेल्या वेगामुळे कायद्याचे उल्लंघन होते. अशा वेळी हा वेग थांबवता येत नाही म्हणून लाच दिली जाते.
लाच घेतली तर हा वेग तसाच सुसाट सुरू राहतो. कायद्याचे उल्लंघन म्हणूनच लाच घेणा-याच्या पथ्यावर पडते. नियमांचे उल्लंघन हा अपराध असला तरी अशा घडणा-या अपराधांमुळे कायद्याचे रक्षण करणा-यांचे ‘भले’ होते. रस्त्याच्या कडेला लपून बसलेल्या वाहतूक पोलिसांनाही नियम पाळणा-यांपेक्षा वाहतुकीचे नियम तोडणा-यांची गरज असते. मग असा दंडनीय अपराध घडला तर लाच देऊन आणि लाच घेऊन या भ्रष्टाचाराचे नियमन केले जाते. सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे देशपातळीवर नियोजन हे असेच होते.