अण्णांच्या पदयात्रेला सेवाग्राम आश्रमातून २५ मार्चपासून सुरुवात होईल आणि २७ एप्रिलला दिल्लीत ‘जेल भरो’ आंदोलन होणार आहे.
वर्धा- महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या लढाईची तयारी जेथून केली, त्या सेवाग्राम आश्रमातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी भूसंपादन विधेयकाविरुद्ध एल्गार पुकारला. हजारे यांनी आपल्या पदयात्रेचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी जाहीर केला.
हजारे म्हणाले, ‘भूसंपादन विधेयकामध्ये दुरुस्ती आम्हाला मान्य नाही. हे संपूर्ण विधेयकच मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी येत्या २५ मार्च रोजी सेवाग्राममधून आमच्या पदयात्रेला सुरुवात होईल. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातूनही तिथले शेतकरी पदयात्रा काढणार आहेत. २७ एप्रिल रोजी या सा-या पदयात्रा दिल्लीत एकत्र येतील, रामलीला मैदानावर त्या दिवशी ‘जेल भरो’ला सुरुवात होईल. प्रश्न सुटेपर्यंत हा जेलभरो सुरू राहील. स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झाली आहे.’
सेवाग्राम आश्रम परिसराचे वातावरण सोमवारी मंतरलेले होते. सकाळी बापू कुटीत प्रार्थनेच्या वेळी अण्णा हजारे भावूक झाले होते. शेतकरी चळवळीत काम करणा-या सुमारे ५० संघटनांच्या प्रतिनिधींसोबत अण्णांनी केलेल्या बैठकीत पदयात्रेचा तपशील निश्चित करण्यात आला. ‘आप’ पक्षाचे नाराज नेते योगेंद्र यादव हेही या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
भूसंपादन विधेयकात दुरुस्ती करण्याचे पंतप्रधानांनी मान्य केले असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता अण्णा हजारे म्हणाले, पंतप्रधान याबाबत बोलत असले तरी सुधारणा करीत नाहीत. या विधेयकातील सर्व तरतुदी शेतकरीविरोधी आहेत. आता सरकारसोबत चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ती वेळ केव्हाच निघून गेली. आमचे आंदोलन संपूर्ण अहिंसात्मक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
[EPSB]
भू-संपादन: काँग्रेस आक्रमक
मोदी सरकारच्या नवीन भूसंपादन कायद्याला काँग्रेसने आपला तीव्र विरोध कायम ठेवला असून यूपीए सरकारने २०१३ मध्ये मंजूर केलेल्या भूसंपादन कायद्यात कोणताही बदल स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
[/EPSB]