भूसंपादन विधेयकाला विरोध करणा-या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सोमवारी दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला. तसेच जमावाला पांगविण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात आले.
नवी दिल्ली- बिल्डर आणि उद्योजकधार्जिण्या आणि शेतक-यांवर अन्याय करणा-या भू-संपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते सोमवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले. ‘किसानविरोधी नरेंद्र मोदी’ अशा घोषणांनी आसंमत दणाणून सोडणा-या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने हे आंदोलन आणखी चिघळले.
त्यानंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने पोलिसांनी पाण्याचे जोरदार फवारे सोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आणलेल्या भू-संपादन विधेयकाविरोधात मागील अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन छेडले जात आहे. उद्योजक आणि बिल्डरांचे हित जपून शेतक-यांचा घात करणा-या या विधेयकाविरोधात सोमवारी काँग्रेसतर्फे एका विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, राज बब्बर, रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट आणि युवक काँग्रेसचे अमरिंदरसिंह ब्रार यांच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरमार्गे ही रॅली संसदेकडे पुढे सरकत होती. त्यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला चढवल्याने बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भू-संपादन विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून मंगळवारी ते राज्यसभेत सादर होण्याची शक्यता आहे. राज्यसभेत सत्ताधारी भाजपाचे पक्षीय बलाबल कमी असल्याने या विधेयकाला मंजुरी मिळणे अवघड आहे. या विधेयकाचा मार्ग मोकळा करण्यासाठी संसदेत सरकारची कसरत सुरू असतानाच आता या लाठीमारामुळे काँग्रेसचा विरोध आणखी तीव्र होणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जयराम रमेश, अंबिका सोनी, अहमद पटेल यांनी जंतर-मंतर येथे उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भू-संपादन विधेयकाविरोधात एकजूट दाखवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना खास संदेश पाठवला. या संदेशात भू-संपादन विधेयकाला काँग्रेसचा कायम विरोध राहील. शेतक-यांच्या हितासाठी आमची कायम साथ राहील, अशी हमीही गांधी यांनी दिली आहे. हे विधेयक मागे घेण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहनही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. युवक काँग्रेसने भू-संपादन विधेयकाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसताना नोएडा येथील भट्टा-परसौल गावापासून शुक्रवारी पायी निषेध मोर्चाही काढला होता. हा मोर्चा रविवारी राजघाट येथे पोहोचला.
दहा लाखांचा सूट परिधान करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी यावेळी सडकून टीका केली. साबरमतीचे एक संत आयुष्यभर साधेपणाने जीवन जगले आणि आजचे साबरमतीचे महंत दहा लाखांचा सूट घालून फिरताहेत, असे टीकास्र् त्यांनी सोडले. शेतक-यांसाठी जमीन म्हणजे त्यांची आई आहे. ती त्यांच्यापासून कोणीही बळकावून घेऊ शकत नाही. केंद्र सरकारचे हे मनसुबे आम्ही उधळून लावू, असा इशाराही जयराम रमेश यांनी यावेळी दिला.