मनुष्यावर आक्रमण करणारे जे प्राणी आहेत, त्यातले मोठे व विषारी प्राणी सोडले, तर लहान, सूक्ष्म व अतिसूक्ष्म जीव असे तीन प्रकारचे जीव आहेत. गोलजंत, सुते, कृमी लहान जीवांत गणले जातात. रक्तज कृमी यांपेक्षा सूक्ष्म असतात. त्यांपैकी डोळ्यांना काही दिसतात, काही दिसू शकत नाहीत. या अदृश्य सूक्ष्म जीवांनी रोग होतात, तर वर उल्लेख केल्याप्रमाणे मनुष्यावर आक्रमण करणारे; परंतु डोळ्यांना न दिसणारे जीव म्हणजे आयुर्वेदानुसार भूत म्हटले जातात.
औपसर्गिक रोग –
रक्तज, कृमिजन्य, कुष्ठ, ज्वर, राजयक्ष्मा (क्षय), डोळे येणे इ. रोग झालेल्या रोग्याचा स्पर्श झाला किंवा त्या रोग्याच्या वस्तूंशी संपर्क आला, तर संपर्कित व्यक्तीस हे रोग होतात. अशा रुग्णाच्या शय्येवर वा आसनावर बसणे, त्याची वस्त्रे, फुले इ. वस्तू घेणे, त्याने चंदन इत्यादींची उटी लावल्यास ती घेणे, त्याच्यासह जेवणे, त्याचा स्पर्श, संभोग यांमुळे तसेच त्याच्या निश्वासामुळेही त्याचा रोग दुस-याला जडतो. या रोगांना औपसर्गिक रोग म्हणतात.
भूत ग्रह –
या सूक्ष्म जीवांपेक्षाही आणखी एक जीववर्ग मानवावर आक्रमण करून रोग निर्माण करतो. त्याला भूत, ग्रह असे म्हणतात. हे अतिसूक्ष्म असतात. हे आपल्याभोवती पृथ्वीवर, आकाशात सर्व दिशांना, घरात संचार करतात. हे असंख्य आहेत, गणना संख्येत सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही संख्या आली पद्म, म्हणजे एकावर तेरा शून्ये, त्याला कोटी हजार आणि दहा हजारांनी गुणावे, येणा-या संख्येइतके कोटीसहस्त्रायुतपद्मसंख्या. आपल्याभोवती आहेत, ते रात्री आधिक्याने संचार करतात म्हणून त्यांना निशाचर म्हणतात, त्यांना मांस आवडते म्हणून पिशाच्च, रक्तमांस आवडते त्यांना राक्षस इ. नावे आहेत.
भूतबाधा कशी होते –
त्या मनुष्याच्या शरीरात उष्णता जशी शिरते; पण दिसत नाही. आरशात आपले बिंब शिरते व प्रतिबिंब दिसते, शिरताना दिसत नाही, अशी ही भुते शरीरात शिरतात, पण दिसत नाहीत. शरीरावर व्रण असेल, तर व्रणात प्रथम शिरतात. पण, अस्वच्छ, अपवित्र व आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे आहारविहार न पाळणा-या व्यक्तीच्या शरीरात व्रण नसला, तरी शिरतात व रोग उत्पन्न करतात.
प्रतिबंध –
अशी भूतबाधा होऊ नये, याकरिता व्रणाचे रोगी, सूतिका व इतर रोगी असलेल्या रुग्णालयात रक्षोघ्न (राक्षसनाशक) धूप (धुरी) न चुकता सकाळ-सायंकाळ द्यावा, अशी शास्त्रकारांची आज्ञा आहे. घरातही तशी धुरी व देवापुढे धूप, उदबत्ती लावण्याची रूढ पद्धती आहे. व्रणाला, बाळंतिणीच्या जवळ, तान्ह्या मुलाच्या सर्वागाला धुरी देण्याचा आदेश आहे.
भुतांच्या जाती –
भुतांच्या असंख्य जाती आहेत. यांचे अधिपतीही असंख्य आहेत. त्यांचे आकार-लक्षणे नाना प्रकारांची असतात, पण त्यांच्या स्वभावावरून उन्मादकर भुतांचे प्रकार आठ होतात :
(१) देव (२) दैत्य (३) गंधर्व (४) यक्ष (५) पितृ (६) भुजंग (७) राक्षस (८) पिशाच.
इंद्रसभेत गायन-वादन करणारा अतिमानवी योनीतील एक वर्ग. गंधर्व हे ब्रह्मदेवाच्या शिंकेतून निर्माण झाले, असे हरिवंशात म्हटले आहे, तर कश्यप व अरिष्टा यांपासून ते उत्पन्न झाल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे. चित्ररथ हा गंधर्वाचा अधिपती आणि इंद्र हा सर्व गंधर्वाचा स्वामी असल्याचे महाभारतात म्हटले आहे. गंधर्व हे सर्वागसुंदर असून, त्यांची वेशभूषाही आकर्षक असते. त्यांची शस्त्रे तेजस्वी व घोडे वा-याहूनही वेगवान असतात. ते पाण्यात राहू शकतात व प्रसंगी शेवाळही खातात. त्यांना फुलांचे, विशेषत: कुंदफुलांचे वेड आहे. अप्सरा त्यांच्या स्त्रिया असल्या, तरी भूलोकीच्या लावण्यवतींचेही त्यांना फार आकर्षण आहे. त्यांना हस्तगत करण्यासाठी ते तऱ्हेतऱ्हेचे इंद्रजाल व कपट अवलंबितात. ते विमानातून अप्सरांसहित संचार करतात. मानवांना भुरळ पाडून फसविण्याची व संकटात पाडण्याची त्यांना खोड आहे. तशी भुरळ पडू नये म्हणून लोकांनी अजश्रुंगी नावाची वनस्पती, अथर्ववेदातील एका मंत्राने सिद्ध करून स्वत:जवळ बाळगावी असे म्हणतात.
पितृपूजा न केल्यामुळे रागावलेले पितर वंशजांच्या अग्नीत ढकलून, पाण्यात बुडवून वा विजेच्या तडाख्याने मारतात किंवा आत्मतत्त्व पळवून नेऊन आजारी पाडतात, असे मानले जाई. एकाकीपणाची भावना, जिवंत व्यक्तीचा मत्सर, वंशजांकडून सेवा करून घेण्याची इच्छा, नवीन वंशज मरेपर्यंत कराव्या लागणा-या पहा-यातून सुटका करून घेण्याची इच्छा इत्यादींमुळेही ते बळी घेतात, अशी समजूत असते.
यांखेरीज ओजोशन भुते चरकांनी सांगितली आहेत. यांना वरील आठांना जसे रक्तमांसादी शारीर धातू प्रिय आहेत, तसे यांना शारीर धातू प्रिय नाहीत. वरील दैत्य व भुजंग भुते चरकांनी सांगितलेली नाहीत. गुरू, वृद्ध, सिद्ध आणि महर्षी ही चार उन्मादकर भुते सांगितली आहेत. वाग्भटांनी अठरा सांगितली आहेत.
साथीचे रोग – वायू, पाणी, देश व काल हे त्या त्या प्रदेशातील लोकांना समान आहेत. यांपैकी एकही दूषित झाले, तरी अनेक लोकांना एकाच वेळी एकच रोग उत्पन्न होऊ शकतो. यांपैकी एक वा अनेक भुतांनी दुष्ट झाला, वा न झाला तरी अशा रोगाची साथ उत्पन्न होते. यावर स्थान त्याग हा एक उपाय सांगितला आहे.
भूतजविकार :
ज्वर, विषमज्वर, अपतानक (धनुर्वात), उन्माद..
बालग्रह : लहान मुलांवर आक्रमण करणारी भुते १२ सांगितली आहेत.
उपचार : सर्व भुतांवर होम, बली पूजा व औषधी सांगितल्या आहेत. तेल किंवा जुने तूप औषधांनी सिद्ध करून ते अभ्यंग नाकात घालावे व पोटात द्यावे. मुलांना धुरीही द्यावी.
भूतविद्या – अतिप्राचीन भारतातील चिकित्सकांना मानसिक विकारांची कल्पना नीट आलेली नव्हती. त्या काळात माणूस असंबद्ध बोलू अथवा वागू लागला की, त्याला भुताने अथवा परकीय आत्म्याने झपाटले आहे किंवा कुणी दुष्ट हेतूने जादूटोणा केला आहे, असे समजले जात होते. अशा व्याधीवर अंगारे-धुपारे, मंत्रतंत्र इ. लोकभ्रमावर आधारित व गुह्य उपाय केले जायचे. देवाचे नाव घेऊन प्रचलित धार्मिक संकेत अथवा भाकिते सांगू लागल्यास, देव अंगात आले असे समजून त्या व्यक्तीला पूज्य मानीत असत. अशा कल्पना ग्रामीण समाजात अजूनही रूढ आहेत.
सुमारे २,५०० वर्षापूर्वी मनाबद्दल शास्त्रोक्त कल्पना आयुर्वेदात मांडली गेली ती अशी : देह, इंद्रिये, मन व आत्मा मिळून शरीर बनते व या चारींच्या संयोगाला जीवित अथवा आयुष्य अशी संज्ञा आहे. मन हे स्वतंत्र अणुरूप द्रव्य असून त्याचे स्थान (चेतनास्थान) हृदयात आहे. म्हणून ते अंतरेंद्रिय. मनावरचे नियंत्रण वायू अथवा प्राण यांच्यातर्फे होते व मन स्वत:चे व इंद्रियांचे नियंत्रण करते. तसेच ते ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय या दोन्ही स्वरूपाचे (उभयात्मक) आहे. मनामुळे बाह्य विषयांचे ज्ञान एका वेळेस एका इंद्रियातर्फे होते. मनाचे कार्य संकल्पन स्वरूपात असते. इंद्रियांतर्फे झालेले बाह्य विषयाचे ज्ञान मुळात आलोचनात्मक व निर्विकल्पक असते.
मनाचे विविध गुणधर्म आहेत. पैकी सत्त्व हा गुण इष्ट समजला जातो. रज व तम हे दोष मानले जातात. या गुणदोषांच्या निरनिराळ्या प्रमाणावर आधारित अशा मनाच्या तीन प्रवृत्ती (चित्तप्रकृती) वर्णिलेल्या आहेत :
(१) सात्त्विक म्हणजे संयमी, विवेकी व जिज्ञासू.
(२) राजस म्हणजे उत्कट, अतिसंवेदनाक्षम व प्रेरणाप्रधान. (३) तामस म्हणजे अज्ञानी, मोहवश व निष्क्रिय. काम, क्रोध, लोभ, मोह इ. मनोवृत्ती रज व तम या दोषांमुळे वृद्धिंगत होतात आणि मनाचे आवेग तयार होतात. मोहाचा अतिरेक हे चित्तविकल्पाचे लक्षण आहे.
रज व तमामुळे मानसशक्ती भ्रष्ट झाल्यास, मानसिक कर्म बिघडते. भोगतृष्णा प्रबळ होते व आचरणात चुका होतात. यालाच ‘प्रज्ञापराध’ म्हणतात. प्रज्ञापराधामुळे बुद्धिभ्रंश, स्मृतिभ्रंश आणि धृतिभ्रंश होतो. जी गोष्ट जशी समजावयाला हवी, तशी न समजता तिच्याविषयी ज्या विपरीत कल्पना असतील, त्यानुसार ग्रहण केली जाते व तसे वर्तन घडते.