मुळात अर्थतज्ज्ञ असलेल्या बाबासाहेबांना अर्थशास्त्र हा आपला सर्वात आवडता विषय सोडून त्यावेळी सामाजिक सुधारणेचा विषय हाती घ्यावा लागला. पण अर्थशास्त्रात त्यांनी जे काम करून ठेवले आहे, त्याला तोड नाही. मोबाईल अॅपला ‘भीम’ (भीमराव) नाव (Bharat Interface for Money) (BHIM) देऊन केंद्र सरकारने बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राची आणि त्यांची त्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीची देशाला आठवण करून दिली आहे. या अॅपचा घेतलेला धांडोळा..
जगासोबत राहण्यासाठी आता डिजिटल व्यवहार अपरिहार्य आहेत आणि डिजिटल भारताला गती देण्यासाठी सर्वसामान्य भारतीय नागरिकांनीही ते केले पाहिजेत, यासाठी निमुद्रीकरणानंतर सरकारने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात डिजिटल व्यवहार करणा-यांना दररोज लॉटरी पद्धतीने प्रोत्साहन, ऑनलाईन बँकिंग करणा-यांना सवलती, सरकारी देणीघेणी डिजिटल पद्धतीनेच करणे, डेबिट कार्ड वापरण्यास प्रोत्साहनाचा समावेश आहे. नजीकच्या भविष्यात जी हातातील बँक होणार आहे, त्या मोबाईल अॅपमध्ये मात्र सरकार म्हणजे रिझव्र्ह बँक कमी पडत होती. पण भीम मोबाईल अॅपने ती उणीव भरून काढली आहे. पेटीएम हे खासगी अॅप जेवढे सोपे आहे, तेवढेच भीम अॅप सोपे आहे. सुरुवातीला येणा-या काही अडचणी सोडल्या तर ते अॅप देशभर अतिशय लोकप्रिय होईल, यात आता शंका नाही.
संपत्तीच्या वितरणात पैसा प्रवाही असणे, याला अतिशय महत्त्व आहे. या एका तत्त्वावर विकसित देशांनी आपला विकास साधून घेतला आणि भारतासारखा त्यांच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत असलेला देश मात्र वर्षानुवर्षे मागे पडला. अंशत: निमुद्रीकरणाच्या धाडसामुळे आता भारतातही पैसा प्रवाही होण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याचे महत्त्व भारतीय नागरिकांना जसजसे लक्षात येईल, तसतसे देशाला देशातच हक्काचे भांडवल तर मिळेलच, पण ते स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होईल. भारतीय जीवनमान चांगले होण्यास भारतीय मानसिकतेचा अडथळा नसून व्यवस्थेचा अडथळा आहे, हेही मग सर्वमान्य होईल आणि त्या दिशेने समाज विचार करण्यास सुरुवात करेल.
आधी आर्थिक सुधारणा की सामाजिक सुधारणा, या प्रश्नाचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी आधी सामाजिक सुधारणा आणि नंतर आर्थिक सुधारणा, असे दिले असले तरी आज बाबासाहेब असते तर त्यांनी आजच्या काळात आर्थिक सुधारणाच उचलून धरल्या असत्या. मुळात अर्थतज्ज्ञ असलेल्या बाबसाहेबांना अर्थशास्त्र हा आपला सर्वात आवडता विषय सोडून त्यावेळी सामाजिक सुधारणेचा विषय हाती घ्यावा लागला. पण अर्थशास्त्रात त्यांनी जे काम करून ठेवले आहे, त्याला तोड नाही. मोबाईल अॅपला ‘भीम’ (भीमराव) नाव (Bharat Interface for Money) (BHIM) देऊन केंद्र सरकारने बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राची आणि त्यांची त्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीची देशाला आठवण करून दिली आहे.
बाबासाहेबांच्या शोधनिबंधातील हे एक वाक्य पाहा. ‘ज्या देशात जास्तीत जास्त व्यवहार सरासरी एक रुपयात व बहुतांशी एक आणा वा त्याहून कमी पैशांत होतात, त्या देशात लोकांच्या व्यवहारात कागदी चलनाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होईल, अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे. १८७१ साली प्रथमच चलनात आणलेली पाच रुपये मूल्याची नोटसुद्धा लोकव्यवहारात शिरकाव करू शकण्याएवढी लहान नव्हती.’ याचा अर्थ त्यावेळी पाच रुपयांची नोट म्हणजे आताची ५००, १००० रुपयांची नोट होती आणि त्या नोटेची गरज नव्हती, असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. हे सर्व कशासाठी करायचे, याची मांडणी त्यांनी किती स्पष्टपणे केली होती पाहा, ते म्हणतात, ‘पैसा नसेल तर व्यक्तीचे स्वातंत्र्य, समाजाचे स्वातंत्र्य आणि देशाचे स्वातंत्र्य या शब्दांना काही अर्थ नाही, अमेरिका प्रबळ का? आज इंग्लंड अमेरिकेच्या तालावर नाचताना दिसतो आहे, का? तर पैसा नाही, अमेरिकेजवळ तो मागावा लागतो. विष्णूपंतांनी पैसा मिळविण्यासाठी ब्रह्मचर्य लागते, हे सांगितले, हे मला पटत नाही, असे असते तर सारेच मारवाडी व गुजराती ब्रम्हचारी आहेत, असे म्हणावे लागले असते! परप्रांतीय आणि परकीयांनी चालविलेली लूट थांबविण्यासाठी राष्ट्रीय समाजवादाचा अवलंब करणे हा एकच मार्ग राष्ट्रासमोर आहे.’ (२० एप्रिल १९४७) २ बँकमनीला आज आपण डिजिटल मनी म्हणत आहोत. बँकमनीचे महत्त्व आपला समाज वर्षानुवर्षे ओळखू शकला नाही. त्यामुळेच आपल्या समाजाने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला असून तो धोंडा काढून घेण्याची संधी निमुद्रीकरणाने दिली आहे. बँकमनीविषयी बाबासाहेब काय म्हणतात, पाहा. ‘इंग्लडमधील बँका पतपुरवठय़ासाठी नोट पद्धतीच्या जागी धनादेश पद्धती रुजविण्यात यशस्वी झाल्या होत्या, परंतु भारतातील बँका त्यात अपयशी ठरल्या होत्या. अर्थात देशातील प्रचंड निरक्षरता आणि ग्रामीण भागातील बँकिंग सुविधांचा अभाव ही या अपयशाची कारणे आहेत.’ आपल्या लक्षात आले असेल की गेली किमान ७० वर्षे ‘आमच्याकडे अजून बँकांच्या सुविधा नाहीत’, हे एकच रडगाणे आपण गात आहोत. गेली ७० वर्षे आपण भारतीय नागरिकाला बँकिंगचा अधिकार देऊ शकलो नाही आणि बँकिंगचा परिणामकारक प्रसार करू शकलो नाही. निमुद्रीकरणाने ही चूक दुरुस्त करण्याची संधी आपल्याला दिली असून ती आपण घेतली पाहिजे. आज ‘अर्थक्रांती प्रतिष्ठान’ चलनाच्या शुद्धीकरणाविषयी, त्याच्या प्रवाही राहण्याच्या अपरिहार्यतेविषयी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसा ही वस्तू नव्हे ते विनिमयाचे एक साधन आहे, असे सांगत असून आजही आर्थिक साक्षरतेअभावी निमुद्रीकरणासारखा विषय जनतेपर्यंत पोचण्यात अडथळे येत आहेत. मात्र ‘भीम’सारख्या मोबाईल अॅपने समाज डिजिटल व्यवहार सहजपणे करू शकेल, अशी आशा आता निर्माण झाली आहे. सरकारने काय काय आणि कसेकसे करायला पाहिजे होते, याविषयी बरेच काही बोलून झाले आहे आणि लोकशाहीत ते योग्यच आहे. पण आता या राष्ट्रीय मोहिमेत एक नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याची गरज निर्माण झाली आहे. निमुद्रीकरण ही दुरुस्ती म्हणा, धाडस म्हणा किंवा अगदी राजकीय निर्णय म्हणा, पण ते आता आपल्या देशाने केलेले धाडस झाले आहे आणि ते यशस्वी न होणे, आपल्या देशाला अजिबात परवडणारे नाही. आपल्या मनात असलेले राजकीय हिशोब आपण निवडणुकीत चुकते करूच शकतो, पण अर्थकारणासारख्या अशा विषयात देशाने एकमताने सामोरे जाण्याची गरज आहे. खासगी मोबाईल अॅपच्या व्यवसायासाठी हा निमुद्रीकरणाचा निर्णय घेतला गेला, ते कमिशन घेतात, सामान्य माणूस ते व्यवहार कसे करणार, ते फार अवघड आहेत, असे बरेच काहीबाही गेले महिना दोन महिने बोलले गेले. भीम मोबाईल अॅपमुळे जी सोय करण्यात आली आहे, तिने या बिनबुडाच्या चर्चाना पूर्णविराम मिळण्याची गरज आहे. भीम मोबाईल अॅप अतिशय सुरक्षित, सोपे आणि संपूर्ण सरकारी असल्याने कोणतेही कमिशन नसलेले अॅप आहे. त्यामुळे ते डिजिटल भारताचे अतिशय सक्षम असे वाहन ठरेल आणि डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून होणारी अर्थक्रांती प्रत्येक भारतीय नागरिकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देईल, असा संकल्प आता आपण केला पाहिजे.