मुंबईपासून भिवंडी केवळ ५० किलोमीटरवर! या मतदारसंघात भाजपचे आमदार विष्णू सावर मागील २५ वर्षे आमदार आहेत. मात्र या तालुक्यातील कासपाडा, म्हसेपाडा , ब्राह्मणपाडा, धिंडेपाडा, गिरंदोलीपाडा, सातवीपाडा ही सहा गावे आजही अंधारात आहेत.
भिवंडी- मुंबईपासून भिवंडी केवळ ५० किलोमीटरवर! या मतदारसंघात भाजपचे आमदार विष्णू सावर मागील २५ वर्षे आमदार आहेत. मात्र या तालुक्यातील कासपाडा, म्हसेपाडा , ब्राह्मणपाडा, धिंडेपाडा, गिरंदोलीपाडा, सातवीपाडा ही सहा गावे आजही अंधारात आहेत. याबरोबरच रस्ता, पाणी या समस्याही कायम आहेत.
ही सहाही गावे भिवंडी ग्रामीणमध्ये मोडतात. स्वातंत्र्य प्राप्त होऊन आज ६५ वर्षे लोटली, मात्र अद्याप या गावांत मूलभूत समस्या कायम आहेत. रस्ता, वीज नसल्याने दिवस असो वा रात्र जंगली श्वापदांच्या दडपणाखालीच येथील ग्रामस्थांना आला दिवस कंठावा लागतो. ओढा-नाल्यांवर साकव, पूल नसल्याने पावसा-पाण्यातही धोका कायम असतो. नळपाणीपुरवठा योजना वगैरेंची तर या ग्रामस्थांना माहितीच नाही. आजही येथे पारंपरिक विहिरींतूनच पाणी काढावे लागते. येथील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही आहे. वीज नसल्याने शिक्षण घेणारी मुले आजही दिव्याखालीच अभ्यास करतात. गेल्या १५ वर्षापासून धिडेपाडा आणि गिरंदोलीपाडा येथे विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत.
मात्र ते नावालाच! अद्याप या खांबांवरून विद्युतवाहिनी टाकण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी सौरऊर्जा दिव्यांचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र योग्य निगरानीअभावी या दिव्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. या दिव्यांना जिथे-तिथे लाकडी टेकू देण्यात आले आहेत. आरोग्याचा प्रश्न तर आ वासून आहे. या निवडणुकीत निवडून येणारा अपेक्षित उमेदवार आपल्या या समस्या दूर करील, इतकी अपेक्षा करण्यापलीकडे या ग्रामस्थ काही करू शकत नाहीत. किमान या निवडणुकीत तरी भिवंडीकरांच्या या अपेक्षांचा भंग न झाला म्हणजे झाले!
मी जेव्हापासून आली आहे, त्याअगोदर पासून आमच्या पाडयात वीज नाही. आमच्या मुलांना रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागतो. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होत आहे. आम्ही गरीब असल्याने आमच्या मुलांना शिकवणीही लावू शकत नाही. आमच्या मुलांचे भविष्य आजही अंधारातच आहे. – सुवर्णा राऊत, स्थानिक, कासपाडा
आमच्या पाडयांत रस्ता नाही. पूल नसल्याने नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागते. नदीला पूर आला की, तो वेळ काठावरच काढावा लागतो. आमच्या तीन पाडय़ांत आजही वीज नाही. आमदार-खासदार फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठी येतात. त्या वेळी केवळ आश्वासन देतात. मात्र आमची समस्या कायम आहे. – सुदाम गडग, सदस्य, घोटगाव-ग्रामपंचायत
धिडेपाडा १०० टक्के आदिवासी आहे. या गावाला वीज नाही, पाणी आणि रस्ता नाही. गेल्या १५ वर्षापूर्वी विजेचे खांब उभे केलेत, मात्र त्यावर विजेच्या तारा बसवलेल्या नाहीत. त्यामुळे आजही अंधारात राहावे लागत आहे. आमचे एक गाव आणि १७ पाडे आहेत. २५ वर्षापासून भाजपचे विष्णू सावरा आमदार आहेत. मात्र त्यांच्या निधीतून आजपर्यंत एकही काम झालेले नाही. – सुरेश कोम, सरपंच, खुपरी