भिवंडी-वाडा रोडवरील नदीनाका येथील कामवारी नदीवर जलपर्णी वनस्पतीचा विळखा पडल्याने पाणी दूषित होत असून मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.
भिवंडी- भिवंडी-वाडा रोडवरील नदीनाका येथील कामवारी नदीवर जलपर्णी वनस्पतीचा विळखा पडल्याने कामवारी नदी फुलाच्या रूपाने सुंदर दिसू लागली आहे. मात्र या जलपर्णी वनस्पतीमुळे पाण्याची खराबी होत असून हे पाणी पिणे योग्य राहत नाही, तर मासळीसह जलचर प्राणीही या वनस्पतींमुळे मरू शकतात. त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून या वनस्पतीमुळे पाण्याचे शोषणही जास्त होत असल्याने नदीकाठच्या शेतक-यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
भिवंडी शहरालगत असणा-या कामवारी नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यात येत असते, मात्र त्याचवेळी भिवंडी महानगरपालिका असो किंवा शेलार ग्रामपंचायत असो, गणेश घाटावर आणि नदीच्या पात्रात मोठय़ा जोमात खर्च दाखवून स्वच्छता करण्यात येते. एकदा गणेश विसर्जन झाले की कोणीही या कामवारी नदीकडे ढुंकूनही पाहत नाही. या नदीलगत शेलार, बोरपाडा, कवाड, सोनटक्का, सावंदे, गोरसई, खांडपे, धामणगाव, अनगाव, निवळी, पुंडास आदी गावातील शेतकरी याच नदीचे पाणी घेऊन भाजीपाला, पीक घेऊन शेती पिकवत आहे. तर टँकर व्यावसायिक थेट नदीत पाईप टाकून कंपन्यांना पाणीपुरवठा करून व्यवसाय करीत आहेत.
मात्र सध्या संपूर्ण नदीवर जलपर्णी वनस्पतीचा विळखा पडला आहे. या वनस्पतीमुळे पाणी मोठय़ा प्रमाणात शोषले जात असून ते दूषित होऊन पाणी पिण्यायोग्य राहत नाही. तर मासळीसह जलचर प्राणी या वनस्पतीमुळे मरू शकतात.
या सर्व बाबी पाहता ही वनस्पती नदीबाहेर काढून नदीला मोकळा श्वास देण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत याच नदीच्या पात्रात बिल्डर अतिक्रमण करून नदीचे पात्र अरूंद करण्याचा प्रयत्न करीत आहे.
मात्र या नदीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने पाण्याची समस्या टाळण्यासाठी शासनाने, समाजसेवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
नदीच्या पात्रात अनधिकृत बांधकामे
या कामवारी नदीच्या पात्रात बहुसंख्य महानगरपालिकेच्या हद्दीत बिल्डरांनी अतिक्रमण करून भव्य अशा इमारती बांधल्या आहेत. अजूनही तसे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जलपर्णी ही वनस्पती याआधी कधीही भिवंडीत केव्हा पाहण्यास मिळाली नसून ही वनस्पती बिल्डरांनी आणून नदीत टाकली आहे. जेणेकरून नदीतील पाणी लवकर संपून अतिक्रमण करता येईल, असे घातक कृत्य बिल्डरांनी केले आहे. अशा बिल्डरांची चौकशी करून कारवाई करावी जेणे करून शेतक-यांना याचा फटका बसणार नाही – अजय काळण, सचिव, भाजीपाला उत्पादक कष्टकरी संघ, बोरपाडा)
गणेश विसर्जनासाठी प्रयत्न करू
कामवारी नदीवरील गणेश घाटावर गणेश विसर्जनाची व्यवस्था महापालिका करत असून नदीच्या पात्रात व्यवस्थित गणेश विसर्जन होण्यासाठी नदीची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार असून याबाबत लवकरच गणेश उत्सव महामंडळाच्या वतीने मागणी करू. – मदन भोई, अध्यक्ष, भिवंडी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ)