एक-दोन मुलांचं संगोपन करताना पालकांची दमछाक होत असते. मात्र, साठी ओलांडलेल्या सिंधुताई सपकाळ हजारो अनाथ मुलं, मुली तसंच निराधार, विधवा महिलांसाठी आधारवड झाल्या आहेत. ‘ज्यांनी नाकारलं त्या सगळय़ाच माणसांनी मला घडवण्यात हातभार लावला,’ असं म्हणत परिस्थिती आणि नियतीने दाखवलेल्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी आपलं मार्गक्रमण सुरू ठेवलं आहे. नियतीने दाखवलेल्या मार्गावरचा हा त्यांचा प्रवास आहे. अलीकडेच ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं, तर मुंबईत सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या पार्श्वभूमीवर ‘भाषण के बिना राशन नही मिलता’ या तत्त्वावर ठाम विश्वास असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनधारणेविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत.
माई, आतापर्यंतचा तुमचा जीवनपट, तुमच्या आत्मचरित्राच्या रूपानं सगळयांना परिचित झाला आहे. तरीही स्वत:बद्दल काही सांगाल?
> आज तुमच्यासमोर जी माई दिसतेय ती परिस्थितीनं घडलेली, नियतीनं घडवलेली आहे. माझं शिक्षण चौथी मराठीपर्यंत झालं. मी त्या शिक्षणाला हाफ टाइम चौथी पास म्हणते, कारण शाळा आणि गुरंढोरं राखून मी चौथी पास झाले. गरिबीमुळे पूर्ण वेळ शाळा अशी झालीच नाही. जगण्यासाठी शिक्षणाची गरज लागत नाही. संस्था किंवा कोणतंही कार्य करण्यासाठी शिक्षणाची गरज नसते. तुम्हाला लोकांच्या काळजाची भाषा आली पाहिजे. ती आली की, त्यापाठोपाठ सगळं येतं. गरिबी आणि अनाथ झाल्यामुळेच माझ्या दु:खाचा, वेदनेचा वेद झाला आणि त्यातूनच मी घडत गेले. मी एक भिकारी बाई. समाजसेवा हा माझा प्रांत नव्हता. माझी तेवढी कुवत नव्हती, तेवढी माझी लायकी नव्हती.
आज अनेक संस्था चालवून तुम्ही हजारो अनाथ मुलं, मुली आणि निराधार महिलांना आधार दिला. हे सगळं कसं घडत गेलं? पहिली संस्था तुम्ही कशी आणि कुठे सुरू केलीत?
> माझ्या भाषणावर संस्था उभ्या राहिल्या आणि वाढल्या. भाषणातून मिळालेल्या राशनाच्या झोळीवरच मी आणि माझी मुलं होळी साजरी करू शकलो. लोकांकडे मी माझ्या मुलांसाठी मदत मागायचे. त्या वेळी माझ्याकडे लोक पावती मागायचे. तेव्हा कळलं की, अशी पावती देण्यासाठी एक संस्था लागते, त्या संस्थेची नोंदणी करावी लागते. तिचं ऑडिट करावं लागतं, वगैरे वगैरे. मग अमरावतीतील चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले ही अनाथांसाठीची पहिली संस्था सुरू केली. अनाथांना आधार देण्याचा आणि संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला आदिवासींनी एक झोपडं बांधून दिलं. त्या वेळी माझ्याबरोबर काम करायला दोन-चार कार्यकर्ते होते. झोपडं बांधल्यावर पाच, सात आणि अकरा अशी मुलं वाढत गेली. मात्र काही महिन्यांनी वादळानं ते उडून गेलं. मग तेथील ग्रामस्थांनी संस्थेसाठी एक घर दिलं. गाव माझ्या बाजूने उभं राहिलं. म्हणूनच नंतर मी चिखलदरामध्ये गाईंसाठी आंदोलन केलं. हे माझं पहिलं आंदोलन. या आंदोलनामुळे लोक माझे झाले. माझ्याकडे गाय नव्हतं, वासरू नव्हतं. तरी लोकांसाठी मी ते आंदोलन केलं आणि त्याला यश मिळालं.
अनाथांसाठीच काम करायचं, हा विचार कसा पक्का झाला?
> दहा दिवसांच्या बाळंतीणीला नव-यानं घराबाहेर काढलं. आईनेही माहेरी आश्रय दिला नाही आणि ही माई एका क्षणात आपल्या १० दिवसांच्या मुलीसह अनाथ झाली. जगण्यासाठी मग रेल्वेत भीक मागायला सुरुवात केली. आपला आणि आपल्या मुलीच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे हा एकमेव मार्ग होता. रेल्वेबरोबर महाराष्ट्रापासून ते अगदी दिल्ली, मुंबईच्या सीएसटी स्थानकातही भीक मागितली. अगदी हैदराबाद, दिल्ली, निजामपूपर्यंत भीक मागितली. इतर राज्यांमध्ये भीक मागताना हिंदीत देवाची गाणी म्हणत असे. रात्र झाली की, मी स्मशान शोधून तिथे आश्रय घेत असे. झोपेसाठी तसंच स्वत:च्या संरक्षणासाठी त्यासारखी सुरक्षित जागा त्या काळी शोधूनही सापडणारी नव्हती. मोठय़ा शहरांमध्ये किंवा छोटय़ा शहरांमध्ये स्मशानं नसतील तिथं मी भिका-यांच्या घोळक्यात झोपत असे. मागितलेल्या भिकेतून भाकर-तुकडा घेऊन मी स्वत: खात असे आणि उरलेली भिका-यांमध्ये वाटत असे. मला वाचवलं ते भिका-यांनी. पोट हीच माझी संस्था. स्वत:चा इलाका सोडून जिथे मला कोणी ओळखणार नाही, अशा ठिकाणी भीक मागितली. भिकेत मिळेल ते वाटून खायचे. भाकरीचं नातं घट्ट असतं. भिक्षेची भाकर वाटून खाल्ली आणि त्यावर मी जगले. माझं वय हाच माझा धोका होता, जिवंत माणसांच्या कळपापेक्षा स्मशान अधिक सुरक्षित वाटायला. मला माहीत होतं की, मेल्याशिवाय माणसं स्मशानात येत नाहीत आणि रात्री भुताच्या भीतीने तिथं कोणीच फिरकत नाही. कोणी जर चुकूनमाकून आलं तर मला भूत समजूत पळायचं. माझी सुरक्षा स्मशानानं केली आणि स्मशानानंच मला जगायला शिकवलं. स्मशानच माझा गुरू झालं.
त्याबद्दल थोडं विस्तारानं सांगाल?
> स्मशानात राहत असताना लोक गेले की, मी प्रेताच्या आगीजवळ बसून ऊब घेत असे. काही वेळा त्याच आगीवर भाकर भाजून घेत असे. मग माझा आणि त्या प्रेताचा एक अव्यक्त संवाद मनातल्या मनात व्हायचा. प्रेत मला सांगायचं, तू एकटी आहेस म्हणून का रडतेस? माझ्याकडे बघ. मी एकटाच जळतोय आणि माझी मुलं घरी संपत्तीसाठी भांडत आहेत. आपण आलोही एकटेच आणि जाणारही एकटेच. कफन को जेब नही होती और मौत कभी रिश्वत नही लेती. गरिबी, भुकेतून, अनाथपणातून, एकाकीपणातून सुरू झालेला हा संवाद होता. निराशेतूनच मी खूप वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. पण माझे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. एकदा मराठवाडय़ातील एका गावातल्या स्मशानात असताना आत्महत्येचा विचार मनात आला. त्याच वेळी दुसरा विचार आला की, अध्र्या तासानं मेलं तर काय होईल, अर्धा तास झाल्यावर एक तास-दीड तासानं मेल्यावर काय होईल? ब-याच वेळाने मी उठले. रात्री जोरानं वारं सुटलं होतं. मला वाटत होतं, सगळं जगच माझ्या विरोधात आहे. आता मला मरायला हवं. चार पावलं पुढे गेले. तेवढय़ात कोप-यावर झोपलेल्या भिका-यांच्या घोळक्यातील एक भिकारी जोरजोरात रडू लागला. तापाने तो फणफणलेला होता. मरायला टेकला होता. त्याची अवस्था बघून तो आता मरणार, असंच वाटत होतं, पण मरण्याआधी कोणी तरी त्याला पाणी पाजावं म्हणून तो रडत होता. ‘कोणी तोंडात घोटभर पाणी द्या रे बाबा’ म्हणत होता. मरताना थोडं पुण्य करावं म्हणून मी त्याला पाणी पाजलं. माझ्या हाताला चटका लागला इतका त्या म्हाता-याला ताप होता. ‘मरणारच आहेस तर भाकरी खाऊन, पाणी पिऊन मर’ असं म्हटलं. त्याला खाऊ-पिऊ घातलं. तो काही मेला नाही. तो माझ्याकडे टकामका पाहायला लागला. मरायला चालला होता तो मेला नाय. दुस-या दिवशीही तो अगदी चांगला-धडधाकट. या घटनेनं माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी दिली. मला वाटलं की, मरणा-या माणसाला मी वाचवलं, मरणा-यांसाठी मला जगायला शिकलं पाहिजे. मग, मरणाचा बेत कायमचा रद्द केला.
आयुष्याला कलाटणी देणा-या या घटनेनंतर तुमची पुढील वाटचाल कशी झाली?
> त्या क्षणानंतर ज्यांचं या जगात कोणी नाही त्या अनाथांसाठी जगायचं मी ठरवलं. मी इतरांची माय बनायचं नक्की केलं. पण, स्वत:ची मुलगी जवळ असताना ते करणं शक्य होणार नाही, याची मला पदोपदी जाणीव होत गेली. त्यामुळे माझ्यातील आई चुकू शकेल. म्हणून मी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या सेवासदनात माझ्या मुलीला ठेवलं. ती गरवारेतून बीए झाली. नंतर पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठातून तिने समाजसेवा विषयातून पुढील शिक्षण घेतलं. मी माझं सोडलं आणि दुस-यांचं घेतलं. सेवासदनात ठेवतानाच तिचं तिथंच बारसं केलं. तिनं मला ममत्व काय ते शिकवलं, मला माय बनवलं म्हणून तिचं नाव ममता ठेवलं.
तुम्ही म्हणालात की, तुम्ही काही केलं नाही. सर्व गोष्टी नियतीनं केल्या. तुम्ही फक्त चालत राहिलात, पण या अनाथांना आधार मिळवून देण्याचा निर्णय तुमचा होता. तुम्ही त्यासाठी प्रयत्न केलेत, कष्ट घेतले?
> प्रत्येक माणूस आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. मला माझा बाप आवडायचा, माझ्यावर खूप प्रेम करायचा. पण देवानं त्याला उचलून नेला. माझी माय ही सख्खी होती, पण तिनं माझ्यावर कधी प्रेम केलं नाही. ती जिवंत राहिली. माझा बाप मेला, नव-याने मला घराबाहेर काढलं नसतं तर मला हे जग कळलं असतं का? आईनंही मला घरात घेण्याचं नाकारल्यानंतर मला एका वेडसर म्हातारीनं आश्रय दिला होता. तिची तरुण मुलगी मेली होती. ती मलाच तिची मुलगी मानू लागली. मी कुठे जाईन म्हणून ती मला कुलपबंद ठेवत असे. मग नियतीने तिलाही उचलून नेलं. मग मी पुन्हा रस्त्यावर आले. मंदिरात भीक मागणं सुरू केलं. तिथं मंदिराच्या बाबानं त्रास सुरू केल्यावर मी पुन्हा पुढे निघाले. हे होणारच होतं. मला फक्त चालायचं होतं. नियतीनं मला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी चालवत ठेवलं. नियती म्हणाली, चल पुढे, हे तुझं क्षेत्र नाही. बाप असता तर हे घडलं नसतं. नव-यानं सोडल्यानंतर बापानं मला घरी घेतलं असतं, पण देवानं बापच नेला उचलून. क्षणाक्षणाला कसोटी होती आणि नियतीनं माझ्या मनात ही कल्पना रुजवली आणि मी त्यावर चालत राहिले. माझे कष्ट नाहीतच, ही नियतीच होती. नाही तर एका नऊवारी नेसणा-या बाईवर तिच्या जिवंतपणी चित्रपट निघणं कठीण काम आहे. आपल्या देशात एखाद्या व्यक्तीवर चित्रपट निघण्यासाठी तिला मरावं लागतं आणि नंतरच तिच्यावर चित्रपट निघतो. माझ्या सुदैवाने तो जिवंतपणी निघाला. होणारं कधीही टळत नाही. आपण चालत राहायचं. कर्ताकरविता कोणी औरच असतो. आज लोक माझं भाषण ऐकायला येतात, मला भेटायला येतात. आज माझ्याकडे पावणेदोनशे गाई, हजारो लेकरे आहेत. साडेसातशे पुरस्कार मिळालेत, पण अजूनही ग्रँट मिळालेली नाही.
तुमचं कार्यकर्तृत्व जगभर गेलं आहे. तरीही अजून सरकार किंवा लोकप्रतिनिधींनी तुम्हाला सरकारी मदत मिळावी, यासाठी काही प्रयत्न केले नाहीत?
> नाही. आजही मी भाषणं देऊन संस्थांसाठी राशन गोळा करत असते. मी बाहेर पडले की, मुलं संस्थेत दिवा लावतात. राशन आणायला गेलेली आमची आई आम्हाला वापस पाठव, अशी प्रार्थना देवाला करतात. दिवा जळत असतो. दिवा जळत राहतो. राशनसाठी बाहेर पडलेली आई त्यांच्यासमोर रिकाम्या हाताने कशी जाईल? भाषण झाल्यावर मी लोकांकडे जाऊन माझ्या मुलांसाठी त्यांच्यासमोर पदर पसरते. चिखलदरामधील संस्थेमध्ये फक्त २० मुलींसाठी ग्रँट मिळते. पण तिथे ६० हून जास्त मुली आहेत. याला ग्रँट म्हणता येईल का? कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मला मदत केलेली नाही. आज समाज माझ्या बाजूने आहे, पण सरकार नाही. ‘मेरे जनाजे के पीछे सारा जहाँ निकला, पर वो नही आये जिनके लिए जनाजा निकला,’ असं म्हणावं लागेल. मी माई झाले, तुम्ही गणगोत झालात. आयुष्यभर मी बोलत आले आहे, भाषण देत आले आहे. कधी बावीस, सत्तावीस, बत्तीस तास प्रवास केला आहे. गाडीतच माझा अर्धा जीवनप्रवास सुरू असतो. भूक दररोज लागते. चार दिवसांनी लागत नाही. त्यामुळे भाकरीच्या शोधात फिरावं लागतं. सरकार मला देईल, तर मी सन्मानाने घेईन, पण आता मागणार नाही. जनता माझं सरकार आहे. ते घाव भरून देईल. आता माझा कुणावर राग नाही. सगळ्या स्त्रियांना सांगते की, माफ करायला शिका. माफ करते ती माऊली. मी माझ्या पतीला बाळ केलं. संस्थेत स्वत: आणलं. माझं ते मोठं खतरनाक बाळ आहे. सगळय़ाच वयोगटातील मुलांसाठी मला थकून चालणार नाही. लेकराची चिमणी तोंडं दिसतात. मुलांसाठी बोलणं भाग आहे. कधी कोणाकडून आशा केली नाही. माझी धडपड सुरू आहे. माझी मोठी झालेली लेकरं माझ्यासाठी काही तरी करत आहेत. त्याचबरोबर संस्थांमध्ये विविध प्रकल्प सुरू करून त्यातून मिळणा-या पैशातून पुढील वाटचाल सुरू ठेवली आहे. आता थांबून चालणार नाही, या संस्था चालू ठेवायच्या आहेत, या भावनेतूनच माझी मुलंही तन-मन-धनाने काम करत असतात.
आत्मचरित्र लिहिण्यामागे काय उद्देश होता आणि ‘मी वनवासी’ असं त्याला नाव का दिलं?
> मुलांचा सांभाळ करण्यासाठी पैशाची गरज होती. त्यासाठी ते लिहिलं. ज्याला कोणी नाही, त्या व्यक्तीला वनवासी म्हटलं जायचं. त्याअर्थी मी वनवासीच होते. म्हणून आत्मचरित्राला ‘मी वनवासी’ असं नाव दिलं. संस्था सुरू केल्यानंतर तिच्यासाठी फार कमी मदत मिळायची. त्यामुळे मुलांना काय खाऊ घालायचं, असा प्रश्न पडायचा. मला मोठय़ा व्यक्तींची चरित्रं आणि आत्मचरित्रं वाचायची सवय होती. आपल्या आयुष्यातही इतक्या उलाढाली झाल्या आहेत. आपलंही आयुष्य थोडं वेगळंच आहे. मग आपणही का लिहू नये, म्हणून मी १६ दिवसांत दिवसरात्र झटून आत्मचरित्र लिहून काढलं, पण त्यामुळे अडीच महिने आजारी होते. आत्मचरित्र लिहून पूर्ण होतं. पण, ते छापायला कोणताही प्रकाशक पुढे येत नव्हता. मग माझं पुस्तक मीच स्वत:च छापलं. पुस्तक, प्रकाशक, लेखक, वितरक सबकुछ मीच होते. मग पुस्तकांची विक्री स्वत:च केली. ‘साहेब! लेकरू उपाशी आहे. दोन प्रती घ्या,’ असं करून आत्मचरित्र विकू लागले. ठाण्यात १९८८ मध्ये माधवराव गडकरी, अनुताई वाघ यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं, तोपर्यंत पायात चप्पल घातलेली नव्हती. निवृत्त सैनिकाने आपल्या हाताने मला चप्पल घातली. दुसरी आवृत्ती कऱ्हाड, सातारा तर तिसरी कोल्हापूरमध्ये साहित्य संमेलनात प्रकाशित झाली. माझ्या लेकरांसाठी मी जगलेलं आयुष्य विकून मी त्यांना जगवलं. आता ‘अजब पुस्तकालय’ने माझं आत्मचरित्र नव्याने प्रकाशित केलंय. त्यांनी काढलेली ही दुसरी आवृत्ती आहे. यात मी माझ्या आयुष्यातील सगळय़ाच घटना, जे जे खरं आहे ते लिहिलं. जेव्हा मी पहिल्यांदा आत्मचरित्र लिहिलं त्या वेळी मला कोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे मी लिहिलेल्या ख-या घटनाही लोकांना खोटय़ा किंवा अतिशयोक्तीच्या वाटल्या असत्या. त्यातील एक जरी घटना जगाला खोटी वाटली असती तर लोकांचा माझ्या आत्मचरित्रावरचा, माझ्यावरचा विश्वास उडाला असता. म्हणून सुरुवातीच्या आत्मचरित्रात गाळलेल्या गोष्टी या नवीन आत्मचरित्रात समाविष्ट केल्या आहेत. मात्र, चित्रपटात हे सर्व दाखवलंय.
आता तुमच्यावर माहितीपटही येतोय?
> होय. ‘अनाथांची यशोदा’ नावाचा माहितीपट येतोय. कोल्हापूर येथील परेश भोसले यांनी माझं भाषण ऐकलं आणि त्यांना माझ्यावर माहितीपट काढावा, असं वाटू लागलं. माझ्या आयुष्यावर सिनेमा आहे, पण त्यात मी नाही. या माहितीपटात खरीखुरी मी आहे. माझ्या संस्था, गाई, माझी मुलगीही आहे. तिने लिहिलेलं गाणंही आहे. हा माहितीपट म्हणजे माझा खरा जीवनपट आहे. अमेरिकेत भाषण करतानाच तमिळभाषक अनंत महादेवन यांना माझ्यावर चित्रपट बनवावासा वाटला. भाषणामुळे असे अनेक फायदे झाले. माझाच एक मुलगा माझ्यावर पीएचडी करतोय. आता बोला!
तुमची मोठी झालेली मुलं तुम्हाला मदत करतात? भविष्यातील तुमचे संकल्प काय?
> मी एक आई आहे. त्यांना माया लावणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांना योग्य मार्गी लावण्यासाठी धडपडणं हे माझं काम आहे. मी त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही. आज माझ्या २४२ मुलांची लग्नं झाली आहेत. मला २४२ सुना आहेत. कुणी इंजिनीअर, कुणी डॉक्टर, तर कुणी एलएलबी आहे, पण माझी कोणाकडून काहीही अपेक्षा नाही. त्यांना मदत करायची असेल तर ती करतील, पण त्यांना त्यांचे संसार आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबात रमायचं असेल तर त्यांना मी अडवत नाही आणि भविष्यातील संकल्प म्हणाल तर माझा मुक्काम पोस्ट फिरस्तीच आहे. राशन मिळवण्यासाठी चारचाकी गाडीतून भटकंती सुरूच आहे. तोच माझा ध्यास होता आणि असेलही. तुमच्यावर संकट कोसळलं तर त्याच्यावर पाय देऊन उभे राहा. संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहू शकलात तर तुम्ही त्याच्या पलीकडे पाहू शकाल. शेवटी एवढंच म्हणेन, फुलांच्या पायघडयांवर चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका कारण काटयांना फक्त बोचणं माहीत असतं,वेदना कळत नसतात म्हणून सांभाळून,बाळांनो सांभाळूनकाटयांशी दोस्ती करा आणि जगायला लागा,दोन काटयांची फुलं होतीलजगा आणि जगू द्या दिवाळी नेहमी मुलांबरोबरच दिवाळी माई पूर्णपणे आपल्या मुलांबरोबरच साजरी करतात. दिवाळीत त्यांची फिरती थांबलेली असते. मुलांबरोबर दिवाळी साजरी करणं, ही त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणी असते. हा आनंद त्या गमावू इच्छित नाहीत. दिवाळी हा सण सोडल्यास पूर्ण वर्षभर त्या या ना त्या कारणांमुळे पायाला चक्री बांधल्यासारख्या फिरत असतात. या फिरस्तीत त्या भाषण देतात. स्वानुभव कथनातून इतरांना जगण्यासाठी प्रेरणा देतात. ‘भाषण दिल्यावरच राशन मिळतं,’ हे त्यांचं ब्रीदवाक्य झालं आहे. आपल्या भाषणांत कविता, गाणी आणि प्रासंगिक विषयाला धरून अनुभवकथन करतात.