संगीत ही अमूर्त कला आहे. ही शब्दकोशविरहित भावनांची भाषा असून संगीतकार स्वरकल्पनेच्या माध्यमातून आपल्या भावविश्वातील अनुभव श्रोत्यांसमोर ठेवत असतो. शास्त्रीय संगीतामुळे स्वैर कल्पनाविलासाला सुरांचे मजबूत अधिष्ठान लाभते. इथे पिलू रागावर दिल्या गेलेल्या विविध संगीतकारांच्या सौंदर्यपूर्ण चित्रपट संगीत रचनांचा आढावा घेतला आहे.
पिलू रागात दोन गांधार, दोन धैवत व दोन निषाद लागतात. इतर स्वर शुद्ध लागतात. रागाचे ढोबळ स्वरूप असे आहे –
आरोह : नि सा ग म प नी सा
अवरोह : सा नी ध प (नी कोमल) ध प म ग (ध प ग कोमल) रे सा
नि सा रे सा नी ध प ध म प नी सा (ऋषभ धैवत कोमल)
आणि म प नी ध मंद्रसप्तकातील भैरवीमध्ये सर्व कोमल स्वरांना प्राधान्य दिले जाते, तर पिलूमध्ये शुद्ध स्वरांना कोमल स्वरांची सौंदर्यपूर्ण जोड दिली जाते. विशिष्ट अंगांनी दिलेली ही जोड अनेक भावनांचा आविष्कार घडवते. ठुमरी, कजरी, लोरीसारखे भावनाप्रधान संगीतप्रकार या रागात पेश केले जातात. विशेषत: करुण व शृंगाररसाची यातून व्युत्पत्ती होत असल्याने चित्रपट संगीतात याचा प्रामुख्याने वापर झालेला दिसतो.
ओ. पी. नय्यरला आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला साथ दिली ती या पिलू रागानेच.बोल परदेसीया
हाय तुने क्या किया
अपना बनाके सय्या
हाए दगा दे दिया
बोल परदेसीया
हाए तूने क्य किया
अपना बनाके सय्या
हाए दगा दे दिया
बोल परदेसीया
चित्रपट : मंगू (१९५४) गायिका : आशा भोसले
पियानोचा कर्णप्रिय -हीदम, व्हायोलीनचे हूरहूर लावणारे स्वर व आशाचा आर्जवी भावपूर्ण आवाज, कशाचे म्हणून कौतुक करायचे? सर्वच एकापेक्षा एक गोड.
अपना बनाके जालीम
हाए दगा दे दिया
ही सौंदर्यपूर्ण हळूवार जागा ओ. पीं.नी केवळ आशासाठीच निर्माण केली आहे, असे वाटते. पिलूचा उपयोग त्याने परत ‘फागून’ (१९५८) चित्रपटातही केला, पण इथे गाण्याच्या यशामध्ये मधुबालाच्या अवखळ भूमिकेचाही मोठा वाटा होता, हे विसरून चालणार नाही.
‘अलबेला’ (१९५१) चित्रपट त्यातील कर्णप्रिय संगीताने गाजला. कुणाला त्यातील झिंग आणणारे, ‘भोली सूरत दिलके खोटे’ आवडले, तर कोणी, ‘दीवाना परवाना’चे दिवाने झाले. काही दर्दी ‘बलमा बडा नादान’वर मुग्ध झाले, पण मला आवडली ती पिलूवर आधारित दिलेली लोरी. तीसुद्धा अण्णांनी (सी. रामचंद्र) गायिलेली.
धीरे रे आ जारी अंखियन में, निन्दिया आ जारी आजा
त्यांच्यातील संगीतकाराला गायक-वादक-कलाकारांकडून काय अभिप्रेत आहे, ते त्यांनी स्वत: गाऊन दाखवले आहे. गीतातील शब्दांना अजिबात धक्का न लावता, त्यातील गांभीर्य, सहज सुंदर पण इतक्या हळुवारपणे पेश केलं आहे की झोपेतसुद्धा चित्त विचलित होणार नाही. गाण्यातील तारशहनाईच्या सुरेख साथीचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल.
यापूर्वी पिलूचा असाच सहजसुंदर वापर ‘हाफीज खानी जिनत’ (१९४५) चित्रपटातही केला होता.
आ जा री निन्दिया तू आ
तू न जा
नन्हे की आँखोमें घूल मिल जा
खालच्या पट्टीत नूरजहाँनने आळवलेली ही लोरी केवळ लाजवाब आहे.
‘उडनखटौला’ (१९५५) चित्रपटाची आठवण येताच डोळय़ासमोर उभी राहते, ती निम्मी, तिचे ते भावपूर्ण करुण नेत्र, परदेशी बाबूंवर जीवापाड प्रेम करणारी ती लोभसवाणी गोजिरी मूर्ती हळूवारपणे मनधरणी करत आहे –
मोरे सय्या जी उतरेंगे पार हो
नदिया धीरे बहो
कोरस व हंमिशमुळे पिलूवर दिलेल्या या गाण्याची लज्जत अधिकच वाढली आहे. नौशादनी ‘शबाब’ (१९५४) चित्रपटातही या रागाचा सुरेख वापर केला आहे.
चंदन का पलना रेशम की डोरी,
झुला झुलाएक निन्दिया को तोरी
लता व हेमंतकुमारचे लक्षात राहण्यासारखे हे युगुलगीत आहे.
आजच्या तरुण पिढीला विनोद या उच्च अभिरुचीच्या संगीतकाराचं नाव कदाचित ऐकून माहीत असेल! या विनोदचे ‘अनमोल रतन’ (१९५०) चित्रपटात या रागावर आधारित एक बेजोड गीत आहे.
दिल मिला है तेरे प्यार की निशानी
गाण्यातील लोण्यासारखे मुलायम स्वर आपल्याला एका वेगळय़ा विश्वात घेऊन जातात. या गाण्यातील जोडकामावर संगीतातील जाणकार मंडळीही फिदा होतील.
विनोदने ‘रम्मन’ (१९५४) चित्रपटातही परत या रागाचा उत्तम वापर केला आहे.
दिया जलाके सारी रात हाएऽ तेरा किया है इंतजारऽऽ
आड लयीतील या गाण्यात आशाने घेतलेली, हाएऽऽ तेरा किया है इंतजारऽऽ ही जागा ऐकताना उत्स्फूर्त दाद आलीच पाहिजे. इतके परिणामकारक हे गाणे आहे.
‘दुल्हन एक रात की’ या चित्रपटात मदनमोहनने आपल्या ढंगाने पिलूवर आधारित चाल दिली आहे.
मैने रंग ली आज चुनरिया सजना तोरे अंगना
वास्तविक ही सर्व गाणी एकाच रागावर आधारित आहेत. तरीही त्यात काहीतरी वेगळेपणा आहे. ताजेपणा आहे. ती सारखी ऐकावीशी वाटतात. शास्त्रीय संगीताचं हेच वैशिष्टय़ आहे.