शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत माता की जय!..
मुंबई- शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत माता की जय!.. न म्हणणा-यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, या वक्तव्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
यावेळी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे संजय दत्त यांनी मुख्यमंत्र्यांच्या भारत माता की जय, म्हणण्याच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवत सत्ताधारी पक्षाची सभागृहात कोंडी केली. यामुळे सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब केले.
काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव मांडताना शनिशिंगणापूर येथील चौथ-यावर सध्या केवळ पुरुषांनाच प्रवेश असल्याने या विरोधात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री भारत माता की जय न बोलणा-यांना या देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य करून एका संविधानिक पदाचा अवमान करत असल्याचा मुद्दा दत्त यांनी उपस्थित करून यावर चर्चेची मागणी लावून धरली.
मात्र सभापतींनी या प्रस्तावावरील चर्चा फेटाळल्याचे सांगताच सभागृहात विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याचदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपलाही हाच प्रस्ताव असून त्यावर बोलण्याची संधी देण्याची मागणी सभापतींकडे केली. मात्र यावर संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी हरकत घेतल्याने सभागृहात पुन्हा गोंधळ सुरू झाला.
राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी हे सरकार सनातनी हिंदूंच्या आधिपत्याखाली काम करत असल्याचा आरोप केला. या आरोपाने बापट संतप्त झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने महिलांसाठी शनिशिंगणापूरचा चौथरा खुला केला आहे.
आम्ही कोणालाही अडवले नाही. या प्रकरणी चर्चेची सरकारची तयारी आहे. मात्र, बापट वस्तुस्थिती नाकारत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे निंबाळकरांनी गोंधळातच दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
ओवेसीला अटक का नाही?
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही उदगीर येथे ओवेसी येऊन मी भारत माता की जय म्हणणार नाही, असे वक्तव्य करतो, त्याला तुम्ही अटक का केली नाही, असा सवाल केला. एमआयएमने विषय काढायचा व त्यावर भाजपाने फुंकर घालायची, असे परस्परपूरक उद्योग सुरू असल्याचा आरोपही मुंडे यांनी सरकारवर केला.
दरम्यान महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी याविषयी मुख्यमंत्री सभागृहात निवेदन करणार असल्याची माहिती दिल्याने सभागृहातील वातावरण निवळले.