भारत व चीन शेजारी राष्ट्रे असून उभय देशांमध्ये शांतीपूर्ण सहकार्य वाढल्यास त्याचा लाभ २५० कोटी लोकांना होईल. याशिवाय संपूर्ण आशिया खंडाला त्याचा लाभ होईल.
मुंबई – भारत व चीन शेजारी राष्ट्रे असून उभय देशांमध्ये शांतीपूर्ण सहकार्य वाढल्यास त्याचा लाभ २५० कोटी लोकांना होईल. याशिवाय संपूर्ण आशिया खंडाला त्याचा लाभ होईल, असे उदगार चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे तिसरे सर्वोच्च नेते व नॅशनल पीपल्स कॉँग्रेसचे (संसद) स्थायी समिती अध्यक्ष चांग दचियांग यांनी रविवारी काढले. महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव यांची दचियांग यांनी रविवारी राजभवन मुंबई येथे भेट घेतली.
भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये काही ऐतिहासिक विषयांवर जुने मतभेद आहेत. मात्र मतभेत असलेले विषय सामोपचाराने हाताळल्यास परस्पर मैत्रीपूर्ण संबंधांना बाधा येणार नाही, असे सांगून दचियांग पुढे म्हणाले की, आपण कोरिया दौरा आटोपून येथे आलो आहोत. कोरियाची लोकसंख्या केवळ ५ कोटी तर भारताची १२५ कोटी आहे.
तरीही चीन-कोरिया यांचा व्यापार भारत-चीन व्यापाराच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे. भारत-चीन देशांमध्ये अलीकडच्या काळात जवळपास पन्नास करार झाले असून येत्या तीन वर्षात त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आपण स्थानिक राजकारणातून वर आलो असल्याचे नमूद करून भारताप्रमाणेच चीन देखील प्रांतीय व स्थानिक शासन व्यवस्थेच्या बळकटीकरणाचा समर्थक आहे. त्यामुळे भारत आणि चीनच्या प्रांतीय विधिमंडळांमध्ये देवाण-घेवाण वाढावी, अशी अपेक्षा दचियांग यांनी व्यक्त केली. आज चिनी लोक मोठय़ा प्रमाणात पर्यटन करत आहेत.
वर्षाला दहा लाख चिनी पर्यटक जरी आले तरीही त्याचा फार मोठा फायदा भारताला होईल, असेही दचियांग म्हणाले. पर्यटन विकासासोबत परस्पर विद्यापीठ सहकार्य तसेच विद्यार्थी देवाण-घेवाण वाढवण्यात यावी, या राज्यपालांच्या मताशी आपण सहमत असल्याचे दचियांग यांनी सांगितले.