प्रीटोरिया (दक्षिण आफ्रिका) – भारताच्या ‘अ’ संघाने अफगाणिस्तान ‘अ’ संघावर विक्रमी ११३ धावांनी मात करत तिरंगी वनडे स्पर्धेतील दुस-या विजयाची नोंद केली.
मंगळवारी झालेल्या लढतीत भारत ‘अ’चे ३२३ धावांचे मोठे आव्हान प्रतिस्पध्र्याना पेलवले नाही. त्यांना ९ बाद २०९ धावा करता आल्या. भारतातर्फे मोहम्मद सिराज (३ विकेट), विजय शंकर आणि सिद्धार्थ कौलने (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी मारा केला. भारत ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३२२ अशी मोठी धावसंख्या उभारली. भारताला तीनशेपार नेण्यात कर्णधार मनीष पांडे (८७ चेंडूंत ८६ धावा) आणि रिषभ पंतचा (५९ चेंडूंत ६० धावा) मोठा वाटा आहे. कृणाल पंडय़ाने २७ चेंडूंत ४८ धावा फटकावत त्यांना सुरेख साथ दिली. पांडेने नऊ चौकार आणि एक षटकार ठोकला. पंतच्या अर्धशतकात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. कृणालने सात चौकार आणि एक षटकार लगावला.
मुंबईकर श्रेयस अय्यरने रिषभसह २०.१ षटकांत शतकी सलामी दिली. मात्र श्रेयसला २२व्या षटकात बाद करण्यात शर्फुद्दीन अश्रफला यश आले. श्रेयसने ५५ चेंडूंत ६ चौकारांच्या साहाय्याने ४४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर पांडे आणि पंत जोडी जमली. या जोडीने ४२ धावा जोडताना २८व्या षटकात भारताचे दीडशतक फलकावर लावले. कर्णधार पांडने दीपक हुडासह (३२ धावा) चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपार नेले. शेवटच्या षटकांत कृणाल पंडय़ाच्या फटकेबाजीमुळे भारताने ३२२ धावांची मजल मारली.