गेल्या सात वर्षापासून विविध मुद्द्यांवर अडलेला भारत-अमेरिका नागरी अणू कराराचा तिढा रविवारी यशस्वीपणे सुटला.
नवी दिल्ली- गेल्या सात वर्षापासून विविध मुद्द्यांवर अडलेला भारत-अमेरिका नागरी अणू कराराचा तिढा रविवारी यशस्वीपणे सुटला.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. याबरोबरच संरक्षण हस्तांतर, स्मार्ट सिटी प्रकल्प, वातावरण बदल, विज्ञान-तंत्रज्ञानात सहकार्य आदींबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाले.
प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून तीन दिवसांच्या दौ-यावर आलेल्या बराक ओबामा यांचे भारतात शाही स्वागत झाले. पंतप्रधान मोदी यांनी शिष्टाचार सोडून ओबामा यांचे विमानतळावर स्वागत केले.
या दौ-यातील वैशिष्टय़ म्हणजे नागरी अणू कराराचा सुटलेला तिढा. सात वर्षात दोन्ही देशांमध्ये या करारातील काही अटींवर मतभेद होते. विशेषकरून अणुभट्टीचा अपघात झाल्यास नुकसान भरपाईवरून वाद होते. तसेच अमेरिका आणि अन्य देशांकडून भारताला दिल्या जाणा-या अणू इंधनावर त्यांचे नियंत्रण असणार होते. या दोन्ही मुद्दय़ावर आता यशस्वी तोडगा निघाला आहे.
गेल्या काही वर्षापासून अडकलेला हा तिढा सुटलेला आहे. हा करार आता मार्गी लागला आहे, असे परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागार बेन ऱ्होडस म्हणाले की, नागरी अणुकरारावरून झालेला तिढा सुटलेला आहे. अणू इंधनावर लक्ष आणि नुकसानभरपाई हे अमेरिकेचे चिंतेचे विषय होते. भारताने याबाबत ठोस आश्वासन दिले आहे. या करारामुळे अमेरिकी कंपन्यांना भारतीय आण्विक बाजारपेठ खुली होणार आहे.
दोन्ही देशांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा म्हणाले की, अमेरिका व भारत यांच्यात संरक्षण भागीदारी प्रगतीपथावर आहे. येत्या १० वर्षासाठी नवीन सहकार्य करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. संरक्षण भागीदारी नवीन उंचीवर नेण्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे. अत्याधुनिक संरक्षण प्रकल्पांची सहनिर्मिती व सहउत्पादन केले जाईल.
अमेरिकेशी संरक्षणविषयक करार केल्याने स्थानिक संरक्षण उद्योगाला चालना मिळणार आहे. तसेच भारतातील संरक्षण उद्योगाचा मोठय़ा प्रमाणावर विस्तार होऊ शकतो. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही दोन्ही देशांना मोठी संधी मिळेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भारत-अमेरिका यांच्यात हॉटलाइन संपर्क सेवा
भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे अध्यक्ष यांच्यात चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांनी पहिल्यांदाच खास हॉटलाईन विकसित करण्याचे ठरवले आहे. ही हॉटलाईन दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना चर्चा करण्यासाठी वापरता येऊ शकेल.
दोन्ही देशांचे दहशतवादविरोधात सर्वकष जागतिक धोरण
दहशतवादाविरोधात र्सवकष जागतिक धोरण तयार करण्यावर दोन्ही देशांनी मान्यता दिली. तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जागतिक स्तरावर दहशतवादाचा मोठा धोका आहे. दहशतवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रत्येक देशाने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच दहशतवाद्यांना कठोर शासन केले पाहिजे, असे दोन्ही देशांनी ठरवले आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांनी तंत्रज्ञान सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- व्यापार-आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर
- दोन्ही देशांतील व्यापार १०० अब्ज डॉलर्सपेक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न
- स्वच्छ ऊर्जा, वातावरण बदलासाठी खास उपाययोजना
- भारताच्या सौरऊर्जा प्रकल्पांना साहाय्य, भारतातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रकल्प
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यासाठी मदत
- आशिया-प्रशांत क्षेत्रात नवीन सहकार्य योजना
- दहशतवादविरोधी कठोर उपाययोजना करणार
ओबामांचे आभार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसाच्या भारत दौ-यावर असून रविवारी दुपारी हैद्राबाद हाऊसमध्ये ओबामा आणि मोदी यांच्यात सुमारे दीड ते दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर ओबामा आणि मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदींनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून भारत दौ-यावर आल्याबद्दल ओबामांचे आभार मानले. दोन्ही देशांमधील नैसर्गिक संबंध असून संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील असे मोदींनी सांगितले. दहशतवादाविरोधात लढण्यात दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. तर ओबामा यांनीही भारतीयांच्या आदरातिथ्यामुळे भारावून गेल्याचे सांगितले.
हिंदीचा शब्दांचा वापर
नमस्ते, नमस्कार, भारतवासीयों को मेरा प्यार भरा नमस्कार.. असे सांगत ओबामा यांनी भाषणाची सुरुवात केली. ‘चाय पे चर्चा’ या हिंदी शब्दाचा वापर करुन त्यांनी भारतीयांवर स्वतःची छाप पाडण्याचा प्रयत्न केला.