भारतीय सैन्यातील मनुष्यबळ कमी करण्याची आवश्यकता असल्याचे संकेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले आहेत. याबाबत पर्रिकर म्हणाले की, संरक्षण यंत्रणेवर होणारा अतिरिक्त खर्चाचा बोजा कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे.
नवी दिल्ली – भारतीय सैन्यातील मनुष्यबळ कमी करण्याची आवश्यकता असल्याचे संकेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले आहेत. याबाबत पर्रिकर म्हणाले की, संरक्षण यंत्रणेवर होणारा अतिरिक्त खर्चाचा बोजा कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे. यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. याचे कारण यंदा संरक्षण क्षेत्रातील केवळ वेतनावर ९५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय संरक्षण मंत्रालयाचा निवृत्ती वेतनावरही मोठा खर्च होणार आहे.
पर्रिकर यांच्या म्हणण्यानुसार वेतन आणि पेन्शनच्या वाढत्या ओझ्याने निधी कमी पडत आहे. याचा थेट परिणाम भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणावर होत आहे. यासाठी सैन्यातील खर्च कमी करता येईल असा दलातील विभाग शोधण्यास सांगण्यात आला आहे. उदाहरणार्थ, पूर्वी सैन्यात प्रत्येक ठिकाणी टेलिफोन ऑपरेटर होते. मात्र आधुनिकीकरणामुळे अतिरिक्त टेलिफोन ऑपरेटरची अवश्यकता नसल्याने इथे मनुष्यबळ कमी केल्यास बचत होईल. या वर्षी संरक्षण मंत्रालय वेतनाशिवाय ८२,३३३ कोटी रुपये पेन्शनवर खर्च करणार आहे.
संरक्षण दलातील साधनसामग्रीवर या वेळी ८० हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र गेल्या वर्षी यासाठी १४ हजार कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला होता. भारतीय संरक्षण दलातील भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही विभागांमध्ये जवळपास १३ लाख सनिक आहेत.