बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये गुरुवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. नवव्या फेरीत भारताच्या महिलांना रशियाकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला
इस्तंबूल – बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये गुरुवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. नवव्या फेरीत भारताच्या महिलांना रशियाकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पुरुषांना जॉर्जियाकडून 2-2 अशा बरोबरीत समाधान मानावे. आणखी एका बरोबरीमुळे पुरुष संघ जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. के. शशीकिरण आणि पी. हरिकृष्ण यांचे डाव बरोबरीत सुटले. त्यातच जी. एन. गोपाल पराभूत झाल्याने भारतावर पराभवाचे सावट होते. मात्र अभिजित गुप्ताने विजय नोंदवल्याने पराभव टाळता आला. नवव्या फेरीनंतर 12 गुणांसह भारत संयुक्तपणे 17व्या स्थानावर फेकला गेला आहे.
महिलांमध्ये फॉर्मात असलेल्या तानिया सचदेवसह डी. हरिकाला बरोबरीत समाधान मानावे लागले. मात्र ईशा करवडे आणि सौम्या स्वामिनाथन पराभून झाल्याने भारताला विजयी घोडदौड राखता आली नाही. या पराभवामुळे भारताची दुस-या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. नवव्या फेरीनंतर भारत संयुक्तरित्या सातव्या स्थानी आहे. अद्याप दोन फे-या शिल्लक असल्याने भारताला अजून जेतेपदाची संधी आहे.
दहाव्या फेरीत भारताची गाठ कमकुवत इस्त्रायलशी पडेल. नवव्या फेरीनंतर पुरुषांमध्ये चीन, अर्मेनिया, अमेरिका आणि रशियाने संयुक्तरित्या अव्वल स्थान राखले आहे. प्रत्येकाच्या खात्यात 15 गुण आहेत. महिलांमध्ये चीनने वर्चस्व कायम ठेवत फ्रान्सवर 3-1 असा विजय मिळवला.