भारतातील प्रत्येक शाळेत बुद्धिबळ खेळ खेळला जावा, असे माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदचे स्वप्न आहे. एका पुस्तकासाठी लिहिलेल्या स्तंभात त्याने ही इच्छा व्यक्त केली आहे.
न्यूयॉर्क- भारतातील प्रत्येक शाळेत बुद्धिबळ खेळ खेळला जावा, असे माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदचे स्वप्न आहे. एका पुस्तकासाठी लिहिलेल्या स्तंभात त्याने ही इच्छा व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळावर रशियाने वर्चस्व गाजवले तरी आपण प्रयत्न केल्यास भारतातही अनेक सवरेत्कृष्ट बुद्धिबळपटू निर्माण होतील, असे त्याला वाटते. ‘‘बुद्धिबळ हा खेळ रशियन लोकांच्या रक्तात आहे. मात्र आपल्या मुलांमध्ये बुद्धिबळाची गोडी निर्माण केली. तसेच त्यांना वेळ दिल्यास भारतातही बुद्धिबळाचे ‘कल्चर’ निर्माण होईल,’’असे आनंदने ‘रीइमॅजिनिंग इंडिया : अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ आशियाज् नेक्स्ट सुपरपॉवर’ या पुस्तकात लिहिले आहे.
आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा ठसा उमटवण्यात मला यश आले, असे त्याने पुढे म्हटले आहे. ‘‘नैसर्गिक खेळ करताना जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करत भारताचे नाव मोठे केले, याचा मला अभिमान वाटतो,’’असे आनंदने सांगितले. या वेळी आनंदने ऐंशीच्या दशकातील पहिल्या रशिया भेटीची आठवण सांगितली. ‘‘त्या वेळी मॉस्कोत पोहोचल्यावर प्रत्येक जण (अगदी टॅक्सी ड्रायव्हरसुद्धा) मला ‘चेकमेट’ देतोय की काय, असे वाटत होते. रशियात बुद्धिबळ खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. जिकडे तिकडे बुद्धिबळ पाहायला मिळतो. मात्र गेल्या काही वर्षात रशियाच्या बुद्धिबळ साम्राज्याला धक्के बसत चालले आहेत. चीन, नॉर्वे, अर्मेनिया आणि इस्रयलमधील अनेक प्रतिभावंत बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत,’’असे त्याने म्हटले.
भारताचा पहिला जगज्जेता बनणे, हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे आनंदने म्हटले. ‘‘मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्या वेळी भारतात हा खेळ तितका प्रगत आणि प्रसिद्ध नव्हता. या खेळाबद्दल फारसे बोलले जात नव्हते. मात्र आता भारतात बुद्धिबळाच्या अनेक अॅकॅडमी आहेत. अनेक उघडल्या जात आहे. माझ्या जगज्जेतेपदानंतर भारतात बुद्धिबळाची दखल घेतली गेली. त्याचे फलस्वरूप आज अनेक चांगले बुद्धिबळपटू आपल्याकडे तयार होत आहेत,’’ असे आनंदने सांगितले.