या वर्षी पावसाचा हंगाम चांगलाच होईल याची खात्री देणे धाडसाचे आहे; पण आहे त्या परिस्थितीला दोन हात केल्याशिवाय गत्यंतर नाही हे शेतकरी बांधवांनी विसरून चालणार नाही.
भात हे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील महत्त्वाचे पीक असून खरीप हंगामात या पिकाखाली सुमारे ७०,००० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. गेल्या काही वर्षामध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या पिकाखाली क्षेत्रात घट दिसून येते. या पिकाखालील क्षेत्र जरी कमी झाले तरी सध्या उपलब्ध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हेक्टरी उत्पादन वाढविण्यास फार मोठा वाव आहे. यामध्ये योग्य जातीची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा वापर, योग्य अंतरावर लागवड, चारसुत्री पद्धतीचा वापर, आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन तसेच एकात्मिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
शेतकरी सुधारित जातींबरोबरच मोठ्या प्रमाणावर खासगी कंपनीच्या संकरित जातींचा लागवडीसाठी वापर करतात. संकरित जातींची निवड करताना त्या जातीचा कालावधी, उत्पादन क्षमता त्याचबरोबर कीड व रोगप्रतिकार क्षमता या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील/वाडीतील एखाद्या शेतक-याने यापूर्वी त्या जातीची लागवड केली असल्यास त्याचा पूर्वानुभव लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपल्याला जमिनीच्या स्थानिक परिस्थितीला योग्य अशा जातीची निवड करता येईल. सुधारित जातींच्या बाबतीत उदाहरण द्यायचे झाल्यास मसुरी या जातीचे देता येईल.
शेतकरी चवदार तांदूळ,मध्यम बारीक दाणा व १४०-१४५ दिवसांचा कालावधी असलेल्या मसुरी जातीची लागवड करतात. मात्र या जातीवर जवळपास दरवर्षी मोठ्या प्रमाणावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यामुळे शेतक-यांनी या जातीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन या जातीऐवजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी शिफारस केलेल्या कर्जत -८ या जातीची लागवड करावी. या जातीचा दाणा बारीक असून कालावधी १४०-१४५ दिवस आहे. या जातीची उत्पादन क्षमता ३५-४० क्विंटल आहे. तसेच ही जात करपा रोगास कमी बळी पडणारी आहे.
शेतक-यांकडील जनावरांची संख्या कमी झाल्याने शेतीमध्ये शेणखताचा वापर कमी झालेला आहे. त्याचबरोबर उपलब्ध असलेल्या शेणखताचा वापरसुद्धा आपण चुकीच्या पद्धतीने करीत आहोत. पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात बरेच शेतकरी शेतात शेणखत छोटे छोटे ढीग करून टाकून ठेवतात आणि शेतामध्ये त्याचा प्रत्यक्ष वापर करेपर्यंत त्यातील बरेचसे शेणखत पावसाने वाहून गेलेले असते. त्यामुळे पिकाच्या दृष्टीने त्या शेणखताचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे दुस-या नांगरणीच्या वेळी किंवा चिखलणीच्यावेळी उपलब्ध शेणखत देण्याचे नियोजन केल्यास त्याचा मोठा उपयोग होईल. शक्य झाल्यास गिरीपुष्पासारख्या हिरवळीच्या खताचा वापर करावा.
रासायनिक खतांच्या बाबतीत फक्त युरियाऐवजी नत्र, स्फुरद, व पालाश हे तिन्ही घटक असलेल्या खताचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. हल्ली ब-याच शेतक-यांना कृषी विभागाच्या विविध योजनांमधून माती परीक्षण करून अहवाल उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यानुसार खताची मात्रा पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विभागून दिल्यास उत्पादनात मोठा फरक पडतो. चारसुत्री पद्धतीने भात लागवड करुन युरिया-डिएपी बिक्रेटचा वापर केल्यास खते वाहून न जाता दिलेल्या खताचा ८० टक्के भाग पिकास उपयोगी पडतो व त्याचबरोबर हेक्टरी खतांच्या खर्चात ४० टक्के बचत होते. कृषी विज्ञान केंद्रामार्फतसुद्धा माफक दरात माती परीक्षण करून दिले जाते.
ब-याच वेळा शेतकरी योग्य अंतरावर लागवड न करता घन लागवड करतात. त्याऐवजी ओळीत लागवड केल्यास लागवडीनंतर २० दिवसांनी व ४० दिवसांनी जपानी कोळप्याचा वापर करता येतो. कोळप्याचा वापर केल्यामुळे तणांचे नियंत्रण होते. त्याचबरोबर जमीन भुसभुशीत होऊन मुळांची वाढ होते. पर्यायाने पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पन्नात १०-१५ टक्के वाढ होते. सध्या शेतात काम करणारे मनुष्यबळ कमी असल्याने दोरी लावून ओळीत लागवड करणे शेतक-यांना शक्य होत नाही. अशा वेळी निदान जमिनीच्या मगदुरानुसार अंदाजे १५ बाय १५ सें.मी. किंवा २० बाय १५ सें.मी. लागवड अंतर राहील अशा पद्धतीने लागवड करावी. योग्य अंतर ठेवल्यामुळे रोपांची एकमेकांशी अन्नद्रव्यांची स्पर्धा कमी होऊन पिकांची वाढ जोमदार होईल. त्याचबरोबर किडी व रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी राहील.
अधिक उत्पादनासाठी भाताच्या शेतातील पाण्याची पातळीसुद्धा विविध अवस्थांमध्ये योग्य राहणे आवश्यक आहे. मागील काही वर्षामध्येच पावसात खंड पडतो. अशावेळी शक्य असल्यास पाण्याची पातळी योग्य राहील याची दक्षता घ्यावी. लावणीनंतर पहिले ३० दिवस पाण्याची पातळी २.५ ते ५.० सें.मी., लोंब्या येण्यापूर्वी व आल्यानंतर १० दिवस १० सें.मी. आणि दाणे भरेपर्यंत ५.० सें.मी. ठेवणे आवश्यक आहे. आपल्याकडे हवेत जास्त प्रमाणात असणारी आद्र्रता, अनियमित पाऊस, ढगाळ हवामान, मध्येच पडणारा जोराचा पाऊस आणि ऊन-पाऊस या बाबी भातावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत आहेत. भातावर प्रामुख्याने लष्करी अळी, निळे भुंगे, पाने गुंडाळणारी अळी या किडींचा तसेच करपा व कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. गेले काही वर्षे लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव ठरावीक गावांमध्ये दरवर्षी आढळून येतो. अशा ठिकाणी या किडीच्या बाबतीत दक्ष राहणे आवश्यक आहे. कारण या किडीच्या अळ्या रात्रीच्या वेळी लष्कराप्रमाणे समूहाने हल्ला करतात व दिवसा जमिनीत किंवा चुंडामध्ये लपून राहतात. हा किडा विविध पिकांवर तसेच जंगलातील विविध वनस्पतींवर उपजीविका करतो. त्यामुळे या किडीच्या अळ्या भातशेतीच्या शेजारी असणा-या जंगलातून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येतात. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीला ओढय़ाच्या शेजारील खाचरांमध्ये प्रथम आढळून येतो. निळे भुंगे या किडीच्या अळ्या व भुंगे पानांवर उपजीविका करतात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे दिसून येतात. यालाच शेतकरी स्थानिक भाषेत ‘शेड पडला’ असे म्हणतात. या किडीचा प्रादुर्भाव ज्या शेतात पाणी साचून राहते अशा ठिकाणी आढळून येतो. पावसाने ओढ दिल्यावर शेतकरी शेतात पाणी बांधून ठेवतात अशा शेतात या किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. त्यामुळे पाणी वाहते राहील याची दक्षता घ्यावी. तसेच पाणथळ ठिकाणी शिफारशीपेक्षा कमी वयाच्या रोपांची लागवड केलेल्या शेतातसुद्धा या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. ज्या शेतात नत्रयुक्त खताच्या जास्त वापरामुळे जोमदार वाढ होते अशा ठिकाणी पाने गुंडाळणा-या किडीचा प्रादुर्भाव बांधावरील गवतावरसुद्धा आढळून येतो. त्यामुळे शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतात पाणी बांधून ठेवावे व त्यानंतर पिकावरती दोन आडवा ओढत न्यावा त्यामुळे अळ्या पाण्यात पडतील. नंतर शेतातील पाणी बाहेर काढून त्याबरोबर बाहेर पडणा-या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. निळ्या भुंग्याचा प्रादुर्भाव पाणथळ जमिनीत जास्त होत असल्याने पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी. लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पाणी बांधून ठेवावे. त्यामुळे अळय़ांना पाण्यामध्ये लपता येणार नाही व अळ्या रोपावरती चढून पक्षांना खायला मिळतील. पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास १० लिटर पाण्यात २० मिली मॅलॅथिऑन किंवा २० ग्रॅम कार्बारील पावडर मिसळून फवारणी करावी. निळे भुंगे या किडीच्या नियंत्रणासाठीवरील प्रमाणात कार्बारील या कीटकनाशकाचा वापर करावा. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात सायपर मेथ्रिन २५ टक्के ३ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १४ मिली मिसळून फवारणी करावी. शेतीचा वाढत जाणारा उत्पादन खर्च, मनुष्यबळाची कमतरता, बदललेले हवामान या सर्व गोष्टींचा विचार करता शेतीमध्ये अधिक उत्पन्न घेण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.