राज्यातल्या सरकारला संवेदना राहिल्या नसून रोज शेतकरी मरत असताना सरकार ढिम्म बसले आहे.
लातूर/उस्मानाबाद- राज्यातल्या सरकारला संवेदना राहिल्या नसून रोज शेतकरी मरत असताना सरकार ढिम्म बसले आहे. भाजप – शिवसेना सरकारचा कारभार निझाम राजवटीपेक्षाही वाईट असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
संघर्ष यात्रेच्या पाचव्या दिवशी विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांशी संवाद साधला. त्यानंतर जाहीर सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारच्या धोरणांमुळे राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
शेतक-यांना संपावर जाण्याची दुर्दैवी वेळ या सरकारने आणली आहे. हे सरकारचे अपयश असून आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हाच तातडीचा उपाय असून संघर्ष यात्रेच्या माध्यमातून एकत्र आलेले सर्व विरोधक एकत्र राहून शेतक-यांना कर्जमाफी मिळवून दिल्याशिवाय हा संघर्ष थांबवणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.
यावेळी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतक-याला बळ देण्यासाठी संघर्ष यात्रा काढली आहे. मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादमध्ये येऊन पॅकेजची घोषणा केली होती. पण सरकारने यातला एक रूपयाही अद्याप दिला नाही. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात एल्गार पुकारला असून शेतक-यांना कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही असे विखे पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी सरकारचा जोरदार समाचार घेतला. लोकांनी मोठया विश्वासाने भाजपला सत्ता दिली. मात्र भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. लोकांना खोटी आश्वासने देऊन भाजपने लोकांचा विश्वासघात केला असून देशाच्या इतिहासात सगळ्या पंतप्रधानांनी जाहिरातीवर जेवढा खर्च केला त्यापेक्षा जास्त खर्च एकटया मोदींनी केला आहे.
या सरकारकडे जाहिरातीवर खर्च करायला हजारो कोटी रुपये आहेत, मात्र शेतक-यांना कर्जमाफी द्यायला पैसे नाहीत. या शेतकरीविरोधी सरकारला जागा दाखवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले असून शेतक-यांनी साथ दिल्यावर सरकार बदलायला फार वेळ लागणार नाही असे पवार म्हणाले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली.
तत्पूर्वी आज सकाळी संघर्ष यात्रेत सहभागी नेत्यांनी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांशी संवाद साधला. लातूरच्या गारपीटग्रस्त येलूर गावातील शेतक-यांची व्यथा ऐकून संघर्ष यात्रेतील नेत्यांनी गारपीटग्रस्त शेतकरी गुंडप्पा एकनाथ निटुरे यांना तात्काळ एक लाख रूपयांची मदत केली. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी येथे शेतक-यांशी संवाद साधला.
उजनी, उस्मानाबाद आणि तुळजापूर येथील संघर्ष यात्रेच्या जाहीर सभांना शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. त्यानंतर सर्व नेत्यांनी तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयासाठी राज्यकर्त्यांंना सुबुध्दी देण्याचे साकडे घातले. मराठवाड्यातील सात जिल्ह्याचा प्रवास करून संघर्ष यात्रा आज पश्चिम महाराष्ट्रात दाखल झाली.