भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांचे मुस्लिमांबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केले आहे.
कोची- भाजपा उत्तर प्रदेशात निवडणुकांच्या तोंडावर धार्मिक दुफळी निर्माण करत असून भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांचे मुस्लिमांबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे साक्षी महाराज व भाजपावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
साक्षी महाराज यांचे वक्तव्य म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपाची राजकीय खेळी असून त्यांच्या वक्तवानंतर भाजपाने त्यापासून स्वत:ची सुटका करुन घेतली होती. मात्र हा भाजपाचा दुतोंडीपणा असून यामागे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी केला.
भाजपात जर शिस्त, शिष्टाचार शिल्लक असता, तर एव्हाना साक्षी महाराजांची हकालपट्टी झाली असती. देशाच्या सर्वागीण विकासासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे ते म्हणतात, मात्र हे विरोधाभासी असून फोडा आणि राज्य करा, हीच भाजपाची खरी नीती असल्याचा घणाणातही वेणुगोपाल यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने जात, धर्म यावर मते मागणे अवैध असल्याचे मत नोंदवले होते, त्याचाही साक्षी महाराजांच्या वक्तव्यामुळे अवमान झाल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी केला. याप्रकरणी न्यायालयाचा अवमान, तसेच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी साक्षी महाराजांवर कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशाची लोकसंख्या वाढण्यासाठी मुस्लिमच जबाबदार असल्याचे बेजबाबदार वक्तव्य साक्षी महाराजांनी शनिवारी उत्तरप्रदेशात केले होते.