लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चौफेर उधळलेला भाजपाचा विजयी वारु अखेर दिल्लीकरांनी रोखला.
लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चौफेर उधळलेला भाजपाचा विजयी वारु अखेर दिल्लीकरांनी रोखला. लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड ही राज्य काबीज करणा-या भाजपाला दिल्ली मात्र जिंकता आली नाही.
सोळावर्षानंतरही दिल्लीच्या जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. दिल्लीकर जनतेने पुन्हा एकदा ४९ दिवसात सत्ता सोडणा-या आम आदमी पक्षावर विश्वास दाखवला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने अभुतपूर्व यश मिळवले आहे.
शनिवारच्या मतदानानंतर बहुतांश एक्झिट पोल चाचण्यांनी आपचे सरकार येईल, २०१३ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपाच्या जागा दहाने घटतील असा अंदाज वर्तवला होता. पण भाजपाचा इतका दारुण पराभव होईल याचा अंदाज कुठल्याही एक्झिट पोलने वर्तवला नव्हता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही याची कल्पना केली नसेल.
भाजपाला एकआकडी जागा मिळतील अशी स्थिती आहे. काँग्रेसकडे या निवडणुकीत गमावण्यासारखे फारसे काही नव्हतेच. पण त्यांची कामगिरीही अत्यंत निराशाजनक झाली आहे. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न देता त्रिशंकू कौल दिला होता. त्यावेळी आपने काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केले होते.
त्यानंतर जनलोकपाल विधेयकाच्या मुद्याचे भांडवल करुन, अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने राजीनामा दिला होता. अवघ्या ४९ दिवसात हे सरकार कोसळले होते. त्यावेळी केजरीवालांवर अहंकारी, हुकूमशाही प्रवृत्तीचे असल्याची टोकाची टीका झाली होती. लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये आपला सर्व जागांवर पराभव स्वीकारुन याची किंमतही चुकवावी लागली.
लोकसभेतील पराभवापासून बोध घेत आपने आपली रणनिती बदलली. केजरीवालांनी सर्वप्रथम ४९ दिवसात दिल्लीतील सत्ता सोडण्याच्या निर्णयाबद्दल जनतेची माफी मागितली. कार्यकर्त्यांचे जाळे उभारुन, घराघरापर्यंत पोहोचून सत्ता सोडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आपचे दिल्लीत सत्ता राबवण्याचे व्हिजन मतदारांना समजावून सांगितले. वीज, पाणी या दिल्लीच्या प्रमुख समस्यांवर प्रचारात जोर दिला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर टोकाची टीका करण्याचे टाळले. मागच्या चुकांपासून बोध घेत आपने आपली रणनिती आखली ज्याचा फायदा त्यांना झाला.
दुस-या बाजूला भाजप पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर अवलंबून होता. हाती सत्ता असताना दिल्लीकरांच्या समस्या सुटतील असे निर्णय घेण्याऐवजी भाजपाने फक्त केजरीवालांना लक्ष्य केले. केजरीवालांसमोर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार देण्यासाठी दिल्ली भाजपाकडे कोणताही स्वच्छ चेहरा नसल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी किरण बेदी यांना पक्षात आणून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले.
पण हा डाव शहा यांच्यावरच पूर्णपणे उलटला. उलट पक्षात आल्यानंतर चार दिवसातच मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजांची संख्या मोठया प्रमाणावर वाढली. दिल्लीचा निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ महिन्यांच्या कारभारावर दिल्लीच्या जनतेने उमटवलेली नापसंतीची मोहोर आहे. पण भाजपाला हे मान्य होणार नाही.
अमित शहा यांनी दिल्लीची निवडणूक प्रतिष्ठेची करुन संपूर्ण ताकत पणाला लावली होती. दिल्लीतील लोकवस्तीनुसार विविध राज्यातील आमदार-खासदारांची फौज प्रचारात उतरवली होती. पण त्याचा काहीएक फायदा झाला नाही. आधीच भाजपाला नाकारण्याचे एकमत बनवलेल्या दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाच्या पारडयात भरभरुन मते टाकली.
दिल्लीच्या निकालातून देशभरात भाजप विरोधी लाट आहे असा अर्थ काढता येणार नाही पण आगामी काळात बिहार, पश्चिम बंगाल या राज्यात होणा-या विधानसभा निवडणुकीचा विचार करता भाजपासाठी निश्चितच ही धोक्याची घंटा आहे तसेच पक्षविस्ताराच्या योजनांवरही मर्यादा येऊ शकतात.