भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपाच्या मंत्र्यांची जनमाणसातील प्रतिमा खराब झाली आहे.
मुंबई- भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपाच्या मंत्र्यांची जनमाणसातील प्रतिमा खराब झाली आहे. त्याचा फटका भाजपाचा सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही बसत असून आहे. त्यामुळे भाजपा मंत्रिमंडळापासून दूर आपला कारभार शिवसेना भवनात थाटण्यास शिवसेनेतील मंत्र्यांनी सुरुवात केल्याची जोरदार चर्चा आहे.
राज्यात काँग्रेस आघाडी सरकारचा जनता दरबार भरायचा. त्याच धर्तीवर शिवसेनेने आत आपला दरबार शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनात भरवण्याचे ठरवले आहे. शिवसेना भवनातून यापुढे शिवसेनेचे मंत्री जनतेची कामे करतील, असे ठरले आहे. जनतेला न्याय मिळावा म्हणून शिवसेना भवनातून आदेशही काढण्यात येणार आहे.
शिवसेना जनतेसाठी आपण हे करत असल्याचे म्हणत असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी मंत्र्यांवर बनावट पदव्या तसेच करोडो रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. शिवाय भाजपा आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह अनेकदा
चव्हाटयावर आले आहेत. वर्षभरात गतिमान सरकार देण्याचा टेंभा मिरवणा-या सेना-भाजपा सरकारची मंत्र्यांच्या कथित प्रकरणांमुळे जागोजागी नाचक्की सुरू आहे. त्याचा परिणाम युती सरकारचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला होऊ लागला आहे.
भाजपाचे मंत्री आरोपीच्या पिंज-यात उभे असताना आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी शिवसेना सावध आहे. त्यामुळे शिवसेनेने राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाला सोडून दादरच्या शिवसेना भवनातून आपला कारभार चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मंत्रालयातील दूषित वातावरणात शिवसेनेचे मंत्री गुरफटले जाऊ नयेत, ही दक्षता सेनेने घेतली आहे.