भाजपा सरकारबद्दल लोकांच्या मनात संताप आहे. हे सरकार आता जायलाच पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
मुंबई- पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून लोकांचा कल समोर आला आहे. भाजपा सरकारबद्दल लोकांच्या मनात संताप आहे. हे सरकार आता जायलाच पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असेही ते ठामपणे म्हणाले.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत भाजपा आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षाने संयमाने कारभार हाताळण्याची गरज असते. आपण विरोधी पक्षांत असताना आणि सत्तेवर असताना वागण्यात बदल झाला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वागण्यात तो बदल झाल्याचे दिसत नाही. राज्याच्या प्रमुखाने सहका-यांशी सामंजस्याने वागण्याची गरज असते. कधी वादाचा काही प्रसंग निर्माण झाला तर संयमाने परिस्थिती हाताळली पाहिजे, मात्र फडणवीस यांच्याबाबतीत ते दिसत नाही, असेही ते म्हणले. जनतेत समर्थन असणा-या नेत्यांना आणि पक्षांना बदनाम करणे ही भाजपाची जुनीच पद्धत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष केले जात आहे, असे पवार म्हणाले.
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या सभेत शिवसेनेचे मंत्री राजीनामे देतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, कालपर्यंत तसे वाटत होते. मात्र उद्धव ठाकरे यांचे कालचे भाष्य संदिग्ध आहे. शेतक-यांना कर्जमाफी दिली तर आम्ही पाठिंबा पाच वर्षे कायम ठेऊ, असे ते म्हणाले आहेत. त्यांचे हे वाक्य पळवाट आहे, असेही पवार म्हणाले. त्यातूनही शिवसेनेने पाठिंबा काढलाच तर राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत आता भाजपाला पाठिंबा देणार नाही. हे सरकार पडले तर मध्यवधी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण तयारी आहे. हे सरकार पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर शेकाप-कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी आपण नक्की बोलू असेही पवार म्हणाले.
भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांच्या मनात शिवसेनेनेबद्दल अत्यंत चीड आहे. पूर्वी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी हे समजून घेणारे नेते होते. हे नेते मुंबईत आले की ‘मातोश्री’वर जाऊन विचार विनिमय करीत होते. आता तसे नेतृत्व भाजपामध्ये उरलेले नाही. महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमध्ये जितका शिवसेनेविषयी द्वेष आहे, त्याच्या कितीतरी अधिक पटीने दिल्लीच्या नेत्यांच्या मनात शिवसेनेविषयी तिरस्काराची भावना आहे, असेही ते म्हणाले.