कुठलेही यश हे कायमचे वा अंतिम नसते. राजकीय क्षेत्रात तर असे यश गृहित धरताच येणार नाही. परंतु ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपला हे कोण समजवणार? लोकांची दिशाभूल करणारी आश्वासने देऊन सत्ता मिळवणा-या भाजपला आता गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील तीन लोकसभा आणि ३३ विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांनी जमिनीवर आणले आहे.
कुठलेही यश हे कायमचे वा अंतिम नसते. राजकीय क्षेत्रात तर असे यश गृहित धरताच येणार नाही. परंतु ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपला हे कोण समजवणार? लोकांची दिशाभूल करणारी आश्वासने देऊन सत्ता मिळवणा-या भाजपला आता गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील तीन लोकसभा आणि ३३ विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांनी जमिनीवर आणले आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर आता राज्यांतील पोटनिवडणुका आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्येही आपण बाजी मारू, अशी फुशारकी मारणा-या भाजपला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणा-या भाजपची ‘मोदी लाट’ केवळ चार महिन्यातच ओसरल्याचे चित्र या पोटनिवडणुकांच्या निकालांनी स्पष्ट केले आहे. खरे म्हणजे भाजपने आपला हा ‘निकाल’ स्वत:च ओढवून घेतला असे म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या खासदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने विविध राज्यांत या पोटनिवडणुका झाल्या. या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त १२ जागा जिंकता आल्या. उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थानातील स्वत:च्या १३ जागा भाजपला गमवण्याची नामुष्की पत्करावी लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या बडोदा लोकसभा मतदारसंघात भाजपला यश मिळाले खरे; पण भाजपचे मताधिक्य मात्र कमी झाले. गेल्या महिन्यात बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांतही भाजपला जोरदार धक्का बसला होता. पण मंगळवारी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकाल भाजप नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरावा. विशेष म्हणजे ज्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला ८० पैकी तब्बल ७२ जागा मिळाल्या होत्या त्या उत्तर प्रदेशमध्ये आता विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवणुकीत अवघ्या तीन जागा मिळाल्या तर समाजवादी पक्षाला सात जागा मिळाल्या. या दहाही जागा मुळात भाजपच्या होत्या, हे विशेष होय. उत्तर प्रदेशमधील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे. भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला चारपैकी एकच जागा मिळाली आणि काँग्रेसला तीन जागा मिळाल्या.
गुजरातमध्येही काँग्रेसने तीन जागा मिळवल्या व गुजरात ही मोदी आणि भाजपची मक्तेदारी नाही, हे दाखवून दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र भाजपने एक जागा जिंकून या राज्यात आपले अस्तित्व दाखवले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनपेक्षित बहुमत मिळवलेल्या भाजपला या पोटनिवडणुकांमध्येही जबरदस्त यश मिळवू असा विश्वास होता. पण पोटनिवडणुकांच्या या निकालाने त्यांच्या या विश्वासाच्या ठिक-या उडाल्या आहेत. भाजपला पोटनिवडणुकांध्ये जो दणका मिळाला आहे त्याचा अन्वयार्थ सरळ आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपचे नेते, कार्यकत्रे आणि भाजप व संघ परिवारातील संघटना यांचे वर्तन उद्दाम व बेताल बनले होते. विश्व हिंदू परिषदेचे नेते बेताल विधाने करून धार्मिक तेढ निर्माण करत होते. धर्मसंसदेने तर साईबाबा हे संत नाहीत, असे जाहीर करून त्यांच्या मूर्ती हिंदू मंदिरातून हलवण्यात याव्यात, असे आदेश दिले. काही मंदिरातून हा आदेश अमलातही आणण्यात आला. धर्मसंसदेच्या या पवित्र्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मौन पाळले.
धर्मसंसदेच्या या आदेशाने महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारताच्या सर्व भागातील साईभक्त नाराज व संतप्त झाले. रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तर ‘हिंदू धर्म हा सर्वसमावेशक असून सर्व धर्मीयांसाठी हा धर्म खुला आहे,’ असे सर्वाना निमंत्रणच दिले होते. या आगाऊ व आगलावू वक्तव्यांचा लोकांवर परिणाम होत हेताच; परंतु सर्वसामान्य लोकांना चीड आली ती भाजपने त्यांना फसवल्याची. भाजपने निवडणूक प्रचारात सामान्य नागरिकांना जी आश्वासने दिली होती त्या आश्वासनांना काही दिवसातच हरताळ फासला. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी लोकांना आपण सत्तेवर आल्यावर महागाई कमी करण्याची ग्वाही दिली होती. त्याबरोबरच परदेशातील बँकांत ठेवलेला काळा पैसा आणण्याचेही त्यांनी आश्वासन दिले होते. पण या दोन्ही आश्वासने त्यांनी पाळली नाहीत. सत्तेवर आल्यानंतर महिना होतो न होतो तोच रेल्वेची मासिक पास दरवाढ करण्यात आली. या दरवाढीने लोकांना चांगलाच धक्का बसला व त्यांनी भाडेवाढीविरुद्ध निदर्शनेही केली. या धक्क्यातून लोक सावरत असतानाच साखरेवरील आयात शुल्क वाढवून सरकारने आणखी एक दणका दिला.
गेल्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या प्रारंभी कांदे, बटाटे आणि भाज्या महाग असणे साहजिक होते. पण आता चांगला पाऊस होऊनही सगळ्या भाज्यांचे दर चढेच आहेत. भाज्यांचे दर कमी होतील व लोकांना दिलासा मिळेल, अशी लोकांना आशा होती ती फोलच ठरली आहे. काळा पैसा परदेशातच आहे. या संबंधात टीका करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘मोदींनी शंभर दिवसात शंभर रुपयेही आणले नाहीत.’ मोदी सरकारने सत्तेवर आल्यावर जनहिताच्या काही योजना हाती घेण्याऐवजी राजकीय डावपेच करण्यात वेळ घालवत आहे. सत्तेत आल्याबरोबर राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या करण्यात वेळ घालवला. जातीयवादी राजकारण व संघाचा अजेंडा राबवण्याचे बेत सुरू आहेत. महाराष्ट्रात व हरयाणात आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका आपण सहज जिंकू, अशा भ्रमात युतीचे भाजप व शिवसेना होते. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे हुरळून गेलेल्या या पक्षांना पुरोगामी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची गणिते वेगळी आहेत, हे आता कळून चुकले आहे. महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची युती आहे. पण जागांच्या वाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये तेढ निर्माण झाली असून ही युती फुटीच्या मार्गावर आहे. भाजपच्या फुटीच्या व जातीयवादी राजकारणावर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच जोरदार हल्ला केला होता. त्याचवेळी त्यांनी भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली तर ते विदर्भ महाराष्ट्रातून तोडून महाराष्ट्राचे तुकडे करतील, यावर प्रकाश टाकला आहे. भाजपला पोटनिवडणुकांमध्ये जो ‘जोर का झटका’ बसला आहे, हे बदललेल्या परिस्थितीचे द्योतक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकसंध महाराष्ट्राच्या विकासाचे, प्रगतीसाठी कटीबद्ध आहे. लोकांना अच्छे दिनांची प्रतीक्षा होती. पण अच्छे दिन एखादी व्यक्ती, एखादे सरकार कधीच देऊ शकत नाही. लोकशाहीत सामूहिक विकासातून सर्व घटकांचा विकास होतो. आघाडीकडे महाराष्ट्रातील सगळय़ा घटकांचे सामूहिक नेतृत्व आहे आणि म्हणून विकासाची गंगा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आघाडीच अन्य कोणत्या पक्षांपेक्षा चांगले करू शकेल.
[EPSB]
चीनबाबत कणखर धोरण हवे!
भारतीय सीमेत घुसखोरी करण्यात चीन आता पाकिस्तानला मागे टाकेल की, काय अशी शक्यता वर्तवली जात असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौ-यावर येणार आहेत.
[/EPSB]