गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाचे निमित्त करून भाजप विनाकारण आणि अनावश्यक निदर्शने करत असल्याची टीका गुरुवारी काँग्रेस आणि केंद्र सरकारने केली.
नवी दिल्ली – गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाचे निमित्त करून भाजप विनाकारण आणि अनावश्यक निदर्शने करत असल्याची टीका गुरुवारी काँग्रेस आणि केंद्र सरकारने केली. भाजप आपल्या अंतर्गत कलहापासून प्रसारमाध्यमांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आंदोलन करत असल्याचा पलटवार काँग्रेसने केला. तसेच शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणीही फेटाळून लावली.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर हिच्या बाजूने बोलल्याबद्दल भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली.
भाजपकडे सरकारविरोधात कोणतेच मुद्दे नाहीत म्हणून ते किरकोळ मुद्दय़ावरून आंदोलन करत असल्याचा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी केला. ‘कोणत्याही धार्मिक गटाचा, देशातील कोणत्याही भागातील दहशतवाद’ पसरता कामा नये, असे गृहमंत्री म्हणाले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘शिंदे चुकीचे काय बोलले? ते गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे तशीच काही माहिती असणार. दहशतवादाला कोणताही धर्म अथवा रंग नसतो ही आपली भूमिका काँग्रेसने आधीच स्पष्ट केली आहे,’ असे म्हणून भाजप आपल्यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पक्षाच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी केली.