‘भाग मिल्खा भाग, असे म्हणत रविवारी ठाण्यात आयोजित ‘क्रांती दौड’ला शहरवासीय तसेच विविध भागांतून आलेल्या शेकडो धावपटूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
ठाणे – ‘भाग मिल्खा भाग, असे म्हणत रविवारी ठाण्यात आयोजित ‘क्रांती दौड’ला शहरवासीय तसेच विविध भागांतून आलेल्या शेकडो धावपटूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. तब्बल आठ हजार विद्यार्थी या स्पर्धेत धावले. मात्र काही प्रमाणात नियोजनाच्या अभावामुळे पंधरा धावपटू मुले जखमी झाल्याने पालकवर्गात नाराजीचे वातावरण होते.
‘आपण सारे’ संस्थेतर्फे वर्तकनगर-भीमनगर येथे ही क्रांती दौडचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता या दौडला सुरुवात होणार होती. राजकीय नेते, पदाधिकारी व धावपटूही स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे वर्तकनगरचा परिसर सकाळपासूनच गजबजून गेला होता. मात्र ही तब्बल दौड दीड तास उशिराने सुरू झाल्याने स्पर्धकांचा हिरमोड झाला. सकाळी नऊच्या सुमारास अचानक मिल्खा सिंग यांचे एका गाडीतून आगमन झाल्यावर स्पर्धकांच्या उत्साहाला उधाण आले. त्यामुळे जणू भाग मिल्खा भाग, असे म्हणत अनेकांनी दौड लगावली. एकीकडे मिल्खा सिंग यांच्या नावाचा जयजयकार सुरू होता. मिल्खा यांना गर्दीचा गराडा पडल्याने कशीबशी वाट काढत त्यांनी मंचक गाठले. सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर १५ वर्षाखालील मुलांच्या गटाने सर्वप्रथम धावण्यास सुरुवात केली.
.. तरी स्पर्धकांत जोश
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेले मिल्खा सिंग हे स्पर्धेत धावून धावपटूंना प्रोत्साहित करतील असे वाटत होते. मात्र त्यांनी हातात ‘तिरंगा’ घेऊन धावपटूंबरोबर चालणेच पसंत केले. काही पावले चालल्यानंतर ते निघून गेले. मात्र त्यांच्या या चालण्यामुळे स्पर्धकांचा उत्साह दुणावला.
पालकांत संतापाची लाट
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीपासूनच नियोजनाचा अभाव जाणवत होता. या स्पर्धेसाठी ठाण्यातील विविध शाळांचे विद्यार्थी सकाळपासून वर्तकनगर येथे जमले होते. मात्र प्रत्यक्षात ही स्पर्धा पावणेदहा वाजता सुरू झाली. चेंगराचेंगरीमुळे पंधरा धावपटू विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे पालकांत संताप वातावरण निर्माण झाले होते.
विजेत्या धावपटूंचा गौरव
या स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये सावित्रीदेवी थिराणी विद्यालयाचा वृषभ भोईर तर, मुलींमध्ये वैभवी पैवणकर हिने बाजी मारली. १२ वर्षे वयोगटांतील स्पर्धेत ठाणे महापालिका शाळा क्रमांक ४४ मधील सागर साबळे व मुलींमध्ये मावळी मंडळ हायस्कूलची अदिती पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. एकूण चार गटांत झालेल्या या स्पर्धेत १५ वर्षाखालील मुलांच्या गटात थिराणी विद्यामंदिरचा अभय इंगळे दुसरा तर, मावळी मंडळ स्पोर्टच्या रोहित मांडवकरने तिसरा क्रमांक पटकावला. याच वयोगटातील मुलींमध्ये पडवळ विद्यालयाच्या श्रृतिका इनामदार हिने दुसरा व ट्रॅक अॅड फिल्डची मानसी हुडलकरने तिसरा क्रमांक पटकावला. तर १२ वर्षाखालील मुलांमध्ये दुसरा क्रमांक अमेय मरगज व तिसरा क्रमांक क्रीडा प्रबोधिनीच्या समीर बोरकर याने पटकावला. याच गटात मुलींमध्ये सेव्हन स्टार स्पोर्टसची श्रावणा वायंगणकर हिने दुसरा व मावळी मंडळ स्कूलची पर्निका बनसोडेने तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्या धावपटूंना आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी खासदार संजीव नाईक, ‘आपण सारे’संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर, ठाणे पालिका स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.
वाड्यात ‘ऑगस्ट क्रांती’साठी दौड
वाडा – संततधार पडणा-या पावसाची तमा न बाळगता रविवारी तालुक्यात आयोजित पाचव्या ‘ऑगस्ट क्रांती वर्षा मॅरॅथॉन’मध्ये शेकडो स्पर्धकांनी दौड लगावली. कला-क्रीडा-शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या वेळी विविध वयोगटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत खुल्या गटातून (२१ किमी) जव्हार येथील युवराज थेतले याने प्रथम क्रमांक पटकावला. मागील तीन वर्षापासून युवराज सतत मॅरॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत असून यंदाही त्याने हॅटट्रीक साधली आहे. विक्रमगड तालुक्याच्या ओंदे येथील ज्ञानेश्वर मोरघा याने द्वितीय तर काशीनाथ भोरे याने तिसरा क्रमांक पटकावला. १९ वर्षे वयोगटांत अमित माळी (विक्रमगड) तर मुलींमध्ये सोनाली सातपुते (वाडा) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. १४ वर्षे वयोगटांत पद्मा रंघा व मुलींत ज्ञानेश चौधरी यांनी अव्वल क्रमांक पटकावला. तर दहा वर्षे वयोगटांत विवेक वागळे व मुलींमध्ये अंकिता चौधरी (नाकाडपाडा) हे प्रथम आले. या वेळी विनोदी कलाकार भाऊ कदम, नम्रता आवटे, अतुल तोडणकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील व विविध राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते वर्षा मॅरॅथॉन स्पर्धेसाठी उपस्थित होते.